जुल्फी शेख

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डाॅ जुल्फी शेख पूर्व विदर्भातील गोंदियाजवळच्या एका गावात मुस्लिम कुटुंबात जन्मल्या आणि ‘हब्बी-रब्बी जल्लला..’ असे म्हणत वाढलेल्या डॉ. जुल्फी शेख यांना ज्ञानेश्वरांच्या अध्यात्म विद्येचा वेध घ्यावासा वाटला. झपाटल्यागत त्यांनी ज्ञानेश्वरीची पारायणे केली. ही पारायणेही इतकी व्रतस्थ ठरली की संत ज्ञानेश्वरांच्या साहित्यावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला त्यांना डी. लिट. या सर्वोच्च पदवीने सन्मानित करावे लागले.. अशी पदवी मिळवणाऱ्या त्या देशातील एकमेव महिला होत्या. त्यांचे पती विज्ञानाचे प्राध्यापक होते.

केवळ संत ज्ञानेश्वरच नाहीत, तर एकूणच संत साहित्यच त्यांनी त्यातल्या जीवनमूल्यांच्या संदर्भासह वाचकांपुढे मांडले. डॉ. जुल्फी शेख या संवेदनशील कवयित्रीही होत्या.

‘शहा मुंतोजी ब्राह्मणी यांच्या काव्याचे मूल्यमापन’ या विषयावर त्यांना पीएच. डी. मिळाली.

भंडारा येथील रेवाबेन पटेल मनोहर महिला महाविद्यालयात त्या ३० वर्षे काॅलेजच्या प्राचार्य होत्या. नागपूर विद्यापीठाच्या आणि गोंडवाना विद्यापीठाच्या त्या प्राध्यापक परिषदेच्या अध्यक्षा होत्या.

‘श्री ज्ञानेश्वर आणि शहा मृत्युंजय यांच्या काव्याचा तौलनिक अभ्यास’ या शोधनिबंधासाठी नागपूर विद्यापीठाने त्यांना डी. लिट. देऊन गौरवले.

मौलाना अब्दुल करीम पारेख यांच्याद्वारे अनुवादित 'पुरान-ए शरीफ'च्या अनुवादात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता.

उर्दू, अरबी व हिंदी गझलांचा त्यांचा व्यासंग होता. ‘गालीब-ए-गजम्ल’ (पत्रानुवाद ) हा त्यांचा ४०० पानी ग्रंथ सखोल अभ्यासकाची ओळख करून देणारा आहे. त्यांनी आपली लेखणी व वाणीने नेहमी हिंदू-मुस्लिमांमध्ये भेदभावाच्या भिंती उभ्या करणाऱ्यांवर कठोर प्रहार केला. त्या आपले आयुष्य अतिशय वैशिष्ट्यपूर्ण रीतीने जगल्या, परंतु कर्करोगाने त्यांना गाठले अन् मृदु वाणीच्या आणि शालीन व्यक्तिमत्त्वाची ही कवयित्री जानेवारी २०२१मध्ये वयाच्या ६६ व्या वर्षी नाफरनगर येथे निधन पावली.


डाॅ. जुल्फी शेख यांची साहित्य संपदा[संपादन]

  • अक्षरवेध (काव्यसंग्रह)
  • उर्दू गालिब ए गजल
  • मी कोण? (काव्यसंग्रह)
  • नवे प्रवाह : नवे स्वरूप (साहित्य समीक्षा)
  • मधुशाळा (हरिवंशराय बच्चन यांच्या पुस्तकाचा मराठी अनुवाद)
  • मुस्लिम मराठी कविता
  • मृत्युंजय (काव्यसमीक्षा)
  • बहादूरशहा जफर यांची राष्ट्रभक्ती
  • रुमच्या कथा (बालवाङ्मय) आदी साहित्यसंपदा त्यांच्या नावावर आहे.
  • श्री ज्ञानेश्वरांचा वाङ्मयीन वारसा
  • ‘गालीब-ए-गजम्ल’ (पत्रानुवाद )(४०० पानी पुस्तक)

संमेलनाध्यक्षपद[संपादन]

पुरस्कार[संपादन]

  • महाराष्ट्र सरकारचा आदर्श शिक्षक पुरस्कार.
  • कस्तुरबा गांधी पुरस्कार
  • जनसारस्वत पुरस्कार
  • लोकमित्र पुरस्कार
  • साहित्यभूषण पुरस्कार