हरीवरदा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(हरिवरदा या पानावरून पुनर्निर्देशित)

हरीवरदा टीका श्रीमद्भागवतच्या दशम स्कंधावर 42 हजार ओव्यांची टीका. संत एकनाथांचा अनुग्रह स्वप्नामध्ये झाल्यावर त्यांनी भागवताच्या दशम स्कंधावर सुंदर मराठीत टीका लिहिली. ही टीका त्यांनी अंबाजोगाईच्या योगेश्वरी देवीच्या परिसरात बसून लिहिली असे म्हटले जाते. हा ग्रंथ साहित्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा असून मराठी भाषेत घुसवलेले उर्दू ,फार्सी व परकीय शब्द न वापरता अस्सल देशी मराठी शब्द वापरून कृष्णदयार्णव यांनी मराठी भाषेला या हरीवरदा टीकेतून मोठीच भेट दिली आहे.

कृष्णदयार्णवांना झालेल्या व्याधीतून मुक्त होण्यासाठी त्यावर उपाय म्हणून भागवताच्या दशमस्कंधावर त्यांनीं 'हरिवरदा' नावाची प्राकृत टीका लिहिण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांचे वय ५४ होते. या ग्रंथास श्रीधरी टीकेचा आधार आहे. पूर्वार्धाचे ४९ अध्याय संपले व रोग नाहींसा झाला. उत्तरार्धाचे ३७ अध्याय संपविले, ३८ व्या अध्यायाचे २३ श्लोक झाले आणि कृष्णदयार्णवस्वामी पैठण येथें समाधिस्त झाले(शके १६६२ मार्गशीर्ष). या ग्रंथाचे लेखन तब्बल १६ वर्षे चालले. ४२ हजार ओव्या लिहून हा ग्रंथ अपुराच होता. त्यातील ओवी एकनाथांच्या ओवीसारखी साडेचार चरणी आहे. या ग्रंथात फारशी - अरबी शब्दांच्या प्रवेश होऊ नये, म्हणून त्यांनी संस्कृत प्रतिशब्द घडविले. तथापि सन १७४० च्या सुमारास कृष्णदयार्णवांचे निधन झाल्याने, अपुरा राहिलेला हा ग्रंथ त्यांचे शिष्य उत्तमश्लोक यांनी पुढे पूर्ण केला.ज्ञानेश्वरीचीहि छाया ग्रंथावर पडलेली आहे. विद्वान लोक या “हरिवरदा” ग्रंथास फार मान देतात. यावरून कर्त्याची विद्वत्ता व बहुश्रुतपणा दिसून येतो. काव्याच्या दृष्टीनेंहि ग्रंथ चांगला वठला आहे. विस्ताराच्या मानानें हा ग्रंथ प्रचंड आहे. याची एकंदर ओवीसंख्या ४२ हजार आहे.