सद्गुरू जोगमहाराज संस्थापित वारकरी शिक्षण संस्था

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वारकरी संस्थेची स्थापना सद्गुरू जोग महाराजांच्या कृपाशीर्वादाने व ह.भ.प.वै. मारूतीबुवा गुरव यांच्या प्रयत्नाने झाली, परंतु संस्थेच्या स्थापने नंतर अल्पावधीत म्हणजेच दोन वर्षे अकरा महिन्यातच सद्गुरू जोग महारांचा इहलोकवास समाप्त झाला.परंतु या अल्प काळातच सद्गुरू जोग महाराजांनी संस्थेच्या कायदेशीर आर्थिक व संघटनात्मक बाबांची प्राथमिक पूर्तता करून संस्था स्थिर केली होती. त्यानंतर या कार्याचा विस्तार ह.भ.प.वै. बंकट स्वामी महाराज यांनी २४ वर्ष ३ महिन्यांच्या आपल्या अध्यक्षपदाच्या प्रदीर्घ कार्यकाळात केला. महाराष्ट्रातील खेडोपाडी शुद्ध वारकरी परंपरेचे भजन सुरू केले. भजनासाठी लागणाऱ्या मृदुंगाला बोल दिले, वीणेला स्वर दिला व टाळाला ताल दिला आणि “लावूनी मृदुंग श्रुतीटाळघोष | सेवू ब्रम्हरस आवडीने ||” हे संत तुकाराम महाराजांचे वचन सार्थ केले. प्राथमिक परमार्थ संस्काराचा माध्यम म्हणून खेडोपाडी शिस्तबद्ध, शुद्ध स्वरूपात अखंड हरीनाम सप्ताहाच्या रूपाने ज्ञानसत्र परंपरा सुरू केली.महाराष्ट्रातील जीर्णशीर्ण अशा मठ, मंदिरांना आपले योग्याशिष्य पदाधिकारी देऊन वारकरी संप्रदायाच्या परमार्थस्थलाच्या स्वरूपात विकसित केले. त्यांचा जीर्णोद्धार करवून घेतला. यासाठी स्वामी महाराजांनी आपल्या सर्वसंग परित्यागी संन्यास जीवनाचा विचार न करता संप्रदाय हितार्थ व लोकसंग्रहार्थ खूप परिश्रम घेतले. या कार्यात प.पु. स्वामींनी ह.भ.प.वै. लक्ष्मणबुवा इगतपुरीकर महाराज , ह.भ.प.वै. मामासाहेब दांडेकर ,.भ.प.वै.मारुतीबोवा ठोंबरे, ह.भ.प.वै मारूतीबुवा गुरव या गुरुबंधूंचे मोठे सहकार्य लाभले.

संस्थेत कोणताही भेदभाव बाळगला जात नाही. “अठरा वर्ण याती | भेद नाही तेथे जाती ||” महाराजांच्या वचनानुसार संस्थेत याती कुळाचा विचार न करता एवढेच नव्हे तर धर्माचाही विचार न करता सर्वांसाठी मुक्त ज्ञान सत्र अव्याहत चालू ठेवले आहे. त्यामुळे गरीब-श्रीमंत ,ग्रामीन-नागरी सर्व जातीधर्मामध्ये विद्वानकीर्तनकार निर्माण झाले आहेत. संत साहित्याचे विचाराचे अभ्यासक निर्माण झाले आहेत . त्याच बरोबर भक्तीं व ज्ञान या दोन तीरांचे समन्वय साधणारे अभ्यासक निर्माण झाले आहेत. या भौतिकवादि,चंगळवादि, स्पर्धात्मक काळातही धर्ममनिष्ठ, आचारशुद्ध, विचारशुद्ध युवकांची पिढी निर्माण झाली आहे व पुढेही होत राहील. संत ज्ञानेश्वर माऊली व संत नामदेव महाराजांनी जसे तेराव्या शतकात सर्व जाती धर्मात स्त्री पुरुष साक्षात्कारी धर्माधिकारी, देव तया जवळी वसे | पाप नाशे दारूशने || असे पात्रताप्राप्त संत कवी निर्माण केले. परमार्थ क्षेत्रातील सर्वोच्च वैष्णवी पूज्यता करुण हृदयाने यातिकुळाचा विचार न करता सर्वांसाठी मुक्त केली. वैष्णवांची मांदी (समूह) मेळवून मुक्तीची गवांदीच (अन्नसत्र) घातली. हीच सर्वश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली व संत नामदेव महाराज यांनी तेराव्या शतकातच घालून दिलेली वारकरी परंपरा विसाव्या शतकात वारकरी शिक्षण संस्थेने चालविली आहे. याचा दृश्य परिणाम म्हणजे वर्तमान महाराष्ट्राच्या सर्व थरात, सर्व जाती धर्मात वारकरी सांप्रदायाचा प्रभाव दिसून येत आहे. संस्थेने अनुशासित व प्रगल्भ अशी कीर्तनकार, प्रवचनकार भजन गायक वादकांची परंपरा निर्माण केली व ती उत्तरोत्तर वाढतच चाललेली आहे.

