स्वामी रामदास

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


स्वामी रामदास (१८८४ - १९६३) हे केरळमधील (सारस्वत) संत, तत्त्वज्ञ, लेखक व आध्यात्मिक गुरू होते.
पापा या नावानेही ते ओळखले जातात. तरुण वयातच सर्व-संगपरित्याग करून त्यांनी भारत-भ्रमण केले. भारतातील आपली यात्रा व वैश्विक प्रेमाच्या आपल्या संदेशाची प्रेरणादायक कहाणी त्यांनी विविध पुस्तकांतुन प्रस्तुत केली आहे. संपूर्ण भारत तसेच जगभर त्यांचे शिष्य व अनुयायी आहेत. अनेक मराठी संतांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता व अनेक मराठी भजने त्यांच्या आश्रमात गायली जातात. त्यांची अनेक पुस्तके मराठीत भाषांतरित झालेली आहेत.

जीवनपट[संपादन]

यांचा जन्म इ.स. १८८४त केरळ मधे हनुमान जयंतीच्या दिवशी झाला. सौ.ललिता बाई व श्री. बालकृष्ण राव हे त्यांचे आई-वडील सारस्वत ब्राम्हण होते. त्यांचे नाव विठ्ठलराव ठेवण्यात आले. ते बालपणी अत्यंत खोडकर असून शालेय शिक्षणात त्यांना फारशी रुची नव्हती. परंतु वाचन मात्र त्यांना आवडायचे.

मुंबईतील व्हि.जे.टी.आय. महाविद्यालयातून वस्त्रोद्योगाची पदवीका घेऊन त्यांनी कापड गिरणीत नोकरी सुरू केली. इ.स. १९०८ मधे त्यांचा रखमाबाई यांच्याबरोबर विवाह झाला. आर्थिक व कौटुंबिक अडचणींमधून आधारासाठी त्यांनी रामनामाचा जप सुरू केला. तदनंतर त्यांच्या वडिलांनी त्यांना १३ अक्षरी राम मंत्र ' श्री राम जय राम जय जय राम’ जपण्यास दिला. या मंत्रास ’ओम’ ने प्रारंभ केल्यास अधिक चांगला परिणाम होतो असे त्यांना अनुभवास आले.

लवकरच भौतिक सुखांपासुन विरक्ती घेऊन ते तीर्थयात्रा करण्यास निघाले. यात्रेदरम्यान त्यांनी ’रामदास’ हे नाव धारण केले व इतरांनी दिलेल्या दानावर आपला निर्वाह केला. (पैसे मात्र त्यांनी कधीही घेतले नाही). सगळे जग हे राम-रूप आहे व घडणारी प्रत्येक घटना रामाच्या इच्छेने घडते आहे असे ते मानत. त्याचबरोबर राममंत्राचा जप अहोरात्र सुरू असे.

इ.स. १९२२ साली त्यांची श्री. रमण महर्षि यांची भेट झाली व त्यांच्याकडुन अनुग्रह प्राप्त झाला. त्याचा परिणाम म्हणुन ते अरुणाचलावरील एका गुहेत २१ दिवसांच्या दी्र्घ एकांतवासात राहिले. गुहेतुन बाहेर आल्यानंतर ते ’सर्व काही रामच (ईश्वर) आहे , रामाशिवाय काहीही नाही’ या प्रचितीने भारून गेले होते. काही काळानंतर मंगळुर जवळ अशाच अतिंद्रीय अवस्थेत आपली व्यक्तिगत जाणीव पूर्णपणे पुसुन जाऊन, संपूर्ण अद्वैताचा अनुभव त्यांनी घेतला.

अनेक वर्षे भ्रमंती केल्यानंतर, १९३१ साली त्यांच्या भक्तांनी केरळमधील कन्हानगड येथे आनंदाश्रमाची स्थापना केली. स्थानिक लोकांच्या परिस्थितीत सुधारणा करण्याचे व्रत, पापांच्या सेवा व वैश्विक प्रेमाच्या तत्त्वांवर आजही सुरू आहे.

पापा रामदासांच्या प्रसिद्ध शिष्यांमध्ये माता कृष्णाबाई , स्वामी सत्चिदानंद , स्वामी मुद्रानंद व योगी रामसुरतकुमार यांचा समावेश आहे.

१९६३ साली त्यांनी देह ठेवला.

बोधवचने[संपादन]

प्रभुचे नाम काय करु शकते याची लोकांना कल्पना नसते. जे त्याचा अविरतपणे जप करतात, केवळ तेच त्याची शक्ती जाणतात. त्याने आपले चित्त पूर्णपणे शुद्ध होऊ शकते. नाम आपल्याला अध्यात्मिक अनुभवाच्या शिखरावर नेऊ शकते.

—स्वामी रामदास[१]

स्वतःला भगवंताच्या हातातील एक यंत्र म्हणून सोपवुन द्या आणि त्याला त्याचे कार्य त्याच्या मार्गाने करु द्या.

—स्वामी रामदास[२]

ज्याप्रमाणे फुल त्याचा सुगंध जवळ येणाऱ्या वा हातात घेणाऱ्या कोणासही देते , त्याचप्रमाणे आपल्या आतील प्रेम प्रत्येकापर्यंत उत्स्फुर्त सेवेच्या स्वरुपात प्रकट व्हायला हवे.

—स्वामी रामदास[३]

संदर्भ[संपादन]

  • The Essential Swami Ramdas

World Wisdom, 2005

  • Servant of God

Motilal Banarsidass, India, 1999

  • In the Vision of God vol 1

Blue Dove Press, 1994

  • In the Vision of God Vol. 2

Blue Dove Press, 1995

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ स्वामी रामदास The Essential Swami Ramdas, World Wisdom, 2005.
  2. ^ The Tribune, Reflections
  3. ^ The Times of India, SACRED SPACE: Caring and Sharing