ऋतू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


ऋतू हा हवामानावर आधारलेला असलेला वर्षाचा ढोबळपणे बनवलेला भाग आहे.

ऋतूंची संख्या[संपादन]

प्रदेशागणिक हवामानबदलामुळे ऋतूंची नेमकी संख्या बदलते. ही विभागणी मुख्यतः तापमान आणि पाऊस या घटकांवर आधारित आहे. परंतु प्रदेशागणिक हे घटकदेखील बदलतात. उदा. उष्ण कटिबंधातील लोक फक्त तापमानाच्या आधारावर ऋतू ठरवतात, कारण तेथे पाऊस वर्षभर पडत असतो. समशीतोष्ण कटिबंध दोन किंवा तीन ऋतू मानतो तर शीत कटिबंध प्रदेशांमध्ये केवळ दोनच ऋतू असतात. मात्र भारतामधील वर्ष तीन मुख्य ऋतूंमध्ये विभागले गेले आहे: उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा, तर उपऋतू सहा - वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर.

ऋतूंमागील कारणे[संपादन]

आकृती क्र. १
ही आकृती सूर्य आणि पृथ्वीच्या गतीमुळे होणारी ऋतूंची निर्मिती स्पष्ट करते. पृथ्‍वीच्या उत्तर गोलार्धावरील प्रदेशात, हिवाळ्यात दिवसाची कुठलीही वेळ असली तरी उत्तर ध्रुव अंधारातच असतो तर दक्षिण ध्रुव प्रकाशमान राहतो. (ध्रुवीय हिवाळा हा देखील लेख पहावा). अर्थातच ही आकृती फक्त उत्तर गोलार्धातील हिवाळ्यादरम्यानची आहे.
आकृती क्र. २
पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे उत्तर गोलार्धातील आणि दक्षिण गोलार्धातील ऋतुचक्र चालू राहते.

विविध ऋतू असण्याचे प्राथमिक कारण म्हणजे पृथ्वीचा अक्ष पृथ्वीच्या सूर्या भोवतीच्या भ्रमण कक्षेशी काटकोनात नसणे हे होय. तो काटकोनापासून '२३.५' अंशाने कललेला आहे. त्यामुळे पृथ्वीवर पडणारे सूर्याचे किरण कमीअधिक तिरपे पडतात. जसजशी पृथ्वी सूर्यभ्रमण करते तसतसा सूर्यकिरणांचा तिरपेपणा कमी जास्त होत राहतो. त्यामुळे तापमानात फरक होतो आणि ऋतू बदलतात. पृथ्वीच्या उत्तर आणि दक्षिण गोलार्धात दोन विरुद्ध ऋतू चालू असतात.

ऋतूंमध्ये होणारे हवामानातील किरकोळ बदल इतर बऱ्याच गोष्टींवर अवलंबून असतात. उदा० पृथ्वीची गती (परिवलन आणि परिभ्रमण), सूर्याची पृथ्वीकडे येणारी उष्णता, समुद्र किंवा मोठी सरोवरे, गल्फ स्ट्रीम, एल निनो सारखे समुद्रातील प्रवाह, आणि वाऱ्यांचे प्रवाह, वगैरे. या गोष्टी हवामानावर परिणाम करतात. या सर्व घटकांमध्ये नवीन भर पडली आहे ती म्हणजे - जागतिक तापमानवाढ.

संस्कृती आणि ऋतू[संपादन]

जगात विविध संस्कृतीमधील लोक वेगवेगळे ऋतू मानतात. उदा०.भारतात पाळल्या जाणाऱ्या हिंदू पंचांगाप्रमाणे वर्षात सहा ऋतू आहेत. खालील समीकरणे प्रतीकात्मक आहेत.

वसंत + ग्रीष्म = उन्हाळा= चैत्र, वैशाख + ज्येष्ठ आणि आषाढ हे मराठी महिने
वर्षा + शरद = पावसाळा= श्रावण, भाद्रपद + आश्विन, कार्तिक हे मराठी महिने
हेमंत + शिशिर = हिवाळा = मार्गशीर्ष, पौष + माघ, फाल्गुन हे मराठी महिने

किंवा,

वसंत ऋतू = सूर्य मीन आणि मेष या राशींत असण्याचा काळ (अंदाजे १५ मार्च ते १५ मे)
ग्रीष्म ऋतू = सूर्य वृ्षभ आणि मिथुन मेष या राशींत असण्याचा काळ (अंदाजे १५ मे ते १५ जुलै)
वर्षा ऋतू = सूर्य कर्क आणि सिंह या राशींत असण्याचा काळ(अंदाजे १५ जुलै ते १५ सप्टेंबर)
शरद ऋतू = सूर्य कन्या आणि तूळ या राशींत असण्याचा काळ(अंदाजे १५ सप्टेंबर ते १५ नोव्हेंबर)
हेमंत ऋतू = सूर्य वृश्चिक आणि धनु या राशींत असण्याचा काळ(अंदाजे १५ नोव्हेंबर ते १५ जानेवारी)
शिशिर ऋतू = सूर्य मकर आणि कुंभ या राशींत असण्याचा काळ(अंदाजे १५ जानेवारी ते १५ मार्च)

पृथ्वीच्या हजारो वर्षांच्या आयुष्यात वर दिलेल्या ऋतूंच्या तारखा आणि महिने बदलले गेले असण्याची शक्यता आहे. परंतु परंपरा फारश्या बदलेल्या नाहीत.