स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज[संपादन]

स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज -

वारकरी संप्रदायात आळंदीपंढरीची काया वाचा मने जिव्हे सर्वस्वे उदार होऊन निस्सीम भक्तिने दरमहा पायी वारी खांद्यावर पताका घेऊन करणारे वारकरी हे सर्वश्रेष्ठ परमपूज्य मानले जातात व तो संप्रदायाचा मुख्य प्रवाह आहे. पायी वारी करणाऱ्या वारकऱ्याबरोबरच दुसरे आदरणीयस्थान फडकऱ्याचे आहे. पिढ्यानपिढ्या दिंडीने पंढरपूर व संतांच्या पवित्र क्षेत्री वारीस जाऊन दशमी ते पौर्णिमा किंवा अमावास्येला काला करून परत येणे ही फडकऱ्याची गेली सातशे वर्षांची पवित्र परंपरा आहे. वारकरी संप्रदायाच्या आचारधर्माची पताका पिढ्यानपिढ्या वहन करणारे दिंडी व फड चालविणारे वारकरी महाराज मंडळी म्हणजेच वैष्णव वारकरी म्हणून संप्रदायात अतिशय पूज्य आहेत. असे असूनही सर्वसामान्य समाजात संप्रदाय प्रचाराला मर्यादा पडत होत्या. फडकऱ्याचे पद वंश परंपरेने आरक्षित होते.ही मर्यादा मान्य करून ज्या कुटुंबात संप्रदाय परंपरा आहे व ज्या कुटुंबात ती नाही अशाही कुटुंबातील सदाचार, संपन्न, अभ्यासू अन्य लोकांनाही वारकरी होऊन कीर्तनकार, प्रवचनकार, तत्त्वज्ञानी, विद्वान, धर्मनिष्ठ, आचारबद्ध होण्याची संधी मिळावी . संप्रदायाचा सर्वत्र समाजात, सर्वस्थरावर विस्तार व्हावा. कीर्तन, प्रवचन, भजन परंपरा वाढावी म्हणून स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज यांनी आपल्या शिष्यांच्या आग्रहावरून आपली सर्वसंगपरित्यागी वैराग्याऋत्ती बाजूला ठेवून, सर्वसामान्यांच्या पारमार्थिक हितासाठी वारकरी शिक्षण संस्थेची श्रीक्षेत्रआळंदी येथे स्थापना केली. आज महाराष्ट्राच्या सर्व भागात परमार्थाची पूर्व परंपरा असलेले व नसलेले अनेक वारकरी संप्रदायात कीर्तनकार, प्रवचनकार, तत्त्वज्ञानी, विद्वान, भजनगायक, वादक तयार झालेले आहेत. याचे सर्वश्रेय स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांच्या चरणप्रसादास आहे. म्हणून अशा पवित्र चरणास साष्टांग दंडवत.

