शिरूर तालुका (पुणे)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(शिरूर तालुका, पुणे जिल्हा या पानावरून पुनर्निर्देशित)
शिरूर तालुका
कासारी
महाराष्ट्र राज्याच्या पुणे जिल्ह्याच्या नकाशावरील शिरूर तालुका दर्शविणारे स्थान

राज्य महाराष्ट्र, भारत ध्वज भारत
जिल्हा पुणे
जिल्हा उप-विभाग मावळ
मुख्यालय शिरूर




शिरूर तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्याचा एक तालुका आहे.

तालुक्यातील गावे[संपादन]

शिरूर तालुक्यात 106 गावे आहेत.[१]


धार्मिकआणि ऐतिहासिक स्थळे[संपादन]

शिरूर तालुक्यात रांजणगाव गणपती, कान्हुरची मसाई देवी, कवठ्याची येमाई, टाकळीची मळगंगा आणि शिरूरचे रामलिंग, अशी धार्मिक स्थळे आहेत. रांजणगाव गणपती हे अष्टविनायक मधील एक देवस्थान आहे. वढू बुद्रुक येथे संभाजी महाराजांची समाधी आहे. पाबळ येथे पहिले बाजीराव यांच्या पत्नी मस्तानी साहेब यांची समाधी आहे. कोरेगाव भीमा येथे "विजय स्तंभ" आहे. १ जानेवारी १८१८ रोजी दुसरे बाजीराव पेशवे आणि ब्रिटिश सैनिकांदरम्यान झालेल्या युद्धात महार रेजिमेंट ने पेशव्यांच्या सैन्याचा पराभव केला होता आणि म्हणूनच ही घटना दलित चळवळीच्या इतिहासातला महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचं दलित कार्यकर्ते मानतात[२]. पाबळ येथे पहिले बाजीराव यांच्या पत्नी मस्तानी साहेब यांची समाधी आहे मलठण येथे ऐतिहासिक श्री मल्लिकार्जुन महादेवाचे पेशवे कालीन शिव मंदिर आहे. इथेच श्रीमंत सरदार पवार घराण्याचा किल्ला बऱ्यापैकी सुस्थितीत आहे, या मध्ये बारा दरवाजाची विहीर आहे,

लोककला आणि साहित्य[संपादन]

कवठे यमाई गाव हे ऐतेहासिक वारसा लाभलेले गाव असून येथे मराठा सरदार श्रीमंत पवार यांनी अठराव्या शतकात उभारलेली आणि अजून ही सुस्थितीत असलली एक गढी (राजवाडा) आहे. साहजिकच, कला आणि कलावंतांना प्रोत्साहन देणारे हे गाव महाराष्ट्र राज्यात आपलं एक वेगळे स्थान टिकवून आहे. प्रसिद्ध तमाशा कलावंत भाऊ बापू मांग नारायणगावकर, विठ्ठल कवठेकर, गंगाराम बुआ रेणके अशी नामवंत तमाशा कलाकार, फड मालक या मातीत जन्मले आणि प्रसिद्ध पावले. आपल्या शृंगारिक लावण्यांसाठी आणि लोकजागृती करणाऱ्या लघुनाट्य लिखाणासाठी प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ साहित्यिक बशीर मोमीन (कवठेकर) हे सुद्धा याच गावचे. बशीर मोमीन यांनी मराठी भाषेत लावणी, वगनाट्य, नाटक, धार्मिक भक्तिगीते, देशभक्तीपर गीते याबरोबरच विविध प्रकारची लोक गीते लिहिली आहेत[३]. हुंडाबंदी, दारूबंदी, निरक्षरता, अंधश्रद्धा, भ्रष्टाचार यांसारख्या ज्वलंत विषयांवर त्यांनी लेखन करीत त्यामाध्यमातून सामाजिक परिवर्तनासाठी प्रयत्न केले. व्यसनमुक्ती, राष्ट्रीय साक्षरता अभियान, ग्राम स्वछता अभियान यासारख्या शासकीय चळवळी मध्ये सुद्धा त्यांनी हिरहिरीने भाग घेतला आणि आपल्या कलापथकाच्या माध्यमातून ग्रामीण भागात जनजागृतीचे महत्त्वपूर्ण कार्य केले. लोककला, साहित्य आणि संस्कृती या क्षेत्रातील त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल महाराष्ट्र शासनाने वर्ष २०१८चा 'विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार' त्यांना देऊन गौरविले आहे[४]. महाराष्ट्र शासना तर्फे तमाशा कला क्षेत्रासाठी दिला जाणारा सर्वोच्च असा 'विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार' मिळवणारे दोन दिग्गज श्री गंगाराम रेणके आणि लोकशाहीर बशीर मोमीन उर्फ बी. के. मोमीन कवठेकर येथेच राहतात.