उत्तर ऑस्ट्रेलिया प्रदेशातील लोक सहा ऋतू मानतात तर विषुववृत्तीय, उष्ण कटिबंधीय आणि काही समशीतोष्ण कटिबंधातील प्रदेशांमध्ये सुका ऋतू आणि ओला ऋतू (पावसाचा ऋतू) असे दोनच प्रकार मानले जातात, ज्यामध्ये आर्द्रतेच्या प्रमाणात होणारा बदल हा तापमानातील बदलापेक्षा जास्त लक्षणीय ठरतो. प्राचीन इजिप्तमध्ये तीन ऋतू मानले जात होते: पुराचा ऋतू, पूर ओसरण्याचा ऋतू आणि सुगीचा ऋतू.

त्याचप्रमाणे काही प्रदेशांमध्ये तेथील विशिष्ट परिस्थितींनुसार ऋतू मानले जातात, जसे टोर्नाडो अ‍ॅली या अमेरिका देशातील भागामध्ये उत्तर हिवाळ्यापासून ते मध्य उन्हाळ्यापर्यंत टोर्नाडो वादळाचा ऋतू असतो. भारतातही मे, ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर ह्या चार महिन्यांच्या काळाला चक्री वादळाचा ऋतू म्हणतात.

भूमध्यसागरी हवामान असणाऱ्या प्रदेशांमध्ये (उदा. पश्चिम ऑस्ट्रेलिया, कॅलिफॉर्निया किनारपट्टी आणि स्पेन, वगैरे) उन्हाळातील वणव्यांचा ऋतू असतो. चक्रीवादळांचा ऋतू उत्तर वसंताच्या आसपास सुरू होतो. पूर्वोत्तर प्रशांत महासागरी प्रदेशांमध्ये हा ऋतू मे १५ तर उत्तर अटलांटिक प्रदेशांमध्ये जूनच्या एक तारखेला सुरू होतो.

पाश्चात्त्य देशांमधील ऋतू : स्प्रिंग, समर, ऑटम, विंटर

विविध प्रदेशांतील ऋतू[संपादन]

प्रदेशागणिक होणारा हवामानातील बदल हा वाढत्या अंतरानुसार अधिक स्पष्ट होतो. जसे की एकाच गावातील दोन ठिकाणचे हवामान सारखेच मानले जाते, तेव्हा सू़क्ष्म फरक बाजूला ठेवले जातात. परंतु हीच दोन ठिकाणे काहीशे किंवा काही हजार किलोमीटर अंतरावर असतील तर मात्र ही ठिकाणे वेगवेगळ्या हवामानाची असू शकतात. त्याचसोबत सभोवतालची भौगोलिक परिस्थितीही त्याकरिता महत्त्वाची ठरते. उदा. काश्मीर, हिमाचल प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, केरळ यांमधील हवामान एकमेकांपेक्षा खूपच वेगळे आहे, तसेच ऋतूदेखील थोडे अधिक वेगळे आहेत. पण हा ऋतूंमधील फरक काश्मीर आणि कन्याकुमारी दरम्यान जास्त स्पष्ट दिसून येतो. हीच अंतरे काही हजार किलोमीटरपर्यंत वाढविल्यास विविधता आणखी वाढते.

वर्षभरातील तापमानानुसार पृथ्वीचे अनेक भाग कल्पिलेले आहेत. पैकी शीत कटिबंध, समशीतोष्ण कटिबंध आणि उष्ण कटिबंध हे तीन मुख्य विभाग आहेत.

महिने आणि ऋतू
उत्तर गोलार्ध महिना दक्षिण गोलार्ध
पारंपरिक हवामानशास्त्रीय खगोलीय हवामानशास्त्रीय खगोलीय
हिवाळा हिवाळा हिवाळा जानेवारी उन्हाळा उन्हाळा
वसंत फेब्रुवारी
वसंत मार्च शरद
वसंत एप्रिल शरद
उन्हाळा मे
उन्हाळा जून हिवाळा
उन्हाळा जुलै हिवाळा
शरद ऑगस्ट
शरद सप्टेंबर वसंत
शरद ऑक्टोबर वसंत
हिवाळा नोव्हेंबर
हिवाळा डिसेंबर उन्हाळा

शीत कटिबंध[संपादन]

ध्रुवीय प्रदेश[संपादन]

ध्रुवीय दिवस आणि रात्र[संपादन]

टुंड्रा प्रदेश[संपादन]

समशीतोष्ण कटिबंध[संपादन]

मौसमी पावसाचे प्रदेश[संपादन]

उष्ण कटिबंध[संपादन]

विषुववृत्तीय प्रदेश[संपादन]

वाळवंटातील ऋतू[संपादन]

ऋतूंची सुरुवात[संपादन]


ऋतू
उन्हाळा - पावसाळा - हिवाळा
वसंत - ग्रीष्म - वर्षा - शरद - हेमंत - शिशिर