ह.भ.प.वै. मारूतीबुवा गुरव-आळंदीकर[संपादन]

ह.भ.प.वै. मारूतीबुवा गुरव-आळंदीकर : (१० जून १८८५ – १९४२). वारकरी कीर्तनकार, प्रवचनकार. ह.भ.प. मारुतीबोवा गुरव हे वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ कीर्तनकार, प्रवचनकार म्हणून सर्वपरिचित होते. त्यांचा जन्म आळंदीचा. गुरव कुटुंब पूर्वी ज्ञानेश्वर महाराज मंदिरात नित्य पूजा करीत असे. विठोबा सखाराम गुरव आणि रंगुबाई यांच्या पोटी मारुतीबोवांचा जन्म झाला. विठोबा गुरव यांच्या दोन पत्नी होत्या, अक्का आणि रंगुबाई. रंगुबाईंचे माहेर हैबतबाबा पवार यांचे आरफळ हे गाव होय. बालपणीच हैबतबाबांचे चरित्र रंगुबाईंच्या म्हणजे मारुतीबोबांच्या मातोश्रींच्या कानावर पडले. रंगुबाईंच्या घरी पंढरीची वारी होती. त्यांना मारुती,बाबुराव आणि मथुराबाई, काशीबाई अशी चार अपत्ये होती. मारुतीबोबांचे इयत्ता दुसरीपर्यंतचे शिक्षण आळंदीत झाले. पुढे तिसरी, चौथीचे शिक्षण त्यांच्या बहिणीकडे खडकीत झाले. पाचवी इयत्ता आळंदीत उत्तीर्ण झाल्यावर मारुतीबोवांनी शालेय शिक्षणाचा त्याग केला. मारुतीबोवा बालपणापासून आळंदीच्या ज्ञानेश्वर मंदिरात रात्री झोपत त्यामुळे त्यांना रात्रीची शेजारती आणि पहाटेची काकड आरती ऐकायला, पहायला मिळे. रात्री ज्ञानेश्वर मंदिरातील अखंड हरिनाम पहारा मारुतीबोवा करीत.

