छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शिवाजी महाराजांचा पोवाडा - शाहिर: महात्मा ज्योतिबा फुले चौक १ कुळवाडी-भूषण पवाडा गातो भोसल्याचा । छत्रपती शिवाजीचा ॥ध्रु०॥ लंगोटयांस देई जानवीं पोषींदा कूणब्याचा । काल तो असे यवनांचा ॥ शिवाजीचा पिता शहाजी पुत्र मालोजीचा । असे तो डौल जहागिरीचा ॥ पंधराशें एकूणपन्नास साल फळलें । जुन्नर तें उदयासी आलें ॥ शिवनेरी किल्ल्यामध्यें बाळ शिवाजी जन्मलें । जिजीबाईस रत्न सांपडलें ॥ हातापायांचीं नखं बोटं शुभ्र प्याजी रंगीलें । ज्यांनीं कमळा लाजिवलें ॥ वरखालीं टिर्याख पोटर्याय गांठी गोळे बांधले । स्फटिकापरि भासले ॥ सान कटी सिंहापरी छाती मांस दुनावलें । नांव शिवाजी शोभलें ॥ राजहौंसी उंच मान माघें मांदे दोंदीलें । जसा का फणीवर डोले ॥ एकसारखे शुभ्र दंत चमकूं लागले । मोतीं लडीं गुंतविलें ॥ रक्तवर्ण नाजूक होटीं हासूं छपिवले । म्हणोन बोबडें बोले ॥ सरळ नीट नाक विशाळ डोळ्या शोभलें । विषादें मृग वनीं गेले ॥ नेत्र तीखे बाणी भवया कमठे ताणीले । ज्यांनी चंद्रा हाटिवलें ॥ सुंदर विशाळ भाळवटी जावळ लोंबलें । कुरळे केंस मोघीले ॥ आजानबाहू पायांपेक्षां हात लांबलेले । चिन्ह गादिचें दिसलें ॥ जडावाचीं कडीं तोडे सर्व अलंकार केले । धाकटया बाळा लेविवलें ॥ किनखाबी टंकोचें मोतीं घोसानें जडलें । कलाबतुचे गोंडे शोभले ॥ लहान कुंची पैरण बिरडी बंद लावले । डाग लाळीचे पडलेले ॥ हातापायांचे आंगठे चोखी मुखामधी रोळे । पायीं घुंगरुं खुळखुळे ॥ मारी पाठोपाठ लाथाबुक्या आकाश शोभले । खेळण्यावर डोळे फिरवीले ॥ मजवर हा कसा खेळणा नाहीं आवडले । चिन्ह पाळणीं दिसलें ॥ टाहीपेटे रडूं लागला सर्व घाबरले । पाळण्या हलवूं लागले ॥ धन्य जिजाबाई जिनें जो जो जो जो जो केलें । गातों गीत तिनें केलें ॥ चाल जो जो जो जो जो जो गाऊ, जी जी जी जी जीजी गाऊं । चला वेरुळास जाऊं, दौलताबादा पाहूं ॥ मूळ बाबाजीस ध्याऊं, कीर्ति आनंदाने गाऊं । सरदारांत उमराऊ, सोबतीस जाधवराऊ ॥ पाटील होते गांवोगाऊ, पुत्रावरी अती जीऊ । थोर विठोजी नांव घेऊं, सान मालोजी त्याचा भाऊ । दीपाबाई त्यास देऊं, छंदाजोगा गिती गाऊं ॥ चाल मालोजी राजा । तुझा बा आजा ॥ यवनी काजा । पाळिल्या फौजा ॥ लाविल्या ध्वजा । मारिल्या मौजा ॥ वेळेस मुक्का । साधल्या बुक्का ॥ विचारी पक्का । जाधवा धक्का ॥शेशाप्पा नायका । ठेविचा पैका । द्रव्याची गर्दी । चांभारगोंदी ॥ देवळें बांधी । तळीं ती खांदी ॥ आगळी बुद्धि । गुणानें निधि ॥ लिहिलें विधि । लोकांस बोधी ॥ संधान साधी । जसा पारधी ॥ भविषी भला । कळलें त्याला ॥ सांगोनी गेला । गादी बा तुला ॥ चाल उपाय नाहीं जाणोन चाकर झाला यवनाचा । शिपाई होता बाणीचा ॥ खोटया दैवा कोण खोडी बेत देवाजीचा । पवाडा गातो शिवाजीचा ॥ कुळवाडी-भूषण पवाडा गातो भोसल्याचा । छत्रपती शिवाजीचा ॥१॥ चौक २ वडील बंधु संभाजीनें लळे पुरवीले । धाकटयासवें खेळले ॥ उभयतांचें एक चित्त तालमींत गेले । फरीगदग्या शिकले ॥ आवडीनें खमठोकीं कुस्ती पेंचानें खेळे । पवित्रे दस्तीचे केले ॥ द्वादशवर्षी उमर आली नाहीं मन धालें । घोडी फिरवूं लागले ॥ आट्टल घोडेस्वार भाला बोथाटी शीकले । गोळी निशान साधले ॥ कन्या वीर जाधवाची जिनें भारथ लावलें । पुत्रा नीट ऐकविलें ॥ अल्पवयाचे असतां शिकार करुं लागले । माते कौतुक वाटलें ॥ नित्य पतीचा आठव डोंगर दुःखाचे झाले । घर सवतीनें घेतले ॥ छाती कोट करून सर्व होतें साटिवलें । मुखमुद्रेनें फसविले ॥ चतुर शिवाजीनें आईचें दुःख ताडिले । पित्यास मनीं त्यागिले ॥ पुत्राचे डोळे फिरले माते भय पडलें । हीत उपदेशा योजिलें ॥ मनीं पतिभक्ति पुता बागेमधीं नेलें । वृक्षछायीं बसीवलें ॥ पूर्वजांचे स्मरण करून त्यास न्याहाळीलें । नेत्रीं पाणी टपटपलें ॥ या क्षेत्राचे धनी कोणकोणी बुडविले । सांगतें मुळीं कसें झालें ॥ क्षेत्रवासी म्हणोन नांव क्षत्रिय धरलें । क्षेत्रीं सुखी राहिले ॥ अन्यदेशिचे दंगेखोर हिमालयीं आले । होते लपून राहिले ॥ पाठीं शत्रु भौती झाडी किती उपासी मेले । गोमासा भाजून धाले ॥ पाला फळें खात आखेर ताडपत्रा नेसले । झाडी उल्लंघून आले ॥ लेखणीचा धड शीपाया सैनापति केलें । मुख्य ब्रह्मा नेमलें ॥ बेफाम क्षत्रिय होते अचूक टोळ उतरले । कैदी सर्वांस केलें ॥ सर्व देशीं चाल त्याचें गुलाम बनीवले । डौलानें क्षुद्र म्हणाले ॥ मुख्य ब्रह्म राजा झाला जानें कायदे केले । त्याचे पुढें भेद केले ॥ ब्रह्मा मेल्यावर परशराम पुंड माजले । उरल्या क्षत्रिया पिडीले ॥महारमांग झाले किती देशोधडी केले । ब्राह्मण चिरंजीव झाले ॥ देश निक्षत्रिय झाल्यामुळें यवना फावलें । सर्वांस त्यांहीं पिडीलें ॥ शुद्र म्हणती तुझ्या हृदयीं बाण टोचले । आज बोधाया फावलें ॥ गाणें गातें ऐक बाळा तुझ्या आजोळीं शिकले । बोलीं नाहीं मन धालें । चाल क्षेत्र क्षत्रियांचें घर, तुझे पितृ माहावीर । सुखा नसे त्यांच्या पार, आल्या गेल्याचें माहेर ॥ शीखराकार डोंगर, नानावल्ली तरुवर ॥ परीं खोरीं वाहे नीर खळखळे निरंतर । झाडा फुलें झाला भार, सुगंधी वाहे लहर । पक्षी गाती सोळा स्वर, मंजूळ वाणी मनोहर ॥ नदी नाले सरोवर, शोभे कमळांचा भार । भूमी अती काळसर, क्षेत्र देई पीका फार ॥ धाव घेती दंगेखोर, दिला क्षेत्रियास मार । दास केले निरंतर, ब्रह्मा झाला मनीं गार ॥ लोभी मेले येथें फार, विधवा झाल्या घरोघर । उपाय नाहीं लाचार, स्त्रिया वंदी पाटावर ॥ दुसरा झाला शीरजोर, परशा तोबा कठोर । मार त्याचा अनीवार, केला क्षत्रियां संव्हार ॥ क्षत्रिय केले जरजर, भये कांप थरथर । दुःखा नाहीं त्यांच्या पार, ठाव नाहीं निराधार ॥ बहु केले देशापर, बाकी राहि मांगमाहार । निःक्षेत्रीं झाल्यावर, म्लेंच्छें केलें डोकें वर । आले सिंधुनदावर, स्वाऱ्याि केल्या वारोंवार । गातें कटावांत सार, लक्ष देई अर्थावर । चाल काबुला सोडी । नदांत उडी ॥ ठेवितो दाढी । हिंदूस पीडी ॥ बामना बोडी । इंद्रियें तोडी ॥ पिंडीस फोडी । देवळें पाडी ॥ चित्रास तोडी । लेण्यास छेडी ॥ गौमांसी गोडी । डुकरां सोडी ॥ खंडयास ताडी । जेजूरी गडी ॥ भुंग्यास सोडी । खोडीस मोडी ॥ मूर्तीस काढी । काबूला धाडी ॥ झाडीस तोडी । लुटली खेडीं ॥ गडास वेढी । लावली शीडी ॥ हिंदूस झोडी । धर्मास खोडी ॥ राज्यास बेडी । कातडी काढी ॥ गर्दना मोडी । कैलासा धाडी ॥ देवळें फोडी । बांधीतो माडी ॥ उडवी घोडी । कपाळा आढी ॥ मीजास बडी । ताजीम खडी ॥ बुरखा सोडी । पत्नीखस पीडी ॥ गायनीं गोडी । थैलीतें सोडी ॥ चाल माताबोध मनीं हसतां राग आला यवनांचा । बेत मग केला लढण्याचा ॥ तान्हाजी मालुसरे बाजी फसलकराचा । स्नेह येशजी कंकाचा ॥ मित्रा आधीं ठेवी जमाव केला मावळ्यांचा । पूर करी हत्यारांचा ॥ मोठया युक्तीनें सर केला किल्ला तोरण्याचा । रोविला झेंडा हिंदूचा ॥ राजगड नवा बांधला उंच डोंगराचा । भ्याला मनीं विजापुरचा । दुसरा भ्याला मेला बेत नव्हता पूर्वीचा । दादोजी कोंडदेवाचा ॥ मासा पाणीं खेळे गुरू कोण असे त्याचा । पवाडा गातो शिवाजीचा ॥ कुळवाडी-भूषण पवाडा गातो भोसल्याचा । छत्रपती शिवाजीचा ॥२॥ चौक ३ जाहागीरचा पैसा सारा लावी खर्चास । चाकरी ठेवी लोकांस ॥ थाप देऊन हातीं घेई चाकण किल्ल्यास । मुख्य केले फिङ्‌र्गोजीस ॥ थोडया लोकांसहीत छापा घाली सुप्यास । कैद पहा केलें मामास ॥ सुप्यासोबत हातीं घेतलें तीनशें घोडयास । करामत केली रात्रीस ॥ मुसलमानां लाच देई घेई कोंडाण्यास । सिंहगड नांव दिलें त्यास ॥ पुरंधरी जाई जसा भला माणूस न्यायास । कैद पहा केलें सर्वांस ॥ गांव इनाम देऊन सर्वां ठेवी चाकरीस । मारलें नाहीं कोणास ॥ वाटेमधीं छापा घालून लुटी खजीन्यास । सांठवी राजगडास ॥ राजमाचीं लोहगडीं लढे घेई तिकोण्यास । बाकी चार किल्ल्यांस ॥ मावळ्यांस धाडी कोकणीं गांव लुटायास । धूर्त योजी फितूरास ॥ सन्मान कैद्यां देई पाठवि वीजापूरास । मुलान्या सुभेदारास ॥ विजापुरीं मुसलमाना झाला बहु त्रास । योजना केली कपटास ॥ करनाटकीं पत्र पाठवी बाजी घोरपडयास । कैद तुम्ही करा शहाजीस ॥ भोजनाचें निमित्त केलें नेलें भोसल्यास । दग्यानें कैद केलें त्यास ॥ थेट शहाजी कैदी आणिला विजापूरास । खुशी मग झाली यवनास ॥ चिरेबंदी कोठडीमध्यें बंद केलें त्यास । ठेविलें भोक वाऱ्यास ॥ शहाजीला पिडा दीली कळलें शिवाजीस । ऐकून भ्याला बातमीस ॥ पिताभक्ति मनीं लागला लागला शरण जायास । विचारी आपला स्त्रियेस ॥ साजे नांव सईबाई स्त्री सुचवी पतीस । ताडा दंडीं दुसमानास ॥ स्त्रीची सुचना सत्य भासली लिहिलें पत्रास । पाठवी दिल्ली मोगलास ॥ चाकर झालों तुमचा आतां येतों चाकरीस । सोडवा माझ्या पित्यास ॥ मोलग थैली गेली थेट मुसलमानास ठेविले किल्ल्यावर त्यास ॥ बाजी शामराज का लाजला जात सांगायास । धरुं पाही शिवाजीस ॥ धेड म्हणावा नाक नाही द्यावा कोणास । अडचण झाली बखरीस ॥ सिद्धिस बेत गेला नाहीं अंतीं भ्याला जिवास । काळें केलें महाडास ॥ शाहाजीचा बाजी आखेर घेईल बक्षीस । हा पाजी मुकला जातीस ॥ करनाटकीं आज्ञा झाली शाहाजीस । यवन भ्याला सिंहास ॥ वर्षे चार झालीं शिवला नाहीं कबजास । पिताभक्ति पुत्रास ॥ चंद्रराव मोर्यास मारी घेई जावळीस । दुसरे वासोटा किल्ल्यास ॥ प्रतापगड बांधी पेशवा केला एकास । नवे योजी हुद्यास ॥ आपली बाकी काढी धाडी पत्र तगाद्यास । चलाखी दावी मोंगलांस ॥ रात्रीं जाऊन एकाएकीं लुटी जुन्नरास । पाठवी गडी लुटीस ॥ आडमाग करी हळूंच गेला नगरास । लुटी हत्तीघोडयांस ॥ उंच वस्त्रे, रत्नेंु होन कमती नाहीं द्रव्यास । चाकरि ठेवि बारगिरांस ॥ समुद्रतीरीं किल्ले घेई पाळी गलबतांस । चाकरी ठेवि पठाणास ॥ सिद्दि पेशव्या आपेश देई घेई यशास । उदासी लाभ शिवाजीस ॥ आबझूलखान शूर पठाण आला वांईस । शोभला मोठा फौजेस ॥ हातीं बारा हजार घोडा त्याचे दिमतीस । कमी नाहीं दारुगोळीस ॥ कारकुनाला वचनीं दिलें हिवरें बक्षीस । फितविलें लोभी ब्राह्मणांस ॥ गोपीनाथ फसवी पठाणा आणि एकांतास । चुकला नाहीं संकेतास ॥ मातेपायीं डोई ठेवी, लपवी इत्यारास । बरोबर आला बेतास ॥ समीप येतां शिवाजी जसा भ्याला व्याघ्रास । कमी करी आपल्या चालीस ॥ गोपीनाथ सुचना देई भोळ्या यवनास । भ्याला तुमच्या शिपायांस ॥ वर भेटभाव वाघनख मारीं पोटास । भयभित केलें पठाणास ॥ पोटीं जखम सोसी केला वार शिवाजीस । झोंबती एकमेकांस ॥ हातचलाखी केली बिचवा मारी शत्रूस । पठाण मुकला प्राणास ॥ स्वामीभक्ती धाव घेई कळले शिपायास । राहिला उभा लढण्यास ॥ त्याची धोप घेई शिवाजी बचवी आपल्यास । तान्हाजी भिडे बाजूस ॥ दांती दाढी चावी तोडी घेई धनी सूडास । घाबरें केलें दोघांस ॥नांव सय्यदबंधू साजे शोभा आणी बखरीस । लाथाळी जीवदानास ॥ तान्हाजीला हूल देई मारी हात शिवाजीस । न्याहाळी प्रेतीं धण्यास ॥ उभयतांसीं लढतां मुकला आपल्या प्राणास । गेला जन्नत स्वर्गास ॥ छापा घाली मारी करी कैद बाकी फौजेस । पठाणपुत्र खाशा स्त्रियेस ॥ चार हजार घोडा लूट कमी नाहीं द्रव्यास । दुसऱ्याख सरंजामास ॥ अलंकार वस्त्रें देई सर्व कैदी जखम्यांस । पाठवि विजापूरास ॥ वचनीं साचा शिवाजी देई हिवरें बक्षीस । फितुर्या गोपीनाथास ॥ नाचत गात सर्व गेले प्रतापगडास । उपमा नाहीं आनंदास ॥ चाल शिवाचा गजर जयनामाचा झेंडा रोविला ॥ क्षेत्र्याचा मेळा मावळ्याचा शिकार खेळला ॥ मातेपायीं ठेवी डोई गर्व नाहीं काडीचा । आशिर्वाद घेई आईचा ॥ आलाबला घेई आवडता होता जिजीचा । पवाडा गातो शिवाजीचा ॥ कुळवाडी-भूषण पवाडा गातो भोसल्याचा । छत्रपती शिवाजीचा ॥३॥ चौक ४ लढे रांगणीं विशाळगडीं घेई पन्हाळ्यास । केले मग शुरु खंडणीस ॥ रुस्तुल जमाना आज्ञा झाली विजापूरास । नेमिला कोल्हापूरास ॥ स्वार तीन हजार घेई थोडया पायदळास । आला थेट पन्हाळ्यास ॥ मार देत शिवाजी पिटी कृष्णा पैलतडीस । अती जेर केलें त्यास ॥ खंडणी घेत गेला भिडला विजापूरास । परत मग आला गडास ॥ राजापुर दाभोळ लुटी भरी खजीन्यास । मात गेली विजापुरास ॥ सिद्दी जोहरा नेमी मोठी फौज दिमतीस । सावंत सिद्दी कुमकेस ॥ बंदोबस्त करी शिवाजी राही पन्हाळ्यास । करी मग जमा बेगमीस ॥ वारंवार छापे घाली लुटी भौंती मुलखास । केलें महाग दाण्यास ॥ त्रासानें खवळून वेढा घाली शिवाजीस । कोंडिले गडीं फौजेस ॥ चार मास लोटले शिवाजी भ्याला वेढयास । योजना करी उपायास ॥ कोंकणामधीं सिद्दी झोडी रघुनाथास । उपद्रव झाला रयतेस ॥ फासलकर बाजीराव पडले वाडीस । दुःख मग झालें शिवाजीस ॥ सिद्दी जोहरा निरोपानें गोंवी वचनास । खुशाल गेला भेटीस ॥ वेळ करून गेला उरला नाहीं आवकास । कच्चा मग ठेवी तहास ॥ सिद्दीस लाडी गोडी मधी मान डुकलीस । गेला थाप देऊन गडास ॥ सिद्धया पोटीं खुष्याली जाई झोपीं सावकास । हयगय झाली जप्तीस ॥ तों शिवाजी पळून गेला घेई पाठी रात्रीस । फसविलें मुसलमानास ॥ सिद्दी सकाळीं खाई मनीं लाडू चुरमुर्या्स । स्वार दळ लावी पाठीस ॥ चढत होता खिंड शिवाजी गांठलें त्यास । बंदुका लावी छातीस ॥ बाजीपरभु मुख्य केला ठेवि मावळ्यास । एकटा गेला रांगण्यास ॥ स्वामीला वेळ दिला बाजी भिडला शत्रूस । हरवी नित्य मोगलास ॥ दोन प्रहर लढे वाट दिली नाहीं त्यास । धन्य त्याच्या जातीस ॥ मोठी मोगल फौज दाखल झाली साह्यास । खवळला बाजी युद्धास ॥ अर्धे लोक उरले सरला नाहीं पाउलास । पडला परभू भूमीस ॥तो शिवाजी सुखी पोहंचला कान सुचनेस । अंती मनीं हाच ध्यास ॥ बार गडीं ऐकून सुखी म्हणे आपल्यास । नीघून गेला स्वर्गास ॥ सय्यद मागें सरे जागा देई बाजीरावास । पाहून स्वामीभक्तीस ॥ विजापुरीं मुसलमान करी तयारीस । खासा आला लढण्यास ॥ कराडास डेरे दिले घेई बहू किल्ल्यांस । वश करी चाचे लोकांस ॥ दळव्यासीं लडून घेई शृंगारपुरास । मारलें पाळेगारांस ॥ लोकप्रीतिकरितां करी गुरू रामदासास । राजगडीं स्थापी देवीस ॥ मिष्ट अन्न भोजन दिलें सर्वां बक्षीस । केली मग मोठी मजलस ॥ तानसैनी भले गवय्या बसवी गायास । कमी नाहीं तालस्वरास ॥ चाल जीधर उधर मुसलमानी । बीसमिलाही हिंमानी ॥ सच्चा हरामी शैतान आया । औरंगजीब नाम लिया ॥ छोटे भाइकूं कैद हूल दिया । बडे भाईकी जान लिया ॥ छोटेकूंबी कैद किया । लोक उसके फितालिया ॥ मजला भाई भगा दिया । आराकानमें मारा गया ॥ सगे बापकूं कैद किया । हुकमत सारी छिनलीया ॥ भाईबंदकूं इजा दिया । रयत सब ताराज किया ॥ मार देके जेर किया । खाया पिया रंग उडाया ॥ आपण होके बेलगामी । शिवाजीकू कहे गुलामी ॥ आपण होके ऐशआरामी । शिवाजीकूं कहे हरामी ॥ बरे हुवा करो सलामी । हिंदवाणी गाव नामी ॥ चाल आदी आंत न । सर्वां कारण ॥ जन्ममरण । घाली वैरण ॥ तोच तारण । तोच मारण ॥ सर्व जपून । करी चाळण ॥ नित्य पाळण । लावी वळण ॥ भूतीं पाहून । मनीं ध्याईन ॥ नांव देऊन । जगजीवन ॥ सम होऊन । करा शोधन ॥ सार घेऊन । तोडा बंधन ॥ चाल सरनौबती डंका हुकूम पालेकराचा । घेई मुजरा शाईराचा ॥ सुखसोहळे होतां तरफडे सावंत वाडीचा । पवाडा गातो शिवाजीचा ॥ कुळवाडी-भूषण पवाडा गातो भोसल्याचा । छत्रपती शिवाजीचा ॥४॥ चौक ५ सावंत पत्र लिही पाठवी विजापूरास । मागे फौज कुमकेस ॥ बाजी घोरपडा बल्लोळखान येती साह्यास । शिवाजी करी तयारीस ॥ त्वरा करून गेला छापा घाली मुधोळांस । मारिलें बाजी घोरपडयास ॥ भाऊबंद मारिलें बाकी शिपाई लोकांस । घेतलें बाप सूडास ॥ सावंताची खोड मोडून ठेवी चाकरीस । धमकी देई पोर्च्युग्यास ॥ नवे किल्ले बांधी डागडुजी केली सर्वांस । बांधिलें नव्या जाहाजास ॥ जळीं सैनापती केले ज्यास भीती पोर्च्युग्यीस । शोभला हुद्दा भंडार्याीस ॥ विजापूरचा वजीर गुप्त लिही शिवाजीस । उभयतां आणलें एकीस ॥ व्यंकोजी पुत्रा घेई शाहाजी आला भेटीस । शिवाजी लागे चरणास ॥ शाहाजीचे सद्‌गुण गाया नाहीं आवकास । थोडेसे गाऊ अखेरीस ॥ सुखसोहळे झाले उपमा लाजे मनास । उणें स्वर्गी सुखास ॥ अपूर्व वस्तू घेऊन जाई विजापूरास । भेट मग देई यवनास ॥ पराक्रमी शिवाजी पाळी पाऊण लक्षास । साजे यवनी स्नेहास ॥ विजापूरचा स्नेह होता लढे मोगलास । घेतले बहूतां किल्ल्यास ॥ सर्व प्रांतीं लूट धुमाळी आणिलें जेरीस । घावरें केलें सर्वांस ॥ संतापानें मोंगल नेमी शाइस्तेखानास । जलदि केली घेई पुण्यास ॥ चाकणास जाऊन दावी भय फिङ्‌र्गोजीस । फुकट मागे किल्ल्यास ॥ मास दोन लढला घेऊन सर्व फौजेस । खान खाई मनास ॥ अखेर दारु घालून उडवी एका बुर्जास । वाट केली आंत जायास ॥ वारोंवार हल्ले गर्दी करुं पाहे प्रवेश । शाइस्ता पठाण पाठीस ॥ मागें पळति सर्व कोणी मानिना हुकूमास । भीति आंतल्या मर्दास ॥ लागोपाठ मार देत हटवि पठाणास । खचला खान हिंमतीस ॥ प्रातःकाळीं संतोषानें खाली केले किल्ल्यास । देई मुसलमानास ॥ फिङर्गोजीला भेट देती खुषी झाली यवनास । देऊन मान सोडी सर्वांस ॥ शिवाजीची भेट घेतां सन्मान दिला त्यास । वाढवी मोठया पदवीस ॥ फिड्‌र्गोजीचें नांव घेतां मनीं होतो उल्हास । पीढीजाद चाकरीस ॥ येशवंतशिंग आले घेऊन मोठया फौजेस । मदत शाईस्तेखानास ॥ सरनौबत भौती लुटी नगरी मुलखास । जाळून पाडिला ओस ॥ पाठी लागून मोंगल भारी त्याच्या स्वारांस । जखमा केल्या नेटाजीस ॥ राजगड सोडून राहीला सिंव्हगडास पाहून मोगलसेनेस ॥ जिजाबाईचें मुळचें घर होतें पुण्यास । खान राही तेथें वस्तीस ॥ मराठयांस चौकी बंदी गांवांत शिरण्यास । होता भीत शिवाजीस ॥ लग्नवर्हाचडी रुपें केला पुण्यांत प्रवेश । मावळे सोबत पंचवीस ॥ माडीवर जाऊन फोडी एका खिडकीस । कळालें घरांत स्त्रीयांस ॥ शाइस्त्यास कळतां दोर लावी कठडयास । लागला खालीं जायास ॥ शिवाजीनें जलदी गांठून वार केला त्यास । तोडीलें एका बोटास ॥ स्त्रिपुत्रां सोडून पळे पाठ दिली शत्रूस । भित्रा जपला जिवास ॥ आपल्या पाठिस देणें उणें शिपायगिरीस । उपमा नाहीं हिजडयास ॥ सर्व लोकांसहित मारिलें खानपुत्रास । परतला सिंहगडास ॥ डौलानें मोंगल भौती फिरवी तरवारीस । दावी भय शिवाजीस ॥ समीप येऊं दिले हुकूम सरबत्तीस । शत्रू पळाला भिऊन मारास ॥ करनाटकी बदली धाडी शाइस्तेखानास । मुख्य केलें माजमास ॥ राजापुरीं जाई शिवाजी जमवी फौजेस । दावी भय पोर्च्यूग्यास ॥ सर्व तयारी केली निघाला नाशिक तीर्थास । हुल कसी दिली सर्वांस ॥ मध्यरात्रीं घेई बरोबर थोडया स्वारांस । दाखल झाला सुर्तेस ॥ यथासांग साहा दिवस लुटी शहरास । सुखी मग गेला गडास ॥ बेदनूराहून पत्र आलें देई वाचायास । आपण बसे ऐकायास ॥ शिपायाचे बच्चे शाहाजी गेले शिकारीस । लागले हरणापाठीस ॥ घोडया ठेंच लागे उभयतां आले जमीनीस । शाहाजी मुकला प्राणास ॥ पती कैलासा गेले कळलें जिजीबाईस । पार मग नाहीं दुःखास ॥ भुमी धडपडे बैसे रडून गाई गुणांस । घेई पुढे शिवाजीस ॥ चाल अतीरुपवान बहु आगळा । जैसा रेखला चित्री पूतळा ॥ सवतीवर लोटती बाळा । डाग लाविला कुणबी कुळा ॥ सवतीला कसें तरी टाळा । कज्जा काढला पती मोकळा ॥ खऱ्याा केंसानें कापि का गळा । नादीं लागला शब्द कोकिळा ॥ मूख दुर्बळ राही वेगळा । अती पिकला चिंतेचा मळ ॥ झाला शाहाजी होता सोहळा । मनीं भूलला पाहूनी चाळा ॥ बहुचका घेती जपमाळा । जाती देऊळा दाविती मोळा ॥ थाट चकपाक नाटकशाळा । होती कोमळा जशा निर्मळा ॥ खऱ्याा डंखिणी घाली वेटोळा । विषचुंबनीं देती गरळा ॥ झाला संसारीं अती घोटाळा । करी कंटाळा आठी कपाळा ॥ मनीं भिऊन पित्याच्या कुळा । पळ काढला गेले मातुळा ॥ छातीवर ठेवल्या शिळा । नाहीं रुचला सवत सोहळा ॥ चाल कमानीवर । लावले तीर ॥ नेत्रकटार । मारी कठोर ॥ सवदागर । प्रीत व्यापार ॥ लावला घोर । सांगतें सार ॥ शिपाई शूर । जुना चाकर ॥ मोडक्या धीर । राखी नगर ॥ आमदानगर विजापूरकर ॥ मंत्री मुरार ॥ घेई विचार ॥ वेळनसार । देई उत्तर ॥ धूर्त चतुर । लढला फार ॥ छाती करार ॥ करी फीतूर ॥ गुणगंभीर । लाविला नीर ॥ होता लायक । पुंडनायक ॥ स्वामीसेवक । खरा भाविक ॥ चाल सिंहगडावर गेला बेत केला क्रियेचा । बजावला धर्म पुत्राचा ॥ रायगडी जाई राही शोक करी पित्याचा । शत्रु होता आळसाचा ॥ दुःखामधीं सुरू बंदोबस्त करी राज्याचा । पवाडा गातो शिवाजीचा ॥ कुळवाडी-भूषण पवाडा गातो भोसल्याचा ॥ छत्रपती शिवाजीचा ॥५॥ चौक ६ सर्व तयारी केली राजपद जोडी नांवास । शिक्का सुरू मोर्तबास ॥ अमदानगरीं नटून पस्त केलें पेठेस । भौतीं औरंगाबादेस ॥ विजापूरची फौज करी बहुत आयास । घेई कोकणपट्टीस ॥सावध शिवाजी राजे आले घेऊन फौजेस । ठोकून घेई सर्वांस ॥ जळीं फौज लढे भौती मारी गलबतास । दरारा धाडी मक्केस ॥ माल्वणीं घेऊन गेला अवचित फौजेस । पुकारा घेतो मोगलास ॥ जाहाजावर चढवी फौज गेला गोव्यास । लुटलें बारशिलोरास ॥ जलदी जाऊन गोकर्णी घेई दर्शनास । लुटलें मोंगल पेठांस ॥ पायवाटेनें फौज पाठवी बाकी लुटीस । आज्ञा जावें रायगडास ॥ स्वतां खासी स्वारी आज्ञा लोटा जाहाजास । निघाला मुलखीं जायास ॥ मोठा वारा सुटला भ्याला नाहीं तुफानास । लागले अखेर कडेस ॥ औरंगजीब पाठवी राजा जयशिंगास । दुसरे दिलीरखानास ॥ ठेवले मोगल अमीर येऊन पुण्यास । वेढिलें बहुतां किल्ल्यांस । मानकरी शिवाजी घेई बसे मसलतीस । सुचेना कांहीं कोणास ॥ बाजी परभू भ्याला नाहीं दिलीरखानास । सोडिलें नाहीं धैर्यास ॥ हेटकरी मावळे शिपाइ होते दिमतीस । संभाळी पुरंधरास ॥ चातुर्यानें लढे गुंतवी मोगल फौजेस । फुरसत दिली शिवाजीस ॥ फार दिवस लोटले पेटला खान इर्षेस । भिडला किल्लया माचीस ॥ बुर्जाखालीं गेला लागे सुरंग पाडायास । योजी अखेर उपायास ॥ हेटकरी मावळे जाती छापे घालण्यास । पिडीलें फार मोगलास ॥ मोगलाने श्रम केले बेत नेला सिद्धीस । काबीज केलें माचीस ॥ यशस्वी भोसले लागले निर्भय लुटीस । चुकले सावधपणास ॥ हेटकर्यांसचा थाटनी मारी लुटार्यावस । मोगल हटले नेटास ॥ बाजी मावळ्यां जमवी हातीं घेई खांडयास । भिडून मारी मोगलास ॥ मोगल पळ काढी पाठ दिली मावळ्यास । मर्द पहा भ्याले उंद्रास ॥ लाजे मनीं दिलीरखान जमवी फौजेस । धीर काय देई पठाणास ॥ सर्व तयारी पुन्हा केली परत हल्ल्यास । जाऊन भिडला मावळ्यास ॥ बाजी मार देई पठाण खचले हिमतीस । हटती पाहून मर्दास ॥ पराक्रम बाजीचा पाही खान खोच मनास । लावीला तीर कमानीस ॥ नेमानें तीर मारी मुख्य बाजी परभूस । पाडिला गबरु धरणीस ॥ सय्यद बाजी ताजीम देती घेती बाजूस । सरले बालेकिल्ल्यास ॥ मोगल चढ करती पुन्हा घेती माचीस । धमकी देती मावळ्यास ॥ हेटकरी मारी गोळी फेर हटवि शत्रूस । पळवी इशानी कोणास ॥ वज्रगडाला शिडी लाविली आहे बाजूस । वरती चढवी तोफांस ॥ चढला मोगल मारी गोळे बालेकिल्ल्यास । आणले बहू खराबीस ॥ हेटकरी मावळे भ्याले नाहीं भडिमारास । मोगल भ्याला पाऊसास ॥ मोगल सल्ला करी शिवाजी नेती मदतीस । घेती यवनी मुलखास ॥ कुलद्रोही औरंगजीब योजी कपटास । पाठवि थैली शिवाजीस ॥ शिवाजीला वचन देऊन नेई दिल्लीस । नजरकैद करी त्यास ॥ धाडी परत सर्व मावळे घोडेस्वारांस । ठेविले जवळ पुत्रास ॥ दरबार्यांस घरीं जाई देई रत्नव भेटीस । जोडिला स्नेह सर्वांस ॥ दुखणें बाहाणा करी पैसा भरी हकीमास । गूल पहा औरंगजीबास ॥ आराम करून दावी शुरु दानधर्मास । देई खाने फकीरास ॥ मोठे टोकरे रोट भरी धाडी मशीदीस । जसा का मुकला जगास ॥ दानशूर बनला हटवि हातिमताईस । चुकेना नित्यनेमास ॥ औरंगजीबा भूल पडली पाहून वृत्तीस । विसरला नीट जप्तीस ॥ निरास कैदी झाला शिवाजी भास मोगलास । चढला मोठया दिमाखास ॥ पितापुत्र निजती टोकरी बदली रोटास । बाकी सोपी चाकरास ॥ जलदी करीती चाकर नेती टोकरास । करामत केली रात्रीस ॥ दिल्ली बाहेर गेले खुलें केले शिवाजीस । नेली युक्ती सिद्धीस ॥ मोगल सकाळीं विचकी दांत खाई होटांस । लावी पाठी माजमास ॥ चाल औरंगजीबा धूर दीला । पुत्रासवें घोडा चढला ॥ मधींच ठेवी पुत्राला । स्वतां गोसावी नटला ॥ रात्रिचा दिवस केला । गाठलें रायगडाला ॥ माते चरणीं लागला । हळूच फोडी शत्रूला ॥ स्नेह मोगलाचा केला । दरारा देई सर्वांला ॥ चाल हैद्राबादकर । विजापूरकर ॥ कापे थरथर । देती कारभार ॥ भरी कचेरी । बसे विचारी ॥ कायदे करी । निट लष्करी ॥ चाल शिवाजीचा बेत पाहून जागा झाला गोव्याचा । बंदोबस्त केला किल्ल्याचा ॥ वेढा घालून जेर केला सिद्दी जंजिर्याचचा । पवाडा गाती शिवाजीचा ॥ कुळवाडी-भूषण पवाडा गातो भोसल्याचा । छत्रपती शिवाजीचा ॥६॥ चौक ७ शिवाजी तों मसलत देई मित्र तान्हाजीला । बेत छाप्याचा सुचवीला ॥ तान्हाजीनें भाऊ धाकटा सोबत घेतला । मावळी हजार फौजेला ॥ सुन्या रात्रीं सिंहगड पायीं जाऊन ठेपला । योजिलें दोर शिडीला ॥ दोरीची शिडी बांधली शिपाई कमरेला । हळुच वर चढवीला ॥ थोडी चाहूल कळली सावध उदेबानाला । करी तयार लोकांला ॥ थोडया लोकांसवें तान्हाजी त्यांवर पडला । घाबरा गडकरी केला ॥ रणीं तान्हाजी पडे मावळे पळती बाजूला । सूर्याजी येऊन ठेपला ॥ धीर मोडक्या देई परत नेई सर्वांला । उगवी बंधू सूडाला ॥ उदेबान मारिला बाकिच्या राजपुत्राला । घेतलें सिंहगडाला ॥ गड हाती लागला तान्हाजी बळी घेतला । झालें दुःख शिवाजीला ॥ सिंहगडीं मुख्य केलें धाकटया सुर्याजीला । रुप्याचीं कडीं मावळ्याला ॥ पुरंधर माहूली घेई वरकड किल्ल्याला ॥ पिडा जंजिरी सिद्दयाला ॥ सुरत पुन्हां लुटी मार्गी झाडी मोगलाला । मोगल जेरदस्त केला ॥ कैद करी शिवाजी बाकी उरल्या फौजेला । त्यांमधीं अनेक स्त्रीयाला ॥ सुंदर स्त्रीया परत पाठवी नाहीं भाळला । लाजवी औरंगजीबाला ॥ सरनौबत वीर पाठवी खानदेशाला । शुरु केलें चौथाईला ॥ जलदी मोगल धाडी मोहबतखानाला । देई मोठया फौजेला ॥ औंढापट्टा घेऊन वेढी साल्हेर किल्ल्याला । धिंगाणा दक्षिणेंत केला ॥ गुजर उडी घाली सामना शत्रूचा केला । मोरोबा पठाण पंक्तीला ॥ लढतां पळ काढी दावी भ्याला मोगलाला । जसा खरा मोड झाला ॥ तों मराठे पळती मोगल गर्वानें फुगला । आळसानें ढिला पडला ॥ गुजर संधी पाहून परत मुरडला । चुराडा मोगलाचा केला ॥ बेवीस उमराव पाडले रणभूमीला । नाहीं गणती शिपायांला ॥ लहान मोठे कैदी बाकी सर्व जखम्यांला । पाठवी रायगडाला ॥ मोगल वेढा झोडून मार देत पिटीला । खिदाडी औरंगाबादेला ॥रायगडीं नित्य शिवाजी घेई खबरेला । गोडबोल्या गोवी ममतेला ॥ एकसारखें औषधपाणी देई सर्वांला । निवडलें नाहीं शत्रुला ॥ जखमा बऱ्याष होतां खुलासा सर्वांचा केला । राहिले ठेवी चाकरीला शिवाजीची कीर्ती चौमुलखीं डंका वाजला । शिवाजी धनी आवडला ॥ मोगल यवनी शिपायी सोडी चाकरीला । हाजरी देती शिवाजीला ॥ पोर्च्युग्यास धमकी देई मागे खंडणीला । बंदरी किल्ला वेढीला ॥ मधींच इंग्रज भ्याला जपे मुंबै किल्ल्याला । बनया धर्मा आड झाला ॥ दिल्लीस परत नेलें सुलतान माजूमाला । दुजें मोहबतखानाला ॥ उभयतांचा बदली खानजाहान आला । मुख्य दक्षणेचा केला ॥ मोगलाला धूर देऊन लुटलें मुलखाला । गोवळकुंडीं उगवला ॥ मोठी खंडणी घेई धाकीं धरी निजामाला । सुखें मग रायगडीं गेला ॥ मोगलाचे मुलखीं धाडी स्वार लुटायाला । लुटलें हुबळी शहराला ॥ समुद्रकांठीं गावें लुटी घेई जाहाजांला । केलें खुलें देसाईला ॥ परळी सातारा किल्ले घेई पांडवगडाला । आणिक चार किल्ल्यांला ॥ चाल हुकूम विजापुरी झाला । सोडिलें बहुत फौजेला ॥ द्यावा त्रास शिवाजीला । घ्यावें त्याचे मुलखाला ॥ शिवाजी सोदी गुजराला । कोंडी आबदुल करीमाला ॥ केला माहग दाण्याला । शत्रु अती जेर केला ॥ आर्जव करणें शिकला । भोंदिलें सैनापतीला ॥ निघून विजापुरीं गेला । क्रोध शिवाजीस आला ॥ रागावून लिहिलें पत्राला । निषेधी प्रतापरावाला ॥ गुजर मनांत लाजला । निघून वराडांत गेला ॥ चाल आबदुल्यानें । बेशर्म्यानें ॥ फौज घेऊन । आला निघून ॥ रावा प्रताप । झाला संताप ॥ आला घाईनें । गांठी बेतानें ॥ घुसे स्वतानें । लढे त्वेषानें ॥ घेई घालून । गेला मरून ॥ चाल प्रतापराव पडतां मोड फौजेचा झाला । पाठलाग मराठयाचा केला ॥ तोफ गोळया पोटीं दडती भिडती पन्हाळयाला । गेले नाहीं शरण शत्रूला ॥ अकस्मात हंसाजी मोहिता प्रसंगीं आला । हल्ला शत्रूवर केला ॥ गुजर दल मागें फिरून मारी यवनाला । पळीवलें विजापुराला ॥ शिवाजीनें हंसाजीला सरनौबत केला । मोठा अधिकार दिला ॥ हंबिरराव पद जोडलें त्याच्या नांवाला । शिवाजी मनीं सुखी झाला ॥ सेनापतीचे गुण मागें नाहीं विसरला । पोशी सर्व कुटुंबाला ॥ प्रतापराव-कन्या सून केली आपल्याला । व्याही केलें गुजराला ॥ काशीकर गंगाभट घाली डौल धर्माचा । केला खेळ गारुडयाचा ॥ लुटारु शिवाजी सुटला धाक गृह फौजेचा । खर्च नको दारुगोळीचा ॥ बहुरुपी सोंग तूलदान सोनें घेण्याचा । पवाडा गातो शिवाजीचा ॥ कुळवाडी-भूषण पवाडा गातो भोसल्याचा । छत्रपती शिवाजीचा ॥७॥ चौक ८ विश्वासू चाकर नेमी मुलखीं लुटायाला । शिवाजी कोकणांत गेला ॥ छोटे मोठे गड घेई बांधी नव्या किल्ल्याला । जमाव फौजेचा केला । गोवळकुंडीं जाई मागुन घेई तोफांला । फितीवलें कसें निजामाला ॥ करनाटकीं गेला भेटे सावत्र भावाला । वाटणी मागे व्यंकोजीला ॥ लोभीं व्यंकोजी हिस्सा देईना बळासी आला । आशेनें फिरवी पगडीला ॥ बंधू आज्ञा मोडून गर्वानें हट्टीं पेटला । बिर्हाेडीं रागावून गेला ॥ शिवाजीला राग आला कोट छातीचा केला । कैदी नाहीं केलें भावाला ॥ तंजोर बाकी ठेवी घेई सर्व मुलखाला । खडा कानाला लावला ॥ दासीपुत्र संताजी बंधु होता शिवाजीला । करनाटकीं मुख्य केला ॥ हंबीरराव सेनापती हाताखालीं दिला । निघाला परत मुलखाला ॥ वाटेमधी लढून घेई बिलरी किल्ल्याला । तेथें ठेवी सुमंताला ॥ शिवाजीचे मागें व्यंकोजीने छापा घातला । घेतलें स्वतां अपेशाला ॥ जेर झाला व्यंकोजी देई उरल्या हिश्याला । शिवाजी रायगडीं गेला ॥ विजापूरचा साह्य नेई राजे शिवाजीला । मोगल मुलखीं सोडला ॥ मुलखीं धिंगाणा धुळीस देश मिळीवला । सोडिलें नाहीं पिराला ॥ वाटेमधीं मोगल गांठी राजे शिवाजीला । घाबरा अतिशय केला ॥ भिडला शिवाजी मोगल मागें हाटीवला । वाट पुढें चालूं लागला ॥ दुसरी फौज आडवी माहाराज राजाला । थोडेसें तोंड दिलें तिजला ॥ काळ्या रात्रीं हळुच सुधरी आडमार्गाला । धूळ नाहीं दिसली शत्रूला ॥ फौजसुद्धां पोंहचला पटा किल्ल्याला । फसिवलें आयदि मोगलाला ॥ विजापूरचा आर्जव करी धाडी थैलीला । आश्रय मागे शिवाजीला ॥ हांबीरराव मदत पाठवी विजापुराला । बरोबर देई फौजेला ॥ नऊ हजार मोंगलांचा पराभव केला । त्यांनीं मार्ग अडीवला ॥ विजापुरीं जाऊन जेर केलें मोंगलाला । केला महाग दाण्याला ॥ शत्रूला पिडा होतां त्रासून वेढा काढला । मोगल भिऊन पळाला ॥ दिल्लीचा परत बोलवी दिलीरखानाला । पाठवी शाहाजाहानाला ॥ जलदी करून शिवाजी वळवी पुत्राला । लाविला नीट मार्गाला ॥ तह करून शिवाजी नेती विजापुरला । यवन घेती मसलतीला ॥ शिवाजीचें सोंवळें रुचले नाहीं भावाला । व्यंकोजी मनीं दचकला ॥ निरास मनीं होऊन त्यागी सर्व कामाला । निरा संन्यासी बनला ॥ शिवाजीने पत्र लिहिलें बधुं व्यंकोजीला । लिहितों पत्र अर्थाला ॥ वीरपुत्र म्हणवितां गोसावीअ कसे बनलां । हिरा कां भ्याला कसाला ॥ आपल्या पित्याचा ठसा कसा जलदी वीटला । मळावांचून काटला ॥ कनिष्ठ बंधू माझ्या लाडक्या पाठी साह्याला । तुम्ही कां मजवर रुसला ॥ बोध घ्या तुम्ही माझा लागा प्रजापालनाला । त्यागा ढोंगधतोर्यारला ॥ मन उत्तम कामीं जपा आपल्या फौजेला । संभाळा मुळ आब्रूला ॥ कीर्ति तुझी ऐकूं यावी ध्यास माझ्या मनाला । नित्य जपतों या जपाला । कमी पडता तुम्ही कळवा माझ्या लोकांला । सोडा मनच्या आढीला ॥ सुभोधाचें पत्र ऐकता शुद्धीवर आला । व्यंकोजी लागे कामाला ॥ शिवाजीला रायगडीं गुडघी रोग झाला । रोगानें अती जेर केला ॥ त्याचे योगें नष्ट ज्वर फारच खवळला । शिवाजी सोसी दुःखाला ॥ यवनीं बिरास भिडतां नाहीं कुचमला । शिवाजी रोगाला भ्याला ॥ सतत सहा दिवस सोसी ताप दाहाला । नाहीं जरा बरळला ॥ सातव्या दिवशीं शिवाजी करी तयारीला । एकटा पुढें आपण झाला ॥ काळाला हूल देऊन स्वतां गेला स्वर्गाला । पडले सुख यवनाला ॥ कुळवाडी मनीं खचले करती शोकाला । रडून गाती गुणांला ॥ चाल महाराज आम्हासीं बोला । धरला कां तुम्ही अबोला ॥ मावळे गडी सोबतीला । शिपाई केले उघडयाला ॥ सोसिलें उन्हातान्हाला । भ्याला नाहीं पाउसाला ॥ डोंगर कंगर फिरलां । यवन जेरीस आणला ॥ लुटलें बहुत देशांला । वाढवी आपुल्या जातीला ॥ लढवी अचाट बुद्धीला । आचंबा भुमीवर केला ॥ बाळगी जरी संपत्तीला । तरी बेताने खर्च केला ॥ वांटणी देई शिपायांला । लोभ द्रव्याचा नाहीं केला ॥ चतुर सावधपणाला । सोडिलें आधीं आळसाला ॥ लहान मोठया पागेला । नाहीं कधीं विसरला ॥ राजा क्षेत्र्यांमध्यें पहिला । नाहीं दुसरा उपमेला ॥ कमी नाहीं कारस्तानीला । हळूच वळवी लोकांला ॥ युक्तीहनें बचवी जीवाला । कधीं भिईना संकटाला ॥ चोरघस्ती घेईअ किल्ल्याला । तसेंच बाकी मुलखांला ॥ पहिला झटे फितुराला । आखेर करी लढाईला ॥ युद्धीं नाहीं विसरला । लावी जीव रयतेला ॥ टळेना रयत सुखाला । बनवी नव्या कायद्याला ॥ दाद घेईअ लहानसानाची । हयगय नव्हती कोणाची । आकृती वामनमुर्तीची । बळापेक्षां चपळाईची ॥ सुरेख ठेवण चेहऱ्याची । कोंदली मुद्रा गुणरत्नालची ॥ चाल भिडस्त भारी । साबडा घरीं ॥ प्रिय मधुरी । भाषण करी ॥ मोठा विचारी । वर्चड करी ॥ झटून भारी । कल्याण करी ॥ आपासोयरीं। ठेवी पदरीं ॥ लाडावरी । रागावे भारी ॥ चाल इंग्लिश ज्ञान होतां म्हणे मी पुत्र क्षेत्र्याचा । उडवी फट्टा ब्रह्मयाचा ॥ जोतीराव फुल्यानें गाईला पुत क्षुद्राचा । मुख्य धनी पेशव्याचा ॥ जिजीबाईचा बाळ काळ झाला यवनाचा । पवाडा गातो शिवाजीचा ॥ कुळवाडी-भूषण पवाडा गातो भोसल्याचा । छत्रपती शिवाजीचा ॥८॥