नाना फडणवीस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सवाई माधवराव पेशव्यांसोबत बसलेले नाना फडणवीस (चित्रकार: जेम्स वेल्स; चित्रनिर्मिती: इ.स. १७९२ ;)

बाळाजी जनार्दन भानू ऊर्फ नाना फडणवीस किंवा नाना फडणीस (जन्म : सातारा-महाराष्ट्र, १२ फेब्रुवारी १७४२; - पुणे, १३ मार्च १८००) हे पेशव्यांच्या दरबारी असणारे मराठा साम्राज्यातील मुत्सद्दी होते. नाना फडणवीस हे नुसतेच शहाणे होते, योद्धे नव्हते यास्तव ते पेशवाईतील साडेतीन शहाण्यांपैकी अर्धे शहाणे समजले जात. (इतर तीन पूर्ण शहाणे - सखारामबापू बोकील, देवाजीपंत चोरघडे आणि विठ्ठल सुंदर)

जीवन[संपादन]

नाना फडणवीस यांचे मूळ घराणे कोकणातल्या रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील होते. त्यांचा जन्म साताऱ्याला झाला. बालवयातच नानासाहेब पेशव्यांच्या सान्निध्यात आल्यामुळे त्यांना राज्यकारभाराचे शिक्षण मिळाले. वयाच्या २०व्या वर्षी थोरल्या माधवरावांकडून त्यांना फडणिशीची वस्त्रे मिळाली. एवढे मोठे पद नानांनी आपल्या कर्तृत्वाने आणि मुत्सद्दीपणाने सांभाळले.

आपल्या चातुर्याच्या बळावर नानांनी राजकीय घडी बसवलीच होती पण त्यांची कामाची तडफ, त्यांच्या वागण्यातला समतोलपणा या बरोबरच पेशवाई आणि राजसत्तेचा दबदबा आणि दरारासुद्धा त्यांनी वाढवला. इंग्रजांचा पाडाव करण्यातही ते यशस्वी झाले.

थोरल्या माधवराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर पेशवाईची विस्कटलेली घडी महादजी शिंद्यांच्या मदतीने त्यांनी पुन्हा रुळावर आणली आणि दक्षिणेतील मराठी सत्तेचे वर्चस्व टिकवून ठेवले, पुण्याचे वैभव वाढवले. सवाई माधवराव पेशव्यांच्या अपघाती निधनानंतर सात-आठ महिने नानांनी तुरुंगवासही भोगला. पुढे आजारपणात १३ मार्च १८०० रोजी त्यांचा अंत झाला.

नाना फडणवीस आणि उत्तर पेशवाई[संपादन]

[ संदर्भ हवा ] नाना फडणवीस यांची दोन लग्ने झाली होती. नानांचे पहिले लग्न दहाव्या वर्षी झाले; या स्त्रीचे नाव यशोदाबाई.

रावबाजीच्या म्हणजे दुसऱ्या बाजीराव पेशव्याच्या स्वभावाचा धसका नाना फडणवीस यांच्या जिऊबाई या पत्नीनेही घेतला होता. नाना गेल्यावर या बाजीरावाने नानांच्या अरबांचा पगार चुकता करून नानांचे वाडे, जहागीर व इनामी गावे जप्त केली. नानांजवळील अफाट संपत्ती हाती येण्यासाठी जिऊबाईस शनिवारवाड्यात आणून ठेवले. दौलतराव शिंद्याचीही त्या संपत्तीवर दृष्टी असल्याने, त्याने बाईस दत्तक देऊन आपल्या ताब्यात देण्याबद्दल पेशव्यांस विनंती केली, पण पेशव्यांनी ती नाकारली, आणि नानांचा पक्का सूड उगवला.

यानंतर नानांच्या पक्षाच्या सर्व मंडळींस पेशव्यांनी प्रतिबंधात ठेवले. यशवंतराव होळकरांनी पुणे जाळले, तेव्हा रावबाजी पळून गेले होते. तेव्हा जिऊबाई वाड्यातच होती. नानांचा व आपल्या घराण्याचा पूर्वापार संबंध जाणून यशवंतरावाने बाईस लोहगड (हा किल्ला नानांस सरकारांतून बक्षीस मिळाला होता) किल्ल्यावर नानांचा विश्वासू नोकर धोंडोपंत नित्सुरे याच्या स्वाधीन केले. नानांचा मुख्य खजिना तेथेच असे.

