पैस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पैस
लेखक दुर्गा भागवत
भाषा मराठी
प्रथमावृत्ती १९७०

पैस हा दुर्गा भागवत यांनी लिहिलेल्या विठ्ठलासंबंधीच्या लोककथांचा संग्रह आहे.

पैसमधील काही कथा-थोडक्यात[संपादन]

१.
विठ्ठलाची मूळ राणी पद्मावती अर्थात 'पदुबाई'. एकदा 'माळीराया' हा विठ्ठलाचा भक्त ५०० सहकाऱ्यांसह विठ्ठलदर्शनासाठी येत असल्याचे कळल्यावर, विठ्ठलाने घरी स्वागताच्या तयारीसाठी निरोप धाडला. पदुबाईचा नकार आला, 'काही नाही दळणारनी कांडणार. जळून तुमच्या भक्तांचा कोळसा होवो' हा निरोप दुसऱ्यांकडून कानी पडताच, माळीराया विठ्ठलाला न भेटताच परतला. विठ्ठलाने पदुबाईला भयानक शाप दिला, 'आज माझा संसार बुडाला. बायकोने सत्त्व घालवले. ऐक पदुबाई, तुझे-माझे नाते तुटले.. तू वेडी होऊन रानांत एकटी मरशील. कुणी तुझ्या प्रेताला शिवणार नाही..' दुसऱ्याच दिवशी तसे झाले. पदुबाई मेल्यावर भयंकर पाऊस पडून तिच्या अस्थी समुद्रात वाहून गेल्या. ही हकीकत ऐकून माळीरायाच्या काळजाचे पाणी झाले. तो 'आईच्या' वियोगात समुद्राकाठी तप करीत बसला. १२ वर्षांनी पदुबाईच्या अस्थी समुद्राने माळीरायाला देऊन त्या चंद्रभागेत टाकायला सांगितल्या. त्याने त्या तिथल्या पद्मतीर्थ तळ्यांत टाकल्या. तिथे एक कमळ उगवले.. राज्य सोडून विरहात भटकणाऱ्या विठोबाला ते सुंदर कमळ दिसले. त्याने ते तोडताच पदुबाई उभी राहिली.. पण आता तिचे नाव 'रुक्मिणी' होते. विठोबा तिला म्हणाला, 'आपला संसार तुटला तो तुटलाच. आपण आता एकत्र राहायचे नाही. रोज भेटू, बोलू. भक्ताचे भले करू.' पंढरपुरांत 'पद्मळे' हे तळे अन् पद्मवतीचे देऊळ आहे.

ही लोककथा फारशी कुणाला माहीत नाही, पण धनगरांनीच ती अजून जपली आहे.

२.
तुळशी ही दरिद्री ब्राह्मणाची काळी मुलगी. घरचं दारिद्ऱ्य; लग्न होईना. ती अनाथ झाल्यावर पंढरपूरच्या 'गवळी' विठोबारायाने तिला आश्रय दिला. रुक्मिणीने मत्सराने कट-कारस्थान केले. ते जिव्हारी लागून तुळशी भूमीत गडप होत असताना, विठोबाने तिचे केस धरून तिला वर ओढले. तेव्हा एक सावळे झाड वर आले, तेव्हा विठोबाच्या हातांत मंजिऱ्या होत्या. तुळशीला मानवी स्वरूपात दिलेले लग्नाचे वचन विठोबाने त्या झाडाशी लग्न लावून पूर्ण केले.

विठोबाच्या गळ्यातील तुळशीमाळेची अर्थात वैजयंतीमालेची अन् तुळशीच्या लग्नाची ही लोककथा ’पैस’मध्ये आहे..