रजनी अशोकराव पाटील

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रजनी अशोकराव पाटील

कार्यकाळ
इ.स. १९९६ – इ.स. १९९८
मागील केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर
पुढील जयसिंगराव गायकवाड पाटील
मतदारसंघ बीड

राजकीय पक्ष काँग्रेस पक्ष

रजनी पाटील या मराठी भारतीय राजकारणी आहेत. त्या १९९६ लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपकडून बीड लोकसभा निवडणूक जिंकल्या आहेत. पुणे विद्यापीठात विद्यार्थिदशेतच १९७९ मध्ये सिनेटची निवडणूक जिंकून चळवळीत सक्रिय झाल्या. रजनी पाटील यांनी एनएसयूआय या काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेतून आपल्या राजकीय कार्यास प्रारंभ केला. त्या १९७८ ते ८१ काळात त्या राज्याच्या ' एनएसयूआय 'च्या सेक्रेटरी होत्या. तर १९८१ ते ८३ च्या काळात अखिल भारतीय स्तरावरील ' एनएसयूआय 'च्या सेक्रेटरी म्हणून त्यांनी काम केले. लग्नापूर्वी युवक काँग्रेसचे काम केले. प्रथम महाराष्ट्राच्या सरचिटणीस व त्यानंतर त्यांना या संघटनेच्या राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती. याअगोदर पाटील यांनी एनएसयूआय जनरल सेक्रेटरी, खादी ग्रामोद्योग बोर्डाच्या जिल्हाध्यक्ष, काँग्रेसचे महिला प्रदेशाध्यक्ष, काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष, महाराष्ट्र महिला आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष, केंद्रीय समाजकल्याण बोर्डाच्या अध्यक्ष आणि राज्य बँकेच्या सहकारी बँकेच्या संचालक म्हणूनही काम केलेले आहे. त्यांनी तालुक्‍यातील उंदरी येथील पद्‌मश्री विखे पाटील साखर कारखान्याच्या अध्यक्षा म्हणूनही काम केले. तसेच माऊली विद्यापीठाच्या माध्यमातून त्यांचे शैक्षणिक क्षेत्रातही काम आहे. त्या लग्नानंतर १९९१ मध्ये जवळबन ता.केज गटातून बीड जिल्हा परिषदेच्या सदस्य म्हणूनही निवडून आल्या. १९९० ते ९६ या काळात बीड जिल्हा परिषदेच्या सदस्या म्हणूनही त्यांनी काम केले होते. १९९६मध्ये काँग्रेसकडून तिकीट मिळत नसल्याने खासदार गोपीनाथ मुंडे यांनी रजनी पाटील यांना भाजपकडून बीड लोकसभेची उमेदवारी दिली. त्या निवडूनही आल्या, परंतु ही लोकसभा अल्पजीवी ठरली. त्या भाजपमध्ये रमल्या नाहीत. त्यानंतर दोनच वर्षांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच त्यांनी भाजपचा त्याग करून पुन्हा 1998च्या निवडणुकीत अटलबिहारी वाजपेयी यांच्या सभेच्या वेळी सोनिया गांधी यांचा राजकारणात सक्रिय प्रवेश झाल्यानंतर खासदारकीचा राजीनामा देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. वाळवा (जि. सांगली) तालुक्यातील बहिरवडगाव माहेर असलेल्या रजनी पाटील यांचे वडील आत्माराम पाटील हे स्वातंत्र्यसैनिक होते. गदर चळवळीचे एक शिल्पकार आणि त्याबद्दल लाहोरला फासावर गेलेले हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांच्या त्या नात आहेत. राज्यात मंत्रिपद भूषविलेल्या अशोक पाटील यांच्या त्या पत्नी आहेत. [१]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीला शह देण्यासाठी काँग्रेसची नवी खेळी". २ जानेवारी, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)