टिटवी (भारूड)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

टिटवी या पक्षाचे एक उल्लेखनीय प्रतिमांकन संत एकनाथांनी लिहिलेल्या ’टिटवी’ या भारुडात मिळते. एकनाथांनी या टिटवी-संबंधीच्या लोकसमजुतीचा अध्यात्मबोधार्थ मार्मिक उपयोग केला आहे. टिटवी ज्या घरावरून ओरडत जाते, त्या घरात कुणाला तरी यमाचे बोलावणे येते, अशी ही लोकसमजूत आहे. एकनाथांच्या भारुडात या टिटवीला ’यमाची तराळीण’ म्हटले आहे. ’तराळ’ हा वेठबिगार जमा करणारा व रात्री गस्त घालणारा एक बलुतेदार. त्याचेच काम करणारी ही ’तराळीण’. एकनाथ म्हणतात,

एका ग्रामावरी जाऊन |
एक नदीतीर पाहून |
तेथें टिटवी करी शयन |
दोन्ही पायांत खडा धरून गा ||

टिटाव-टिटाव असे ओरडत यमाच्या बोलावण्याची खूण म्हणून हे खडे कुणाकुणाच्या नावे टाकते ? तर चौगुला व कुळकर्णी यांच्या सुना, पाटलाकडचे चौघेजण, देशमुख, देशपांडे, चौधरी, शेटे, महाजन इत्यादींसह सर्व बलुतेदार - हे सर्व. असा या टिटवीचा दरारा आहे.

या भारुडातील अध्यात्मबोध असा -
परमात्म्याने हे देहरूपी गाव स्वोद्धारासाठी दिले आहे. तेव्हा अहंकार (चौगुला), कुबुद्धी (त्याची सून), मन (कुळकर्णी/देशमुख), ममता (त्याची सून), विकल्प, विकार, अज्ञान व प्रपंच (पाटलाकडचे चौघेजण), कामक्रोधादी विकार (बारा बलुतेदार) या साऱ्यांना ही टिटवी बजावते की, मी तुम्हांस व शेवटी त्या जीवासही यमाकडे घेऊन जाईन. म्हणून हे कामविकार आत्ताच टाका व हरिभजनी लागा.