आनंदीबाई भट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आनंदीबाई भट (माहेरच्या आनंदीबाई ओक) या रघुनाथराव ऊर्फ राघोबादादा पेशव्यांच्या पत्‍नी होत.

आनंदीबाई यांचे माहेर हे ओकांचे. हे ओक घराणे गुहागरजवळील मळण गावातील होय. हे गाव गुहागर पासून २० किमी अंतरावर आहे. मुळात सर्व ओक हे गुहागरजवळ असणाऱ्या पालशेत गावचे. पुढे एका कुटुंबाला पालशेत गावची देशमुखी मिळाली आणि सरंजाम म्हणून आठ गावे दिली गेली, त्यात मळण हे गाव होते. पालशेत येथून या आठ गावात ओकांची कुटुंबे गेली. राघो महादेव हे आनंदीबाई यांचे वडील. राघो महादेव हे कारकून, शिलेदार होते त्यामुळे बहुतांश वेळा ते घाटावर असत.

आनंदीबाई यांनी पुढे आपल्या दत्तक भावासाठी, बाबुराव याच्यासाठी, काही इनाम मिळवून दिले. ते इनाम अगदी इनाम कमिशनपर्यंत चालू होते. पुढे इंग्रजांच्या आमदानीत त्यांना पेन्शन मिळू लागले. बाबुराव ओक यांची मुले पुढे बरीच भांडकुदळ निघाली. यामुळे घराण्याचे फार नुकसान झाले. या या बापूंचा मोठा चिरंजीव माधवराव ओक हे सन १९१४ पर्यंत हयात होते. माधवरावांचा मुलगा विनायकराव हा पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये चित्रकला शिकवत असे. तो सन १९११ मध्ये वारला.त्यांना दोन मुले. पैकी विश्वनाथ विनायकराव हे मुंबईत वकील होते. बापूराव ओक यांची आई म्हणजे काकूबाई ओक अर्थात आनंदीबाई पेशवे यांची आई. त्यांना सालिना ५००० रुपये मिळत असत.

आनंदीबाईंची दिनचर्या[संपादन]

पेशवे दप्तरातील कागदपत्रे या गो.स. सरदेसाई यांनी निवडलेल्या मोडी कागदपत्रांच्या एक खंडात आनंदीबाई यांच्याबद्दलची अनेक कागदपत्रे छापली आहेत. ‘आनंदीबाई यांची दिनचर्या’ अशा नावाने तो अध्याय आहे.

राजकारणी आनंदीबाई[संपादन]

शंभर राजकारणे करतील असा आनंदीबाईंचा लौकिक होता.[ संदर्भ हवा ] त्यांनी रघुनाथरावांनी गारद्यांना लिहिलेल्या नारायणरावाला धरावे अशी आज्ञा असलेल्या पत्रात बदल करून धचा मा केला आणि नारायणाचा खून घडवून आणला, अशी त्यांची प्रसिद्धी आहे. आनंदीबाई कोपरगावला बंदिस्त असताना त्यांनी दिनचर्या लिहून ठेवली आहे, तीवरून आनंदीबाईंच्या स्वभावाचे यथार्थ दर्शन घडण्यास मदत होते. त्यांच्या दिनचर्येवरून त्यांच्या अंतःकरणाची ऋजुता आणि मनाचा कणखरपणा दिसून येतो. नाना फडणविसांनी लादलेल्या जाचास कंटाळून लिहिलेल्या पत्रांत त्या आपला राग व्यक्त करताना रामायण-महाभारतातील दृष्टान्त व दाखले देतात, यावरून त्यांचा वाचनाचा व्यासंग चांगला असल्याचे कळते. वाचनात जशा त्या प्रवीण होत्या तशा लिहिण्यातही हुशार होत्या हे त्यांनी लिहिलेल्या पत्रांवरून समजते. महत्त्वाची पत्रे त्या स्वतः लिहीत असत.

आपले पुत्र दुसरे बाजीराव यांचा आचरटपणा आनंदीबाईंना पसंत नव्हता. त्यांनी लिहिले आहे, ’बाजीराव थोर झाले असता अद्याप मर्यादेची तऱ्हा नाही’.

नाना फडणविसांना पाठविलेल्या एका पत्रात त्यांनी नानांची कान‍उघाडणी केली आहे. ते पत्र असे :-
'आम्ही होऊन (पत्र) पाठवावे, तर कारणाखेरीज आम्हास पत्र पाठवितात म्हणौन तुम्हीच हसाल, हा काळ समजोन पत्रे न पाठविली. हल्ली पत्राचे कारण की तुम्ही तीन पिढ्यांचे दौलतीतील फडणीस असौन दौलताची तो गती जाली ती जाली. हल्ली यवनाक्रांत ब्राह्मणी दौलत फितुरांनी होऊ पाहते. तुमच्या चित्तातील उगीच अढी जात नाही, आणि ब्राह्मणी तो बुडत चालली! या दौलतेत पूर्वी कारभारी जाले, त्यांनी ब्राह्मणी स्थापली व दौलतेची वृद्धी केली हा काळ प्रस्तुत श्रीसत्तेने आला! इंग्रज बुंदेलखंडापर्यंत दोन कंपू आले, आणिकही मागून येणार. या बारीक मोठा विचार जो करणे तो तुम्हीच करणे.. त्यापक्षी दोन्ही गोष्टींचा आंदेशा करून ब्राह्मणपण राहे ते करणे.'

बारभाईंचा कारभार बाईंना पसंत नव्हता. सखारामबापूंना यासंबंधी लिहिलेल्या एका पत्रात उपरोध आणि त्वेष भरला आहे. या पत्रात सखारामबापूंनी वृद्धापकाळी केलेल्या लग्नाबद्दल त्यांना टोमणा मारला आहे. ते पत्र असे :-
'हे कालचक्र विपरीत आहे. परंतु आम्हास हाच भरवसा आहे की, तुम्ही कालचक्रासही फिरवाल, हे जाणून तुम्हांस पत्र लिहिले आहे. तरी ब्राह्मणी दौलत नीट राहून हुजूराचाही संतोष राहून सर्व गोष्टी बऱ्या होतील त्या कराव्या, न केल्या जन्मभर चांगले केले, आणि शेवटी म्हातारपणी इंग्रजांच्या घरात ब्राह्मणी दौलत घातली हे अपेश येई तो अर्थ न करावा.. सारांश हाच की इंग्रजांच्या हाती ब्राह्मण न चालता, दौलतीचा बंदोबस्त होऊन यावा. विशेष लिहावे तरी तुमचे दशांशही आम्हास समजत नाही. परंतु यश अपेश याचे धनी तुम्ही.. आम्ही लिहून विशेष तो नाही, तुम्ही मोजीतही नाही, परंतु आकार दिसत चालला, यास्तव सूचना लिहिली आहे.
‘नवी भावजय लाडकी केली तिचे नाव काय ठेवले व दुसरी करावयाची कधी हा मजकूर विशेष लिहिला होता त्याचे उत्तर काहीच आले नाही’.

आनंदीबाईंबद्दलची पुस्तके[संपादन]