ग्राहक पंचायत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अखिल भारतीय ग्राहक पंचायत ही भारतातील ग्राहकांचे प्रतिनिधित्व करणारी संस्था आहे. हिची स्थापना बिंदुमाधव जोशी यांनी प्रथमतः पुण्यात केली.

इ.स. १९७४पर्यंत ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण करणारी अशी कोणतीही संस्‍था भारतात नव्हती. बिंदुमाधव जोशी यांनी अशी संस्था असावी अशी कल्पना लोकांना सांगितली तर त्यांना लोकांनी वेड्यात काढले. पण तरीही पुण्यातले 'सोबत'चे संपादक ग.वा. बेहरे, दैनिक सकाळचे संपादक मुणगेकर, पु.ल. देशपांडे, मुकुंदराव किर्लोस्कर, लेखिका कमल पाध्ये, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू देवदत्त दाभोळकर आदींनी ही कल्पना उचलून धरली आणि यथावकाश न्यायमूर्ती छगला यांच्या हस्ते अखिल भारतीय ग्राहक पंचायत या संस्थेच्या पुणे शाखेचे उद्‌घाटन झाले.

मुंबईतही या संस्थेची कल्पना कुणाला फारशी आवडली नाही. पण गायक आणि संगीत दिग्दर्शक सुधीर फडके यांनी आग्रह धरल्याने त्यांच्या घरी पहिली बैठक झाली, आणि त्यानंतर पंचायतीचे काम रडतखडत सुरू झाले. काही वर्षातच भारतात सर्व शहरांत या संस्थेच्या शाखा झाल्या.

ग्राहक आंदोलन हे सुरुवातीला स्वयंसेवी संस्थांनी सुरू केले आणि मग त्याला हळूहळू सरकारचा पाठिंबा मिळू लागला. १९८६ सालच्या ग्राहक संरक्षण कायद्याचा मसुदा प्रथम ग्राहक पंचायतीने सादर केला आणि मग त्याला सरकारने कायद्याचे रूप दिले. १९९० साली ग्राहक्पंचायतीने २४ डिसेंबर हा भारतीय ग्राहक दिवस म्हणून घोषित केला आणि मग त्याला सरकारी मान्यता मिळाली. ग्राहक संस्थांच्या रजिस्ट्रेशनसाठी एक स्वतंत्र 'ग्राहक संगठन पंजीकरण अधिनियम विधेयक’ भारताच्या लोकसभेत ५ सप्टेंबर १९९२ रोजी सादर झाले, परंतु अजूनही हे नियम तयार झालेले नाहीत.