हैबतबाबांच्या नित्यपाठात असणाऱ्या अभंगमालिकेनुसार ते भजन करीत. वेदशास्त्रसंपन्न लक्ष्मण सदाशिव प्रसादे यांच्या घरी ते योगवासिष्ठ ग्रंथाचे श्रवण करायला जात असत. कृष्णाबाई यांच्याशी बालपणीच मारुतीबोवांचा विवाह झाला. भजनासोबतच कीर्तनाची गोडी मारुतीबोवांना लागली. ते कृष्णबोवा श्रीगोंदेकर, श्रीपादबोवा भिंगारकर आदी कीर्तनकारांची कीर्तने ऐकत. नाना महाराज साखरे ज्ञानेश्वरी सांगत पुण्यात त्यांच्या ज्ञानेश्वरीचे श्रवण मारुतीबोवा करीत. विष्णुबोवा जोग महाराजांच्या कीर्तनाचा प्रभाव मारुतीबोवांवर पडला. त्यांनी माधुकरी मागून उदरनिर्वाह करण्याचा निश्चय केला. त्यांनी आपल्या आईकडेच माधुकरी मागितली. पुढे मारुतीबोवांच्या आईने आपली सून कृष्णाबाई म्हणजे बोवांच्या पत्नीलाच माधुकरी देण्यासाठी पुढे केले पण मारुतीबोवा विचलित झाले नाहीत. ‘पाच घरी भिक्षा मागून जगेन ‘ हा त्यांचा दृढ निश्चय होता. बंकटस्वामी, लक्ष्मणबोवा इगतपुरीकर यांनी आळंदीच्या ज्ञानेश्वर मंदिरात केलेल्या १०८ पारायणांचा फार मोठा प्रभाव मारुतीबोवांवर पडला. विष्णुबोवा जोग महाराज यांच्या पुणे येथील वाड्यात वास्तव्य करून वयाच्या १९ व्या वर्षापासुन मारुतीबोवांनी परमार्थ साधना सुरू केली. ज्ञानेश्वरी ,श्रीमद् भगवत गीता , अमृतानुभव , सकल संत गाथा आदी ग्रंथांचे श्रवण मारुतीबोवांनी विष्णूबोवा जोग महाराजांकडून केले. मारुतीबोवा गुरव यांनी देहूजवळीला भंडारा डोंगरावर साधना केली. मारुतीबोवांनी आपले कार्यक्षेत्र आळंदी हेच निवडले आणि ते कीर्तन , प्रवचन करू लागले. ते ज्ञानेश्वरी सांगू लागले. योग असा की ,लग्न झाल्या नंतर त्यांना पुढे गुरव जातीतील जोडीदार भेटले ते म्हणजे कै.लक्ष्मणबोवा पानसरे व त्यांचे चिरंजीव वै.ज्ञानेश्वर बोबा पानसरे हे होत.मारुतीबोवा ठोंबरे , बंकटस्वामी, मामासाहेब दांडेकर, पंडित पांडुरंग शर्मा, मारुतीबोवा गुरव यांनी वारकरी शाळेची कल्पना विष्णुबोवा जोग महाराज यांच्यापुढे मांडली. महत् प्रसासाने या सर्वानी जोग महाराजांचा होकार मिळवला.या साठी मामा साहेब दांडेकर या त्याच्या गुरुबंधुने सुद्धा प्रयत्न केले. चैत्र शुद्ध प्रतिपदा शके १८३९ रोजी म्हणजे २४ मार्च १९१७ रोजी आळंदीत वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना झाली. वारकरी शिक्षण संस्था आणि मारुतीबोवा गुरव हे एकरूप झाले. विद्यार्थ्यांचे पाठ घेणे त्यांची भोजन, निवासाची व्यवस्था करणे अशी दैनंदिन कामे मारुतीबोवा करू लागले. पहाटे तीन वाजता मारुतीबोवा उठत, इंद्रायणीत स्नान करीत. ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीवर अभिषेक करीत. गणपती, सिद्धेश्वर, सुवर्ण पिंपळ सगळीकडे जलाभिषेक करीत. १९२० ते १९४२ या काळात मारुतीबोवा वारकरी शिक्षण संस्थेचे चिटणीस होते. जोग महाराजांच्या इंद्रायणीच्या तीरावर असणाऱ्या समाधीस्थळ मारुतीबोवांनी नाम सप्ताह आणला. मारुतीबोवांनी कीर्तन, प्रवचनांसोबत ओंकारेश्वर सोरटी सोमनाथ, केदारनाथ, मूळ द्वारका, गोमती द्वारका, अयोध्या, गोकुळ, वृंदावन आदी तीर्थक्षेत्री यात्रा केल्या. मारुतीबोवांनी वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांसोबत १९३५ पासून पायी देहू वारीची परंपरा सुरू केली. खेडच्या तुरुंगातील कैद्यांना १९२२ साली मारुतीबोवांनी ज्ञानेश्वरी सांगितली. १९४२ साली मारुतीबोवांनी वारकरी शिक्षण रौप्यमहोत्सवी कार्यक्रमासाठी मोलाचे योगदान दिले. त्याचवर्षी त्यांचे निधन झाले.

संदर्भ : • 1)शताब्दी महोत्सवी शतामृतधारा, वारकरी शिक्षण संस्था, आळंदी. 2) 2) वै.मारूतीबुवर गुरव (आळंदीकर) जीवन चरीत्र. लेखक :- नथुसिंग डोंगरसिंग राजपुत. ( शिक्षक - वारकरी शिक्षण संस्था,आळंदी ) यांचे पुस्तक.

ह.भ.प.वै. बंकट स्वामी महाराज[संपादन]

