विसोबा खेचर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

संत विसोबा खेचर

संत विसोबा खेचर
मूळ नाव विसोबा चाटी
उपास्यदैवत विठ्ठल
संप्रदाय वारकरी, वैष्णव संप्रदाय
शिष्य संत नामदेव महाराज.
भाषा मराठी
कार्य समाज उद्धार

हे संत नामदेवांचे गुरू होते. शैवागमा वरती 'षट्स्थल' हा ग्रंथ व अनेक अभंग रचना विसोबा खेचर यांनी केलेल्या आहेत.

संत विसोबा खेचर हे मुळचे औरंगाबाद जिल्ह्यातील मुंगी पैठण गावचे नाईक किंवा सराफ. ते मुळ पांचाळ सुवर्णकार समाजातील होते. त्यांचे मुळ नाव विश्वनाथ महामुनी ( सोनार ) असे होते. विसा सोनार असा ही उल्लेख आढळतो. त्यांनी लिहिलेल्या षट्स्थळ वा षडूस्याथळी या शैवागम ग्रंथात स्वतः ते सांगतात आणि विश्व ब्राह्मण वा शैव ब्राह्मण व विश्वकर्मांचा आचार्य असल्याचा उल्लेख करतात. परंतु काही लोक त्यांना लिंगायत जंगम, ब्राह्मण, चाटी, शिंपी समाजाचे समजतात.

मुंगी गाव सोडून ते अलंकापुर ( आळंदी ) येथे चाटीचा ( कपडे विकण्याचा ) व्यवसाय करू लागले. संत ज्ञानदेवांना मांडे भाजण्यासाठी मडके मिळू दिले नाही. संत ज्ञानदेवांचा अधिकार कळाल्यानंतर संत मुक्ताईंचा उपदेश घेऊन जुनाट शैव पीठ अमर्दकपुर म्हणजे आत्ताचे ज्योतिर्लिंग औंढे नागनाथ येथे वात्स्व्य करू लागले. याचं ठिकाणी संत नामदेवांना गुरू मंत्र दिला. शैव नाथ पंथातील नागनाथा वा चांगदेवा कडून जंगम दिक्षा, संत चांगदेवाकडून योग दिक्षा प्राप्त केल्या होत्या. ते मुळात शैव होते नंतर वारकरी संप्रदायाशी संबंध आला.

रा. चि. ढेरे यांनी विसोबा खेचर विरचित षट्‌स्थल पुस्तकात विसोबा हे पांचाळांमधील सोनार समाजाचे होते असे दाखवून दिले आहे.

त्यासाठी त्यांनी शिल्पशास्त्र या ग्रंथाचा आधार घेतला आहे. संत नामदेवांच्या अभंगातून उपलब्ध संदर्भाच्या आधारे असे म्हणता येते की बारा ज्योतिर्लिंगांच्या यादीतील आठवे प्रसिद्ध स्थान औंढ्या नागनाथ हे विसोबांचे मूळ गाव असावे. औंढ्या नागनाथ हे पंढरपूरापासून ३६६ किलोमीटर दूर हिंगोली जिल्ह्यात आहे. संत नामदेवांनी तिथे जाऊन विसोबांची भेट घेतली तेव्हा ते मंदिरातील शिवलिंगावर पाय ठेवून निवांत झोपले होते. त्यांना विचारल्यावर ते उत्तरले ‘जिथे देव नाही तिथे माझे पाय उचलून ठेव’. यावर विचार करताना नामदेवांना साक्षात्कार झाला, ‘देवाविण ठाव रिता कोठे’. या घटनेने डोळे उघडलेल्या नामदेवांना विसोबांनी सर्वव्यापी निर्गुण निराकार परमेश्वराची जाणीव करून दिली. त्यामुळेच नामदेवांनी आपल्या अनेक अभंगातून विसोबांचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केलेला आढळतो. पुढे ‘द्वादशीचे गावी जाहला उपदेश’ असे नामदेवांनी म्हटले आहे. द्वादशीचे गाव म्हणजे बार्शी होय. या बार्शी (जि. सोलापूर) येथे विसोबांची समाधी आहे. ही समाधी शके १२३१ (सन १३०९) मध्ये घेण्यात आली.

तेरावे शतक वारकरी संप्रदायातील आद्यसंत. महान योगी. खेचर हे आडनाव नव्हे. देह आकाशगमन करण्याइतका हलका, तरल करण्याची सिद्धी प्राप्त असलेला योगी म्हणजे खेचर. योगमार्गात खेचरी मुद्रेला विशेष महत्त्व असते. त्या टप्प्यावर पोहोचलेला, खेचरी विद्या प्राप्त असल्याने त्यांना खेचर हे उपाख्य प्राप्त झाले. खेचर म्हणजे गाढव, योगी, मुक्त पुरुष. या अर्थाने खेचर हे उपनाम मिळाले असावे.