पुढे दोन वर्षांनी जनरल वेलस्लीने मध्यस्थी करून बाजीरावाकडून बाईस दरसाल बारा हजारांची नेमणूक करून देऊन पेशव्यांच्या आग्रहावरून बाईस लोहगड किल्ला सोडावयास लावला. पुढे बाजीराव इंग्रजांच्या मदतीने पुन्हा पुण्यात आला. तेव्हा इंग्रजांनी जिऊबाई यांस पुण्यात येण्यास सुचवले. पण "बाजीराव याची खोड फार वाईट आहे. त्यामुळे माझी पुण्यात रहाण्याची इच्छा नाही" असे तिने सांगितले. तेव्हा इंग्रजांनी बाजीरावास तिला महिना हजार रुपये देण्यास सांगून तिला पनवेलला ठेवले व सुरक्षेसाठी स्वतःचे सैन्य ठेवले. पुढे बाजीराव बिठूरला गेल्यावर तिला वाद, बेलबाग संस्थान व मेणवली गाव इनाम दिले. हजार रुपये पेन्शन सुरूच ठेवली. यानंतर शेवटपर्यंत ती मेणवली येथे राहिली. नंतर बाई इंग्रजांच्या आसऱ्याने पनवेलास पेशवाई नष्ट होईपर्यंत राहिली. पेशव्यांनी तिला आपल्या ताब्यांत आणण्याची फार खटपट केली, पण ती त्यांच्याकडे आली नाही.

इंग्रजी राज्य झाल्यावर एलफिन्स्टनने बाईस पुण्यास आणून वार्षिक हजारांची नेमणूक कायम करून, बेलबाग संस्थान व मेणवली गाव जप्तीतून मोकळे केले. नंतर बाई मेणवलीस जाऊन राहिली. तिने इ.स. १८२७ मध्ये मिरजेच्या गंगाधरराव भानू नावाच्या मुलास इंग्रजांच्या संमतीने दत्तक घेऊन त्याचे नाव माधवराव ठेविले व त्यास आपली बारा हजारांची नेमणूक, बेलबाग संस्थान व मेणवलीची वहिवाट मिळावी म्हणून फार खटपट केली. परंतु इंग्रजांनी तिचे काही एक ऐकले नाही. अखेर इसवी सन १८५४ च्या मार्चमध्ये जिऊबाई वारली. ती शहाणी व सदाचरणी असून तिने अखेरपर्यंत नानांचे नांव निष्कलंक राखले. बाई वारल्यावर तिची नेमणूक इंग्रजांनी बंद केली.

नाना फडणवीस यांचे गुप्तहेर खाते[संपादन]

अखबारनवीसांची(बातम्या आणणाऱ्यांची) प्रथा मराठ्यांच्या राज्यात अगोदरपासूनच होती. मराठी सत्तेचा हिंदुस्थानभर राज्यविस्तार झाल्यावर अखबारनवीसही प्रांताप्रांतांत ठिकठिकाणी नेमले गेले. पानिपतच्या प्रसिद्ध तिसऱ्या युद्धकाळात "बातम्या" वेळेवर न मिळाल्याने मराठ्यांचे फार मोठे नुकसान झाले.

नाना फडणीस यांनी तिसरे पानिपत युद्ध प्रत्यक्षात पाहिले होते. बहुदा यातूनच धडा घेऊन मराठेशाहीतील मुत्सद्दी नाना फडणीस यांनी त्यांच्या कारकिर्दीत अखबारनवीस आणि नजरबाज यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढविली. या कारणामुळे नानांना हिंदुस्थानातीलच नाही तर परदेशातीलही बातम्या अत्यंत जलद कळत असत.

प्रत्येक ठिकाणच्या "आतल्या" बातम्या मिळविण्यासाठी नानांनी अतिशोधक आणि भेदतत्पर माणसे मिळविली होती. गायकवाड नामक एक मराठा सरदार नानांचा अत्यंत विश्वासातील पटाईत बातमीदार होता. निंबाजी माणकोजी नामक अखबारनवीस निजामाच्या दरबारातील खडान् खडा बातमी नानांना कळवीत असे.

