श्रीसत्याम्बा व्रत माहात्म्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

॥ॐ॥

॥श्री गणेशाय नमः॥

॥श्रीसत्याम्बादेवतायै नमः॥

॥श्रीगुरूभ्यो नमः॥

आपल्या हिंदू धर्मात विविध कारणांसाठी वेगवेगळी व्रतवैकल्ये सांगितलेली आहेत. ही व्रतवैकल्ये शुद्ध मनाने, पूर्ण श्रद्धेने व विधिपूर्वक केल्यास त्यांचे अपेक्षित फल मिळाल्याशिवाय रहात नाही.

श्रीसत्याम्बादेवीचे व्रतही या प्रकारे केल्यास व्रतकर्त्याचे सर्व मनोरथ निश्चितपणे पूर्ण होऊन त्याची प्राप्त संकटापासून मुक्तता होते व त्यास सुख, समाधान व आनंद यांची निश्चित प्राप्ती होते असा अनेक व्रतकर्त्यांचा रोकडा अनुभव आहे.

सत्याम्बादेवी कोण[संपादन]

आता प्रथम वाचकांना श्रीसत्याम्बा देवीची थोडक्यात माहिती सांगणे आवश्यक आहे.

श्रीसत्याम्बा म्हणजे दुसरी तिसरी कुणी नसून जगन्माता दुर्गा किंवा जगदम्बाच होय. महर्षी व्यासांनी लिहिलेल्या 'देवी भागवत' पुराणात हिच्या पराक्रमाचे वर्णन वाचावयास मिळते. ईशशक्ती ही निर्गुण निराकार असली तरी भक्तांवरील प्रेमाखातर तिला सगुण रूपात साकार व्हावे लागते व आपल्या भक्तांना दर्शन देऊन त्यांचे मनोरथ पूर्ण करावे लागतात. ही शक्ती सगुण रूपात साकार झाल्यानंतर तिच्या प्रसन्नतेसाठी तिचे भक्त तिला सहस्त्रावधि नावे देऊन आपले तिच्याविषयीचे प्रेम प्रकट करीत असतात. श्रीदुर्गादेवी म्हणजेच श्रीसत्याम्बा, हिलाही अनंत नामे आहेत, तिची अनंत रुपे आहेत. तिचे गुणही अनंत आहेत.

ही देवी दुर्गा, चामुण्डा, वाराही, लक्ष्मी, विमला, बहुला, नित्या, वनदुर्गा, मातंगी, कालरात्री, कुमारी, शिवदूती, मधुकैटभन्त्री, सावित्री, परमेश्वरी, कात्यायनी, ब्रह्मवादिनी अशा विविध नावांनी ओळखली व आळवली जाते.

'श्रीसत्याम्बा' मधील 'सत्य' शब्द हा ब्रह्मवाचक आहे. 'जे सतत असते तेच सत्य !' ईशशक्ती शिवाय दुसरे काहीच सत्य नाही. तर अम्बा याचा अर्थ आई किंवा माता. देवी जगन्माता आहे. कारण तिच्या पासूनच अखिल ब्रह्मांडाची उत्पत्ति आहे. अशाप्रकारे 'सत्याम्बा' हा शब्द निर्माण झाला. हीच श्रीसत्याम्बा महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वति असून वेगवेगळ्या कार्यासाठी तिने ही विविध रुपे धारण केलेली आहेत. हिचे स्मरण आणि पूजन अत्यंत पुण्यप्रद असून साधकांचे सर्व मनोरथ त्वरित पूर्ण करणारे असल्याने हिचे व्रत नियमाने करणे मनुष्यमात्राच्या हिताचे आहे.

व्रत कसे करावे[संपादन]

श्रीसत्याम्बा व्रताचा विधि अतिशय सोपा आहे. हा व्रतविधी सूर्य संक्रांतीच्या दिवशी, म्हणजेच सूर्य ज्या दिवशी नव्या राशीत प्रवेश करतो त्या दिवशी किंवा अष्टमी पौर्णिमा, मंगळवार, शुक्रवार या दिवशी करावा. परंतु मन प्रसन्न असेल अशा अन्य दिवशीही करण्यास हरकत नाही.