विसोबांची ज्ञाती व व्यवसाय याबाबत मतभिन्नता आहे.

संतचरित्रकार महिपतींच्या भक्तविजय ग्रंथात ते चाटी म्हणजे कापडव्यापार करणारे ब्राह्मण मानले आहेत.

आंबेजोगाई येथील दत्तसंप्रदायी कवी दासो दिगंबर यांच्या संतविजय ग्रंथात

विसोबा खेचर जाण | राहे मुंगीमाजी आपण | ख्रिस्तीचा उदीम करून | काळक्रमण करितसे |

असा उल्लेख आहे. ख्रिस्ती म्हणजे सावकारी करणारा व्यापारी. परंतु याबाबत विश्वसनीय माहिती हाती लागत नाही.

जेव्हा जेव्हा दुष्काळ पडत असते तेव्हा तेव्हा विसोबा सराफांच्या जवळ जे काही असेल ते दुष्काळपीड़ितांना वाटून देत. असे असूनही अनेक लोक भुकेने प्राण सोडत. विसोवांनी विचार केला की माझी एवढी पत आहे की मला कुणीही कर्ज देईल. का न कर्ज काढून भुकेल्यांचे पोट भरू? जेव्हा अकाल संपेल तेव्हा ते कर्ज फेडता येईल. त्यांच्या पत्नीलाही हा विचार पसंत पडला. विसोवांनी एका पठाणाकडून कर्ज घेतले, आणि त्यातून अन्न विकत घेऊन ते भुकेलेल्यांना वाटू लागले. कुणीतरी चुगली केली आणि पठाणाला विसोवा दिवाळखोर झाल्याची बातमी कळवली. पठाण बिथरला आणि त्याने विसोवा सराफांना सात दिवसाच्या आत कर्जाची परतफेड करायला सांगितले. मुसलमानी राजवटीत पठाणांचेच म्हणणॆे ऐकले जात असे, न्याय वगैरे काही नव्हता. विसोवा सराफांच्याकडे काहीच नव्हते, ते कुठून कर्ज फेडणार?

जेव्हा कर्ज चुकवण्याची काहीही व्यवस्था होऊ शकली नाही, तेव्हा पठाण विसोवा सराफांवर क्रूर अत्याचार करून त्यांना अपमानित करू लागला. विसोवांनी सर्व मुकाटपणे सहन केले. ते फक्त एवढेच सांगत की 'मी आपले कर्ज घेतले आहे, जेव्हा जमेल तेव्हा मी ते सव्याज फेडीन.'

विसोवा सराफांचे हाल पाहून विसोवांच्या मुनीमाने आपली सर्व स्थावर मालमत्ता विकून व जवळची सर्व पुंजी देऊन पठाणाचे कर्ज फेडले. त्यानंतर तो मुनीम विसोवा सराफांच्या साथीने परोपकार करू लागला आणि ईश्वर भक्तीत रममाण झाला.

महिपतबुवा ताहराबादकर यांनी विसोवा सराफांचे ओवीबद्ध चरित्र लिहिले आहे.

विसोबा खेचर लिखित शडूस्छळी (षट्‌स्थळ) ग्रंथाच्या हस्तलिखिताचा शोध ज्येष्ठ संशोधन रा.चि.ढेरे यांना सासवड येथील सोपानदेव समाधी मंदिरातील कागदपत्रांच्या गठोळ्यात १९६९ मध्ये लागला. या ग्रंथात विसोबा खेचरांची गुरुपरंपरा आदिनाथ – मत्येंद्रनाथ – गोरक्षनाथ – मुक्ताई – चांगा वटेश्र्वर – कृष्णनाथ (रामकृष्णनाथ) – खेचर विसा अशी आलेली आहे. या परंपरेतील मुक्ताई म्हणजे ज्ञानेश्वरभगिनी मुक्ताबाई नव्हे. या ६७७ ओवीसंख्या व तीन अध्याय (विभाग) असलेल्या ग्रंथात वीरशैव तत्त्वज्ञानाचे दर्शन घडते. त्यामुळे वीरशैव लिंगायतांमध्ये या ग्रंथाला महत्त्व आहे.

श्री नामदेव महाराज गाथामध्ये विसोबांचे दोन अभंग आढळतात. विसोबा- नामदेवांचे नाते गुरुशिष्यापेक्षा सख्यत्वाचे / मित्रत्वाचे अधिक असल्याचे जाणवते. जरी नामदेवांनी विसोबांचा काही अभंगात आदरपूर्वक गुरू म्हणून उल्लेख केला असला, तरी त्यांनी विसोबांचा योगमार्ग स्वीकारलेला नाही. उलट विसोबाच पुढे वारकरी संप्रदायाचा एक भाग झालेले आढळतात.