कुणबिणी, आचारी, दासी, खोजे, सेवेकरी, दर्जी, विधवा स्त्रिया, न्हावी, ब्राह्मण, पागेदार, सरदार, तेलंग, गोसावी असे कित्येक बातमीदार नानांनी नेमले होते. यांना "नजरबाज" असे म्हणत. हे नजरबाज इतके तेज होते की कित्येकांच्या रोजकीर्दीच्या नोंदीही ते नानांना पाठवत असत. या गुप्तहेरांच्या बारीकसारीक माहितीमुळे नानांना शत्रू, प्रतिपक्षातील मोठे अधिकारी, बडे सरदार, धनिक, पेढीवाले, स्वकीय सरदार, दरकदार यांची इत्थंभूत मासलेवाईक माहिती असे.

मद्रास येथील इंग्रजांची बातमी काढण्याकरिता नानांनी हैदराबादचे वकील गोविंदराव काळे यांजमार्फत 'व्यंकटराम पिल्ले' नावाचा एक मद्रासी इसम ठेवला होता. तो इंग्रजी जाणत असल्यामुळे त्याचकडून इंग्रजांचे घरातील विलायतेची बातमी मिळेल असी नानांस आशा होती. त्यास पगार दरमहा शंभर रुपये द्यावा अशी गोविंदरावाने नानांस शिफारस केली होती.

वासुदेवशास्त्री खरे नानांविषयी म्हणतात...

"त्यांच्या बातमीचा पल्ला फार दूरवर असून त्यांस बातमी जलद कळत असे. इंग्रज व फ्रेंच यांशी मराठी राज्याशी जसजसा संबंध अधिकाधिक जडू लागला तसतशी नानांस कलकत्ता, मद्रास, मुंबई, पांडिचेरी, माही इत्यादी ठिकाणांहून बारीकसारीक बातमी देखील कळू लागली. हिंदुस्थानबाहेर देखील फ्रेंचाच्या व इंग्रजांच्या काय काय चळवळी चालल्या आहेत इकडे नानांचे लक्ष असे. 'फ्रेंचांचा सरदार बुशी हा फ्रान्स देशाहून फौज घेऊन माॅरिशस बेटात आला..' 'युरोपात फ्रेंच, डच, पोर्तुगीज हे इंग्रजांवर उठले आहेत..' असली वर्तमाने त्यांना कळत."

म्हणूनच नाना फडणीसांना मराठेशाहीतील शहाणपण असे म्हणत. नानांच्या बाबतीत एक उक्ती प्रसिद्ध आहे, ती अशी : नानांत नाना फडणीस नाना, इतर नाना करिती ठणाणा.

वारसा[संपादन]

वाई येथे नाना फडणीसांचा वाडा आजही आहे. पुण्यातही नानावाडा आहे. पुण्यातील नानावाड्यात काही वर्षांपूर्वीपर्यंत टिळक-आगरकर-चिपळूणकर यांनी स्थापन केलेली न्यू इंग्लिश स्कूल भरत होती. जवळच असलेल्या वसंत टाॅकीजमधील गोंगाटाच्या त्रासाला कंटाळून डेक्कन एज्युकेशन सोसयटीने ही शाळा टिळक रोडवर नेली. नाना वाड्यात हल्ली पुणे महापालिकेचे हायस्कूल आहे. नानावाड्याच्या समोरच्या हौदाला नाना हौद म्हणतात. या हौदाला थेट कात्रजहून पाणीपुरवठा होतो, त्यामुळे या हौदाला बाराही महिने पाणी असते. पुणे महापालिकेवर हा हौद अवलंबून नाही. महापालिकेने शहराच्या पाणी पुरवठ्यात कपात केली, तरी या हौदाला तिची झळ बसत नाही.

आत्मचरित्र[संपादन]

नाना फडणविसांनी स्वतःचे अत्यंत प्रांजळ आत्मचरित्र लिहिले आहे.

नाना फडणिसांवरील पुस्तके[संपादन]

हे सुद्धा पहा[संपादन]