त्या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान वगैरे उरकावे व कायावाचा मनाने देवीचे स्मरण व पूजन करावे. व्रताचे फल त्वरित मिळण्यासाठी व्रतकर्त्याने शास्त्रात सांगितलेल्या यम-नियमांचे पालन करणे मात्र फार आवश्यक आहे. कारण त्यायोगेच मन शुद्ध होऊन त्या ईशशक्तीशी मनाने संबंध जोडणे लवकर साधते व त्या शक्तीची कृपाही त्वरित होते.

श्री सत्याम्बा व्रत महात्म्य 🌹[संपादन]

पूजेचे साहित्य, प्रसाद व महानैवेद्य[संपादन]

पूजेचे साहित्य

या व्रतासाठी प्रथम केळीचे खांब, आंब्याची पाने, कलश, देवीची सुवर्णाची (वा अन्य धातूची) प्रतिमा. चौरंग, गहू किंवा तांदूळ, विडयाची पाने, सुपार्या, खोबऱ्याची वाटी, बदाम, खारका, वस्त्र, उपवस्त्र, नारळ, हळद, कुंकू, बुक्का, गुलाल, कापूर, उदबत्ती, फुले, बेल, दुर्वा, पंचामृत, सुगंधी तेल आणि दक्षिणा इ. सामुग्री जमवावी.

प्रसाद व महानैवेद्य[संपादन]

त्याचप्रमाणे प्रसाद व महानैवेद्यही तयार करावा. प्रसादासाठी खवा, तूप, साखर, रवा, केशर, बदाम, खिसमिस, वेलदोडे याची आवश्यकता असून प्रसादाचे साहित्य दिडीच्या प्रमाणात असावे.

महानैवेद्यात भात, भाज्या, कोशिंबिरी तसेच मुख्य खीर असावी. दुसऱ्या नैवेद्यासाठी केशरमिश्रित रव्याचे लाडू करावेत. (हा नैवेद्य अर्थातच सोवळ्यात तयार करावा.)

हा व्रतविधी संध्याकाळी करावयाचा असून त्यासाठी संध्याकाळ होण्यापूर्वी थोडावेळ आधी पतिपत्नींनी स्नान करून शुचिर्भूत व्हावे व पवित्र महावस्त्र नेसून शुद्ध केलेल्या आसनावर प्रसन्न चित्ताने विराजमान व्हावे. नंतर मंडप तोरणांनी सुशोभित केलेल्या चौरंगावरील श्रीसत्याम्बेच्या सुवर्ण अथवा अन्य धातूच्या प्रतिमेची पूजा करावी.

प्रथम आचमन, प्राणायाम करून व देशकालाचे स्मरण करून संकल्पाचा उच्चार करावा. हा संकल्प पुढीलप्रमाणे उच्चारावा-

'ममात्मनः श्रुतिस्मृति पुरोणोक्त फलप्राप्तर्थ्य मम सहकुटुम्बस्य क्षेमस्थैर्यायुरारोग्यैश्वर्याभ्युदयार्थं मनोप्सितकामनासिद्धयर्थं

(येथे कामनेचा उच्चार करावा.)

श्रीसत्यांबाव्रतांगत्वेन यथासंपादितसामग्रया श्रीमहाकाली महालक्ष्मी महासरस्वतीस्वरुपि श्रीसत्यांम्बामहादेवीपूजनं करिष्ये' ।

त्यानंतर सर्व व्रतकार्य निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी महागणपतीचे आवाहन करून पूजन करावे.

यांनतर पूजा विधी पुढे अतिशय सोप्या संस्कृत भाषेत दिला आहे. त्याप्रमाणे करावा व शेवटी कथा वाचन करून आरती करावी. तसेच प्रसाद व महानैवेद्याचा प्रसाद देवीला दाखवावा.

