निंबा कृष्ण ठाकरे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

निंबा कृष्ण ठाकरे (एन.के. ठाकरे) (जन्म : मोराणे-धुळे जिल्हा, २२ एप्रिल, १९३८) हे पुणे विद्यापीठात टिळक अध्यासनाचे अध्यक्ष, माजी गणित विद्याशाखेचे प्रमुख, जागतिक कीर्तीचे गणिती आणि जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे संस्थापक आणि पहिले कुलगुरू होते. सन १९९६मध्ये ते कुलगुरुपदावरून निवृत्त झाले.

एन.के. ठाकरे हे कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून गणितात डॉक्टरेट मिळविणारे पहिले विद्यार्थी होते. ते एक नावाजलेले शिक्षणतज्ज्ञ आणि शिक्षण संस्थांचे यशस्वी शासक होत.

कौटुंबिक माहिती[संपादन]

वाडवडिलांमध्ये शिक्षणाची कुठलीही परंपरा नसताना एन.के. ठाकरे आणि त्यांचे तीन भाऊ उच्चशिक्षित झाले. हयात असलेल्या चार भावांपैकी मोठे एन.के. ठाकरे कुलगुरू, दुसऱ्या क्रमांकावरचे वसंतराव हे वृक्षमित्र म्हणून ६० पुरस्कार मिळवलेले कृषितज्ज्ञ व पर्यावरण या विषयावरच्या २१ पुस्तकांचे लेखक आहेत. तिसरे जगन्नाथ हे धुळ्यातील नामवंत शल्यचिकित्सक, व चौथे शरदराव हे सोलापुरातील प्रथितयश उद्योगपती आहेत.

एन.के. ठाकरे यांचे प्राथमिक शिक्षण धुळे जिल्ह्यातील मोराणे गावी झाले. त्यांचे काका दशरथ पाटील क्रांतिकारक होते. बेचाळीसच्या लढ्यात त्यांचा सहभाग होता. त्यांच्यामुळे विनोबा भावे, एस.एम. जोशी, ग.प्र. प्रधान अशी मातब्बर मंडळी गावात येत. त्यांच्या भाषणांतले विचार बालवयातच ठाकरे यांच्या मनावर बिंबले.

शैक्षणिक कारकीर्द[संपादन]

ग.प्र. प्रधानांचा आदर्श समोर असल्याने, शिक्षण क्षेत्रातच काम करायचे ठाकरे यांनी ठरवले. घरची खूप शेती होती. दूधदुभत्याला कमी नव्हते. पण रोख पैसा नसायचा, त्यामुळे एका शाळेत पूर्ण वेळ शिकवता-शिकवता ते मुंबई विद्यापीठातून एम.एस्‌‍सी.. झाले. या परीक्षेत गणितात पहिला क्रमांक मिळाल्याने त्यांना मुंबईतील साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या महाविद्यालयात सहज नोकरी मिळाली. पुढे मुंबईतीलच व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्निकल इन्स्टिट्यूट, मिठीबाई कॉलेज अशा नोकऱ्या करून एन.के. ठाकरे गोव्यातील चौगुले कॉलेजमध्ये लागले. अंती १९६९ पासून कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात गणिताचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले, आणि आठ वर्षांनी निवृत्त झाले.

कोल्हापूरच्या या नोकरीच्या काळात त्यांना गणितातली पीएच.डी. मिळाली. आठ वर्षांत त्यांचे गणितासंबंधीचे २००हून अधिक शोधनिबंध प्रसिद्ध झाले.

एन.के. ठाकरे सन १९८२ ते १९८५ या काळात धुळ्यातील जय हिंद महाविद्यालयाचे प्राचार्य होते. त्यानंतर त्यांना पुणे विद्यापीठात टिळक अध्यासनाचे "टिळक प्रोफेसर ऑफ मॅथेमॅटिक्स’ हे मानाचे पद मिळाले.

जळगावचे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ[संपादन]

एन,के, ठाकरे १५ ऑगस्ट १९९० रोजी प्रस्तावित उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू झाले. जळगाव, धुळे आणि नंदुरबार असे तीन जिल्हे हे या विद्यापीठाचे कार्यक्षेत्र असणार होते. १९९१-९२ हे या विद्यापीठाचे पहिले शैक्षणिक वर्ष. वर्ष सुरू झाले, तरी विद्यापीठाला स्वतःची जागा नव्हती. त्यासाठी जमीन मिळविण्यापासूनचे सर्व काम ठाकरे यांनी केले.. शेवटी जळगाव शहराजवळच्या एका डोंगरापलीकडील ६५० एकर टेकड्यांत व माळरानात या विद्यापीठासाठी इमारती बांधण्याचे काम सुरू झाले. त्या इमारतींत १९९५साली विद्यापीठाचे स्थानांतर झाले.

शैक्षणिक शुद्धी[संपादन]

एन.के. ठाकरे जेव्हा विद्यापीठाचे कुलगुरू झाले त्यावेळी उत्तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची कॉपी करून पास होण्याची प्रवृत्ती होती. हा कलंक पुसण्यासाठी ठाकऱ्यांनी सत्त्ववशील शिक्षकांची एक फळी तयार केली. या ब्रिगेडने अचानक धाड घालून कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पकडून संस्थाचालकांना त्यांच्यावर कारवाई करायला भाग पाडले. शिवाय अनेक अंतर्गत गैरव्यवहारही शोधून काढले, आणि त्यावर दीर्घकालीन उपाययोजनांचा कार्यक्रम राबवला. ठाकरे यांची शैक्षणिक शुद्धीची ही पहिली चळवळ कमालीची यशस्वी ठरली.

