मुंबईतील डब्बेवाले
डब्बेवाले हे मुंबई शहरातील नोकरदारांचे जेवणाचे डब्बे घरापासून कामाच्या जागेपर्यंत नेण्याचे काम करतात. डब्बे पोहचवण्याचे काम ऐकण्यास सोपे वाटत असले तरी मुंबईसारख्या अवाढव्य शहरात ज्या अचूकतेने हे काम केले जाते त्या कारणाने मुंबईचे डब्बेवाले संशोधकांच्या अभ्यासाचा विषय झाले आहेत.
मुंबई शहर हे विस्ताराने अवाढव्य असल्याने कामाच्या जागी वेळेवर पोहचण्यासाठी नोकरदार मंडळींना घरातून लौकर निघावे लागते. जर डब्बेवाल्यांची यंत्रणा अस्तित्वात नसती तर बहुसंख्य मंडळींना सकाळचा नाष्ता व दुपारच्याजेवणाचा डब्बा सकाळीच घेऊन निघावे लागले असते. डब्बावाल्यांच्या यंत्रणेमुळे बहुसंख्य गृहिणी जेवणाचा गरम डब्बा पाठवू शकतात. बहुसंख्य डब्बेवाले महाराष्ट्राच्या जुन्नर भागातील आहेत.
अनुक्रमणिका |
[संपादन] सुरुवात
'महादु हावजी बुचे यांनी सन १८९० साली ३५ डबेवाल्यांसह ही सेवा सुरु केली.त्यानंतर डबेवाला धर्मशाळेची स्थापना 'रघुनाथ मेडगे यांनी केली.या पैकी सुमारे ८५ टक्के डबेवाले निरक्षर व सुमारे १५ टक्केच डबेवाले साक्षर आहेत. मुंबई शहरात सध्या सुमारे ५००० डब्बेवाले आहेत. ते सुमारे २,००,००० डब्ब्यांची ने-आण करतात असा अंदाज आहे.[१]
[संपादन] नियम व शिस्त
त्यांच्या कामात शिस्त आहे.कुठल्याही घरुन डबा घेण्यासाठी फक्त ५ सेकंदाचा वेळ देण्यात येतो.नेहमीची उशीरा डबा देण्याची सवय असल्यास तो डबा बंद करण्यात येतो. यावर असलेल्या रंग संकेतामुळे(कलर कोड) डब्याची अदलाबदल कधीच होत नाही. या डबेवाल्यांनी मागील १२० वर्षात कधीच संप केला नाही.सर्व डबे पोहेचते झाल्याशिवाय कोणीही डबेवाला जेवण करीत नाही.
मराठीत डब्बेवाल्यांच्या आयुष्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईचा डबेवाला नावाचा व्यावसायिक चित्रपटही बनवण्यात आला होता. यात भरत जाधव यांची प्रमुख भूमिका होती.
[संपादन] प्रणालीची ओळख
एकाच भागातील डब्बे प्रथम एकत्र करून त्यांची गंतव्याप्रमाणे छटाई (Sorting) होते. एकाच गंतव्याचे डब्बे जलदगती उपनगरीय रेल्वेगाड्यांवर (Fast Local Trains) चढवण्यात येतात. डब्ब्यांवर गंतव्याचा पत्ता ठिपक्यांच्या स्वरूपात गोंदलेला असतो. सुरूवातीचे अनेक डब्बेवाले निरक्षर असल्याने ठिपक्यांच्या स्वरूपातील पत्ता त्यांना सोईचा होता. प्रत्येक स्टेशनवर त्या त्या ठिकाणचे डब्बे उतरवले जातात व वितरणासाठी स्थानिक डब्बेवाल्यांकडे देण्यात येतात. स्थानिक डब्बेवाले तत्काळ त्यांचे आपापल्या ठिकाणी वितरण करतात. जेवणे झाल्यावर रिकामे डब्बे गोळा करून ते पुन्हा परत पाठवण्यात येतात. हे सर्व अतिशय काटेकोर, वक्तशीरपणे व कमी मोबदला घेऊन करण्यात येते.ते डब्याचे वितरण करतांना कोणतेही प्रत्यक्ष इंधन खर्च करीत नाही.आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत नाही.त्यांची भांडवली गुंतवणुक अत्यल्प आहे.आपसात वाद अजिबात नाही.सुमारे २५० ते ३०० रु. या दराने ते सेवा पुरवितात.साधारणतः महिना ७००० रु. इतकी कमाई प्रत्येक डबेवाल्यास होते.
[संपादन] प्रणालीची अचूकता
डब्ब्यावाल्यांच्या प्रणालीत डब्बा चुकीच्या ठिकाणी पाठवण्याची शक्यता (Error rate) १.६ कोटी डब्ब्यात १ इतकी नगण्य असते. इतक्या अचूकतेमुळे प्रसिद्ध फोर्ब्स मॅगझीनने डब्बेवाल्यांच्या प्रणालीस सिक्स सिग्मा वर्गात स्थान दिले आहे. या वर्गात मोटोरोला, जनरल इलेक्ट्रिक अशा मातब्बर कंपन्यांचा समावेश आहे.
स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी, जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी यांच्यानुसार डब्बेवाले सायकलचा उपयोग करतात त्यामूळे ते त्यांचा इंधनाचा वापर शून्य टक्के, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शून्य टक्के, गुंतवणूक शून्य टक्के, वादविवाद शून्य टक्के, परिणाम शंभर टक्के, ग्राहक समाधान शंभर टक्के असे या डब्बेवाल्यांचे गणित मांडले आहे.[२]
[संपादन] संदर्भ
- ↑ फ्रेंच विकीवरील डब्बेवाल्यांचा लेख
- ↑ http://marathi.indiainfo.com/2008/06/21/0806211535_mumbai_dabbawala_shares_secret_success_dubai_accountants.html