हे व्रत करणाऱ्या यजमानाने व त्याच्या पत्नीने संपूर्ण दिवस उपवास करावा व रात्री आरती नंतर ब्राह्मणांना दक्षिणा वगैरे देऊन आप्तजन व ब्राह्मण यांचेसह आनंदाने भोजन करावे. रात्रौ झोपण्यापूर्वी श्रीसत्याम्बा देवीचे अत्यंत श्रद्धायुक्त व शुद्ध अंतःकरणाने स्मरण करावे.

या व्रताचे माहात्म्य स्वयं भगवान् शंकरांनी आपला पुत्र कार्तिकेय उर्फ षडानन यास सांगितले असून ते म्हणतात की, हे सत्याम्बाव्रत मनुष्याच्या सर्व इच्छा त्वरित पूर्ण करणारे असून कलियुगात खरोखरच महान् फल देणारे आहे.

या व्रताच्याच योगे प्रत्यक्ष शंकरही प्राप्त संकटातून मुक्त झाले. तसेच त्यांचा पुत्र षडानन यालाही असुरांबरोबरच्या युद्धात मोठा विजय प्राप्त झाला !

तसेच फार वर्षापूर्वी कांचीपुरात कौंडिण्य नावाचा एक ब्राह्मण रहात होता. तो अत्यंत दरिद्री असल्याने त्याची पत्नी त्यास नेहमी टाकून बोलत असे. त्यायोगे जीवनास कंटाळून तो ब्राह्मण जीव देण्यासाठी विहिरीपाशी गेला. परंतु पूर्वपुण्याईच्या योगे त्याचवेळी देवी सत्याम्बा तेथे प्रकट झाली व तिने त्यास आत्महत्त्येपासून परावृत्त करून सर्व मनोरथ पूर्ण करणारे असे श्रीसत्याम्बा व्रत करण्याचा उपदेश केला. त्या ब्राह्मणानेही तिच्या शब्दावर विश्वास ठेवून हे प्रभावी व्रत केले व त्यायोगे त्यास विपुल धनाची प्राप्ती होऊन त्याचा संसार सुखाचा झाला.

मागध देशाचा राजा सूर्यकेतू याच्यावर मालवराजा चाल करून आला. त्यामुळे सूर्यकेतू अतिशय चिंताक्रांत झाला. परंतु त्याच्या गुरूने त्यास सत्याम्बाव्रत करण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे राजाने हे व्रत केले व त्यायोगे मालवराजाचा पराभव होऊन तो सूर्यकेतूस शरण आला.

या सूर्यकेतूच्याच राज्यात गुण्ड नावाचा एक शूद्र रहात होता, त्यास संतति नव्हती. तेव्हा त्यानेही सूर्यकेतूकडून या व्रताची माहिती मिळविली व ते व्रत सुरू केले. त्यायोगे त्यासही पुत्र झाला. परंतु पुढे व्रताचे विस्मरण झाल्यामुळे त्याच्यावर अनेक संकटे आली. तथापि योगायोगाने त्यास पुन्हा या व्रताचे स्मरण झाले व त्याची सर्व दुःखे नष्ट झाली व तो सुखासमाधानाने राहू लागला.

या व्रताचे माहात्म्य वर्णन करताना श्रीसूत शौनकादी ऋषींना सांगतात की, 'हे सत्याम्बाव्रत या लोकी मोठमोठया संकटांचा नाश करणारे असून पुत्र आणि धन देणारे आहे. तसेच हे व्रत करणाऱ्या मनुष्यास अंती मुक्ती मिळून तो सत्याम्बा लोकात जाऊन तेथे हजारो वर्षे आनंदाने कालक्रमणा करतो.'

या व्रताचे माहात्म्य असे आहे की या व्रताची नुसती कथा श्रवण करण्यानेही व्रत केल्याचे फल मनुष्याला प्राप्त होते !