विसोबा खेचर आणि नामदेव यांची भेट

पंढरपूर तालुक्यातील कोर्टी येथील श्री सप्तकोटेश्वर मंदिरातील शिवपिंडी संत नामदेव महाराज यांची भेट झाली काही ठिकाणी औंढा नागनाथ या ठिकाणी सांगतात. पांडुरंगाच्या सांगण्याप्रमाणे नामदेव महाराज विसोबा खेचर यांना भेटण्यासाठी गेले. ते एका ज्योतिर्लिंग मंदिरात त्यांचे सद्गुरू विसोबा खेचर पाय पसरून बसले होते. त्यांची अवस्था स्वीकार वृद्ध पुरुषाप्रमाणे होती. ज्यांच्या अंगाला ठिकाणी जखमा झाल्या होत्या आणि त्यातून पू वाहत होता. त्यांच्या अंगावर असलेल्या सर्व जखमां वरून माशा फिरत होत्या. तसेच त्यांच्या अंगातून दुर्गंधी सुटली होती. पायात तेलाने मढवलेल्या वाहना असून शंकराच्या पिंडीवर त्यांनी आपले चरण ठेवले होते. आपल्या भावी सद्गुरूंची अशी दुरावस्था पाहून नामदेव महाराजांना खूप दुःख झाले; पण संत विसोबा खेचर नाटकच करत होते. हे नामदेव महाराजांना माहीत नव्हते. नामदेव महाराज संत विसोबा यांच्यापाशी गेले आणि म्हणाले अहो तुम्ही शंकराच्या पिंडीवर पाय ठेवून बसला आहात.

चला, उठून बसा नीट त्यावर संत विसोबा खेचर नामदेव महाराजांना म्हणाले, “बाबारे काय करू? इतका देह क्षीण झाला आहे कि मी हलू शकत नाही. ती वात्रट मुला आली आणि त्यांनी माझे पाय धरले व पिंडीवर नेऊन ठेवले. पाय हलवायचे सुद्धा त्राण उरले नाहीत. त्यामुळे तूच आता माझ्यावर कृपा कर आणि जिथे पिंडी नाही तिथे माझे पाय उचलून ठेव. नामदेव महाराजांना त्यांचे बोलणे स्वभाविक वाटले आणि त्यांनी त्यांचे चरण उचलून बाजूला केले. तर तिथे पुन्हा पिंडी तयार झाली.

ज्या दिशेने पाय हलवावीत त्या दिशेने पिंड निर्माण होत असे. हा सर्व चमत्कार पाहून नामदेव महाराज आश्चर्यचकित झाले. श्री सप्तकोटेश्वर मंदिराच्या परिसरात असलेल्या या शिवपिंड म्हणजे नामदेव महाराजांना संत विसोबा नि ईश्वर सर्वत्र असल्याची अनुभूती दिल्याचे पवित्र स्थान आहे. जेव्हा नामदेव महाराजांनी आश्चर्याने विसोबाकडे पाहिले, तेव्हा त्यांच्या शरीराची सर्व दुर्गंधी नाहीशी झाली होती. अगदी तप्त मुद्रांकित ब्राह्मण असे एकदम तेजस्वी शरीर नामदेव महाराजांना दिसले.

संत विसोबा यांनी नामदेव महाराजांच्या मस्तकावर हात ठेवला. त्यावेळी नामदेव महाराजांना सगळीकडे पांडुरंग पांडुरंग दिसायला लागले. पांडुरंगांनी सांगितल्याप्रमाणे खरोखर हे अधिकारी पुरुष आहेत. याची खात्री पटताच नामदेव महाराजांनी ताबडतोब संत विसोबा यांचे चरण धरले आणि त्यांच्या चरणावर मस्तक ठेवून त्यांना वंदन केले.

श्री नामदेव महाराज गाथेमध्ये विषयांचे दोन अभंग आपल्याला पहायला मिळतात. विसोबा नामदेवांचे नाते गुरू शिक्षणापेक्षा सदस्यत्वाचे, मित्रत्वाचे अधिक असल्याचे जाणवते. जरी नामदेवांनी काही अभंगात आदरपूर्वक गुरू म्हणून उल्लेख केला असला तरी त्यांनी विसोबांचा योग्य मार्ग स्वीकारलेला नाही. उलट विसोबा पुढे वारकरी संप्रदायाचा एक भाग झालेले आपल्याला आढळतात.