भालजी पेंढारकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


भालजी पेंढारकर
जन्म भालचंद्र गोपाळ पेंढारकर
०२ मे १८९८
कोल्हापूर, महाराष्ट्र, भारत
मृत्यू २६ नोव्हेंबर १९९४
कोल्हापूर
इतर नावे भालबा, भालजी, कवी योगेश
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र चित्रपट दिगदर्शन, चित्रपटनिर्मिती, पटकथालेखन
भाषा मराठी, हिंदी
प्रमुख चित्रपट छत्रपती शिवाजी
मराठा तितुका मेळवावा
साधी माणसं
वडील डॉ.गोपाळराव पेंढारकर
आई राधाबाई गोपाळराव पेंढारकर
पत्नी

प्रथम पत्नी -शांताबाई [सावित्री]

द्वितीय पत्नी - सरलाबाई

तिसरी पत्नी - लीलाबाई [लीला चंद्रगिरी]

चौथी पत्नी - बकुळाबाई
अपत्ये जयसिंग,सदानंद, प्रभाकर, सरोज चिंदरकर, माधवी देसाई

भालचंद्र गोपाळ पेंढारकर ऊर्फ चित्रतपस्वी भालजी पेंढारकर (मे २, १८९८ - नोव्हेंबर २६, १९९४) हे मराठी चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, पटकथालेखक, संवादलेखक होते.

भालजींच्या “महारथी कर्ण” व “वाल्मिकी” या सिनेमातून भूमिका साकारत असतानाच अभिनेत्री लीलाबाईचे व त्यांचे प्रेम जुळले आणि त्याचे रूपांतर विवाहात झाले व लीला चंद्रगिरीच्या त्या लीला पेंढारकर झाल्या.

चित्रपट निर्मिती[संपादन]

भारताला स्वातंत्र्य मिळाले होते. गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त झाल्याच्या भावनेचा व स्वातंत्र्याचा दिव्य संदेश भालजींनी आपल्या चित्रपटांतून दिला. बहिर्जी नाईक, नेताजी पालकर, मोहित्यांची मंजुळा यांतील संवादांमधून भालजींनी दुबळेपणा व लाचारीविरुद्ध शाद्बिक आसूड ओढले. स्वातंत्र्य मिळाले तरी सुराज्य निर्माण करण्यासाठी त्याग, निष्ठा, औदार्य व संयमी असा खंबीरपणा आणि आत्मविश्वास असलेली तरुण पिढी तयार व्हावी यासाठी त्यांनी समृद्ध आशयासह कला व तंत्र या दोन्ही दृष्टिकोनातून उत्कृष्ट अशा चित्रपटांची निर्मिती केली.

भालजींचे चित्रपट किंवा त्यांची निर्मिती संस्था म्हणजे कलाकार व तंत्रज्ञ घडवणारी एक मोठी कार्यशाळाच होती. तसेच त्यांचा संच म्हणजे कुटुंबच होते. शिस्तबद्धता, वेळापत्रकानुसार काम, कामांचे नेटके वाटप, स्तोत्रपठण, प्रार्थना, रेखीव दिनक्रम, वगैरे... चित्रपटाच्या माध्यमातून भालजींनी सुलोचनादीदी, चंद्रकांत मांडरे, सूर्यकांत मांडरे, जयश्री गडकर असे असंख्य कलाकार घडवले. शिवाजीचा काळ आणि त्या काळातील व्यक्तिरेखा व प्रसंग ही भालजींच्या चित्रपटांची प्रमुख वैशिष्ट्ये होती. त्यांच्या युगप्रवर्तक अशा कारकिर्दीमुळे भालजींना यथार्थतेने चित्रतपस्वी असे म्हटले जाते.

१९४८ मध्ये गांधीजींची हत्या झाल्यानंतरच्या दंगलीमध्ये भालजींचा कोल्हापूर येथील जयप्रभा स्टुडिओ जाळला गेला. नुकताच तयार झालेला मीठभाकर व बाळ गजबरांचा मेरे लाल हे चित्रपट आगीत भक्षस्थानी पडले. दीडशे ते दोनशे कामगार बेकार झाले. भालजींनी पुन्हा लाखो रुपये खर्चून जयप्रभास परत उभे केले. जिद्दीतून मीठभाकर व मेरे लालची पुनर्निर्मिती केली. मीठभाकरने चांगला व्यवसाय केला. भालजींनी कोल्हापुरात मराठी चित्रनिर्मितीस पुन्हा एकदा वेग मिळवून दिला.

भालजी पेंढारकर याचे चित्रपट[संपादन]

  • आकाशवाणी
  • कान्होपात्रा
  • कालियामर्दन
  • गनिमी कावा
  • गोरखनाथ
  • छत्रपती शिवाजी
  • नेताजी पालकर
  • बहिर्जी नाईक
  • भक्त दामाजी
  • मराठी तितुका मेळवावा
  • महारथी कर्ण
  • मीठभाकर
  • मोहित्यांची मंजुळा
  • राजा गोपीचंद
  • वाल्मिकी
  • साधा माणूस (आत्मचरित्र). (संदर्भ-संशोधन-लेखनसाहाय्य : अर्जुन नलवडे. मधुकर पातकर, अनंत भगवान, प्रभाकर पेंढारकर)
  • साधी माणसं
  • सावित्री
  • सुवर्णभूमी

बाह्य दुवे[संपादन]