ह.भ.प.वै. बंकट स्वामी महाराज -

स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज यांच्या वैकुंठ गमना नंतर त्यांचे शिष्य ह.भ.प.वै. बंकट स्वामी महाराज हे वारकरी शिक्षण संस्थाच्या अध्यक्षपदी विराजमान झाले. त्यांनी अध्यक्ष म्हणून संस्थेचा कारभार १८ फेब्रुवारी १९२० ते १२ मे १९४४ पर्यंत म्हणजेच २४ वर्ष ३ महिने पाहिला. त्यांचाच दोन तपाच्या (२४ वर्षच्या) काळात वारकरी शिक्षण संस्था घासवाले धर्मशाळेतून संस्थेने विकत घेतलेल्या मालकीच्या जुन्या घरात सुरू झाली. ह.भ.प.वै. बंकट स्वामी महाराज यांनी संस्थेला स्थैर्य मिळावे म्हणून आर्थिक वर्गणी, दान मिळतील तेथे शेतजमिनी व घरे मिळवून संस्थेला स्थैर्य प्राप्त करून दिले. याचबरोबर महाराष्ट्रभर पायपीट करून वारकरी परंपरेचे भजन कीर्तन, नामसप्ताह सुरू केले. सर्वसामान्य कुटुंबातील खेड्यापाड्यातील मुलांना आळंदी येथे आणून त्यांना वारकरी संस्काराने सुसंस्कृत करून अभ्यासू साधक उत्तम कीर्तनकार, प्रवचनकार, गायकवादक बनविले व आपल्या शिष्यांच्या माध्यमातून दुरावस्था झालेल्या मठ मंदिरांचा जीर्णोद्धार घडवून आणला आणि त्यांचे व्यावस्थापन व्यवस्थित चालावे म्हणून आपल्या योग्य शिष्यांची नेमणूक त्या ठिकाणी केली व महाराष्ट्राच्या परमार्थिक विश्वामध्ये नवचैतन्य निर्माण केले. ज्या कुटुंबात, गावात किंवा समाजात वारकरी संस्कार नव्हते अशा ठिकाणी अतिशय कष्ट व सायासाने त्यांनी वारकरी सांप्रदाय रुझविला. वर्तमान कीर्तन पद्धती, प्रवचन पद्धती,भजन गायन पद्धती पुनर्स्थापित करण्याचे श्रेय ह.भ.प.वै. बंकट स्वामी महाराज यांनाच आहे. त्यांनी आपली मोठी शिष्य परंपरा महाराष्ट्रात निर्माण केली.आज त्या शिष्य परंपरेने संपूर्ण मराठी विश्व संप्रदायाच्या संस्काराने पुनीत केले आहे. अशा ह.भ.प.वै. बंकट स्वामी महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम.

ह.भ.प.वै.लक्ष्मणबुवा इगतपूरीकर[संपादन]

ह.भ.प.वै.लक्ष्मणबुवा इगतपूरीकर

ह.भ.प.वै.लक्ष्मण केरोजी खेमनर तथा लक्ष्मणबुवा इगतपूरीकर हे संस्थेचे २ फेब्रुवारी १९२३ ते १४ जून १९४४ पर्यंत उपाध्यक्ष होते. ह.भ.प.वै. बंकट स्वामी महाराज यांनी संस्थेला स्थैर्य मिळावे म्हणून महाराष्ट्रभर फिरून संस्थेसाठी निधी व विद्यार्थी गोळा केले. परंतु ह.भ.प.वै.लक्ष्मणबुवा इगतपूरीकर यांनी संस्थेत राहून विद्यार्थी घडविण्याचे व दैनंदिन व्यवस्थेचे काम पाहिले हे दोन्ही स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांचे पट्टशिष्य अभिन्न मनाने आपल्या गुरूंनी सोपविलेले कार्य पार पाडत होते. ते अतिशय विरक्त ज्ञानी वारकरी होते.त्यांच्या संत संगतीने अनेक साधक आपले जीवन सार्थक करून गेले.त्यांच्या पुण्यप्रभावाने प्रभावित झालेले तत्कालीन विद्यार्थीवर्ग महाराष्ट्रभर दिसून येत आहे. अशा या संतांच्या चरणी साष्टांग दंडवत.

