सत्यभामा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सत्यभामा
वडील सत्राजित
पती श्रीकृष्ण
सत्यभामा, भारत, तामिळनाडू, 12 व्या -13 व्या शतकाच्या उत्तरार्धात तांबे धातूंचे बनलेले शिल्प

सत्यभामा कृष्णाच्या आठ राणीपैकीं तिसरी पत्नी होती. ही राजा सत्राजितची कन्या होती. हिच्या साहाय्याने भगवान श्रीकृष्णांनी नरकासुराचा वध केला होता. देवमाता आदिती कडून तिला चिरयौवन प्राप्त झाले होते. श्रीकृष्णाला हीच्याकडूूून दहा पुत्र झाले होते.

विवाह[संपादन]

सत्यभामा ही राजा सत्राजितची कन्या आणि श्रीकृष्णाच्या पत्नींपैकी एक होती. सत्रजित सूर्याचे भक्त होते. सूर्यदेवाने प्रसन्न होऊन त्यांना स्यमंतक मणी दिला होता. हा मणी अत्यंत तेजस्वी व आताच्या कोहिनूर हिऱ्यासारखा लखलखीत होता.एक दिवस एका समारंभात श्रीकृष्णाने सत्राजितला तो मणी अक्रूरला देण्याची विनंती केली, परंतु सत्राजितने त्यास नकार दिला.

दुसऱ्या दिवशी तो मणी देवघरात ठेवला असता सत्राजितचा भाऊ प्रसेनजीत तो मणी परिधान करून जंगलात शिकारीसाठी गेला. तेथे एका सिंहाने त्याच्यावर हल्ला केला व प्रसेनजीतला ठार केले व तो मणी स्वतःकडे ठेवला. तो सिंह व त्याकडील मणी रूक्षराज जाम्बवंताच्या दृष्टीस पडतो. तेव्हा त्या सिंहास ठार मारून तो मणी त्याच्याकडून काढून घेतो, व आपली मुलगी जांबवंती हिला देतो.

इकडे सत्राजितला वाटले श्रीकृष्णाने आपल्या भावाची हत्या करून तो मणी चोरला असावा. व त्याने श्रीकृष्णावर चोरी व हत्येचा आरोप केला. तेव्हा श्रीकृष्ण आपल्यावरील आरोप खोटा ठरवण्यासाठी त्या मनीच्या शोधात जंगलात निघाला.

जंगलात गेल्यावर तो जांबवंताच्या गुहेजवळ गेला. मण्याचा प्रकाश पाहून तो आत गेला. तेव्हा त्याला त्या मण्यासाठी जाम्बवंताबरोबर युद्ध करावे लागले. जेव्हा जाम्बवंत युद्धात हरू लागला तेव्हा त्याने आपले प्रभू श्रीराम यांचे स्मरण केले. त्याची धाव ऐकून विष्णूचाच अवतार असलेल्या श्रीकृष्णाला आपल्या रामस्वरूपात यावे लागले. आपल्या देवाला पाहून जाम्बवंत त्याला शरण गेला व आपली चूक स्वीकारली व तो मणी श्रीकृष्णाला देऊ केला व त्याला आपली मुलगी जाम्बवंती हिच्याशी विवाह करण्याची विनंती केली. अशाप्रकारे श्रीकृष्ण व जांबवंती हीचा विवाह झाला.

नंतर तो मणी घेऊन श्रीकृष्ण सत्राजितकडे गेला.व त्यास तो मणी सुपूर्द केला तेव्हा सत्राजितला स्वतःची लाज वाटू लागली की त्याने विनाकारण श्रीकृष्णावर आरोप केला. त्याला या गोष्टीचे दुःख झाले. व त्याने श्रीकृष्णाची क्षमा मागितली. व आपली मुलगी सत्यभामा श्रीकृष्णाला देऊ केली, तसेच विनंती केली की हा मणी सुद्धा आपण आहेर म्हणून ठेवावा. तेव्हा श्रीकृष्ण हसत म्हणाला हा मणी म्हणजे आपत्ती आहे, एका मनीच्या नादात दोन - दोन मनी पदरात पडले. हा मणी मी नाही घेऊ शकत तो तुमच्याकडेच ठेवावा. व श्रीकृष्ण सत्यभामेबरोबर विवाह करून द्वारकेला निघाले.

सत्यभामा-कृष्ण अपत्ये[संपादन]

भानु, सुभानु, स्वरभानु, प्रभानु, भानुमान, चंद्रभानु, वृहद्भानु, अतिभानु, श्रीभानु आणि प्रतिभानु