शिक्षणाचा उंचावलेला स्तर[संपादन]

विद्यापीठाचा पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रगत व्हावा म्हणून एन.के. ठाकरे यांनी तज्ज्ञ प्रोफेसरांना कामाला लावून आर्ट्‌स, सायन्स व कॉमर्स या तिन्ही शाखांसाठी १४८ नवी पाठ्यपुस्तके तयार केली. अभ्यासक्रमात कार्यानुभव व प्रकल्पपद्धती आणली. त्यामुळे शिक्षण समाजाभिमुख झालं. तसेच बायोकेमेस्ट्री, पॉलिमर केमेस्ट्री, फूड टेक्नॉलॉजी असे २५ नवीन अभ्यासक्रमही सुरू केले. या सर्व प्रयत्‍नांचे फलित म्हणजे ('इंडिया टुडे' २०१३ ने केलेल्या परीक्षणानुसार) या विद्यापीठाला महाराष्ट्रात पहिले स्थान मिळालेे आहे.

विद्यापीठाचे व्यवस्थापन[संपादन]

एन.के. ठाकरे यांनी विद्यापीठात शैक्षणिक शुल्काद्वारे जमा होणाऱ्या पैशातील गरजेपुरता पैसा हाताशी ठेवून, उर्वरित रक्कम रोजच्या रोज बँकेतील मुदत ठेवीत गुंतवण्याचा नियम घालून दिला. अशा काटकसरीच्या व्यवस्थापनामुळे उत्तम नियोजन असेल तर विद्यापीठे स्वतःच्या पैशात व्यवस्थित चालू शकतात हा धडा घातला गेला.

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची मालमत्ता[संपादन]

सहा वर्षे कुलगुरुपदावर राहून एन.के. ठाकरे १९९६साली निवृत्त झाले. त्यावेळी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची गंगाजळी १४ कोटी रुपयांची होती; शिवाय प्रशस्त व देखण्या ४० इमारती विद्यापीठात उभ्या होत्या. सुमारे ५ लाख झाडांनी व जागोजागीच्या हिरवळीने वेढलेले आणि वेरुळ-अजिंठा येथील लेण्यांच्या चित्रांनी नटलेलेले हे विद्यापीठ आज 'पर्वतावरील ज्ञानशिल्प' म्हणून ओळखले जाते.

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील कर्मचारी आणि अधिकारी[संपादन]

शिपायापासून रजिस्ट्रारपर्यंतच्या जागांसाठीच्या निवड प्रक्रियेसाठी एन.के. ठाकरे स्वतः प्रश्नपत्रिका काढत. नेमणुकांच्या वेळी सत्तेतील राजकारण्यांच्या आदेशाला 'गुणवत्ता असेल तर न्याय मिळेल' असं रोखठोक सांगण्याची निर्भयता त्यांच्यात होती. ठाकऱ्यांनी आपल्या सहकाऱ्यांना आपल्या वागण्यातून कर्तव्यकठोरतेचे धडे दिले.

निवृत्तीनंतर[संपादन]

१९९६नंतर एन.के. ठाकरे पुणे विद्यापीठात आलेआणि १९९८पर्यंत राहिले. या काळातल्या त्यांच्या कामाने आणि संशोधनाने दिल्लीच्या युनिव्हर्सिटी ग्रॅन्ट्‍स कमिशनने पुणे विद्यापीठाच्या गणित विभागाला 'गणितातील प्रगत शिक्षण देणारे केंद्र' हा दर्जा प्रदान केला.

पुणे विद्यापीठातून बाहेर पडल्यावर ठाकरे आपल्या मोराणे गावी आले. वाट्याला आलेल्या वडिलोपार्जित ११ एकर जमिनीवर त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज अशी इंग्रजी माध्यमाची शाळा काढली. त्यासाठी धुळे व पुणे येथील स्वतःची दोन घरे विकली, शिवाय आपला फंड आणि आयुष्यभराची बचत या कामात ओतली आणि उराशी जपलेले स्वप्न साकार केले.

आपल्या आईवडिलांच्या नावे (शेवंता प्री-प्रायमरी व प्रायमरी स्कूल व कृष्ण हायस्कूल) एन.के. ठाकऱ्यांनी सुरू केलेली दोन हजार हिरव्यागार झाडांनी नटलेली ती स्वच्छ, सुंदर, आणि प्रशस्त शाळा बघताना रवींद्रनाथ टागोरांच्या शांतिनिकेतनची आठवण येते. सर्वात कमी फी आकारणारी धुळ्यातील दर्जेदार शाळा असा या शाळेचा लौकिक आहे.

पुरस्कार[संपादन]

  • "एन.के. ठाकरे गौरव समिती"ने गोळा केलेल्या निधीतून पुणे विद्यापीठात "गणित रत्‍न" नावाचा पुरस्कार ठेवण्यात आला आहे. इंडियन मॅथेमॅटिकल सोसायटीने निवडलेल्या नामवंत गणितज्ञाला हा पुरस्कार दर वर्षी देण्यात येतो.