ह.भ.प.वै.मामासाहेब दांडेकर[संपादन]

ह.भ.प.वै.मामासाहेब दांडेकर

ह.भ.प.वै.शंकर वामन तथा मामासाहेब दांडेकर हे जोग महाराजांचे अतिशय प्रिय शिष्य होते. ते वारकरी शिक्षण संस्थेचे २५ मार्च १९१७ ते २ फेब्रुवारी १९२३ असे ५ वर्ष ११ महिने संस्थापक सचिव होते. ५ जुलै १९५२ ते ९ जुलै १९६८ असे सोळा वर्ष अध्यक्ष होते. ह.भ.प.वै. शंकर वामन तथा मामासाहेब दांडेकर हे जोग महाराजांच्या चार पट्टशिष्यापैकी सर्वात लहान म्हणजेच संस्थेच्या स्थापनेच्या वेळी ते केवळ २० वर्ष ११ महिने वयाचे होते. ते उच्च विद्या विभूषित होते. त्यांनी तत्त्वज्ञानाचे आदर्श प्राध्यापक व महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून नाव लौकिक प्राप्त केला होता. व पुढे वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू म्हणून सर्वत्र पूज्य भावनेने त्यांना समाजाने पूजले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या प्रभावाने उच्च विध्याविभूषित उच्चभ्रू समाज वारकरी सांप्रदायाकडे आकृष्ट झाला. त्यांनी वारकरी संत तत्त्वज्ञान प्रसारार्थ अनेक पुस्तके लिहिली. विशेष म्हणजे त्यांनी संपादित केलेली विद्वत्तापूर्ण संशोधनात्मक,प्रस्तावनेसह सार्थ ज्ञानेश्वरी संप्रदायात सर्वमान्य आहे. हे अतुलनीय व्यक्तिमत्त्व वारकरी शिक्षण संस्थेला लाभल्यामुळे वारकरी शिक्षण संस्थेने अनेक डॉक्टर, वकील, प्राध्यापक,इंजिनिअर, कीर्तनकार निर्माण केले. ह.भ.प.वै. मामासाहेब दांडेकर यांच्या शिस्तबद्ध त्यागमय जीवनाचा पुण्यप्रभावाच आजही संस्थेचे मार्गदर्शन करीत आहे. अशा परमपूज्य संताच्या चरणी कोटी कोटी प्रणाम.

ह.भ.प.वै. स.के.नेऊरगावकर[संपादन]

ह.भ.प.वै. स.के.नेऊरगावकर

ह.भ.प.वै. सदाशिव केशव नेऊरगावकर तथा रावसाहेब हे उच्चविद्याविभूषितब स्थापत्य अभियंता (सिव्हील इंजिनीअर)होते. त्यांनी पुणे महानगर पालिकेचे प्रथम नगर अभियंता पदावर १९३१ ते १९६० साला पर्यंत काम केले. ते संत तत्त्वज्ञानाचे व धर्म ग्रंथाचे उत्तम अभ्यासक होते. त्यांनी चाळीस वर्ष कीर्तन प्रवचने करून धर्म प्रसार केला. ते शुद्ध एकादशीला पंढरपूर व वद्य एकादशीला आळंदीची वारी करीत ते प.पु. मामासाहेब दांडेकरांचे अनुग्रहित होते. ते सन १९५३ पासून संस्थेचे विश्वस्त होते. ते ४ सप्टेंबर १९६८ ते ३१ मे १९७८ म्हणजेच ९ वर्ष दहा महिने या कालावधीत संस्थेचे अध्यक्ष होते. त्यांनी आपल्या विद्वत्तेचा व शुद्ध आचरणाचा ठसा वारकरी संप्रदाय व विद्यार्थी वर्गावर उमटविला होता. त्यांची ग्रंथ संपदा आळंदी दर्शन, पालखी सोहळा, ज्ञानेश्वर महाराज चरित्र , श्रीसार्थ तुकाराम गाथा, ह.भ.प.वै मामासाहेब दांडेकर यांची प्रवचने , सार्थ दासबोध, सार्थ करुणाष्टके ही आहेत. वारकरी शिक्षण संस्थेबरोबरच ते पुणे नगर वाचन मंदिर ,चिंचवड देवस्थान, श्रीनिवडूंगा विठोबा मंदिर, नारद मंदिर, रामकृष्ण आश्रम, श्री देवदेवेश्वर पर्वती संस्थान, आनादाश्रम, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी अशा थोर प्रकांड विद्वान कृतार्थ जीवनास साष्टांग दंडवत .