इतर माहिती[संपादन]

जगातली तिसरी आणि भारतातील पहिली “झिरो एनर्जी स्कूल”* म्हणून वाबळेवाडीच्या शाळेचा उल्लेख केला जातो. सध्या शाळेत सहाशे विद्यार्थी आहेत. कधीकाळी दोन पडक्या खोल्यामध्ये भरवण्यात येणारी ही शाळा आज जिल्हा परिषद शाळांसाठी सर्वात मोठ्ठी रोल मॉडेल ठरलेय. वाबळेवाडी हे गाव शिरूर तालुक्यातील शिक्रापूर पासून अडीच किलोमीटरवरच गाव. वाबळेवाडीची लोकसंख्या म्हणजे पन्नास ते साठ घरांच छोटस गाव. गावाची लोकसंख्या साडेतीनशे. गावची जिल्हा परिषदेची शाळा म्हणजे फक्त दोन गळक्या खोल्या. २०१२ या वर्षी जानेगाव येथून बदली होवून नवीन शिक्षक आले. पडक्या खोल्या पाहून एखाद्या शिक्षकानं काय केलं असत तर आपल्या सगळे कॉन्टेक्ट वापरून बदलीसाठी प्रयत्न केले असते. पण वारे गुरुजी वेगळे होते. वारे गुरुजी नवीन आव्हानं घेण्यासाठी ओळखले जायचे.

वारे गुरुजी विद्यार्थांना शिकवण्यास सुरुवात केली. दोन छोट्या खोल्या. त्यामध्ये दोन शिक्षक आणि सर्व इयत्तेची मुले एकत्र अस एकंदरित चित्र. हे चित्र बदलण्यासाठी वारे गुरुजींनी १५ ऑगस्ट २०१२ मध्ये वाबळेवाडीच्या ग्रामसभेत एक आराखडा मांडला. शाळा जागतिक पातळीवर घेऊन जाण्यासाठी काय करता येईल हे मांडणारा तो आराखडा. दोन पडक्या खोल्यामधून जागतिक दर्जाची शाळा निर्माण करणं म्हणजे हास्यास्पद गोष्ट होती पण वारे सरांनी ते काम मनावर घेतलं. गावच्या लोकांना यातलं विशेष माहित नव्हतं पण त्यांना एकाच गोष्टीवर ठाम विश्वास होता तो म्हणजे वारे गुरुजी म्हणतायत म्हणजे काहीतरी चांगल होईल.

संपूर्ण गावाने एकत्र येऊन झटायचं असा तो ठराव होता. २०१२ साली गावात एकूण १९ महिला बचत गट होते. या बचत गटांनी एक गोष्ट ठरवली ती म्हणजे पुढची तीन वर्ष आपणाला जो काही नफा होईल तो शाळेला द्यायचा. पै अन् पै गोळा करून संसार उभा करणाऱ्या महिलांच्या दृष्टीने पाहिलं तर ही गोष्ट खूप क्रांन्तीकारी वाटेल. बचत गटांसोबत गावातले तरुण धावून आले. नवरात्र आणि गणेशोत्सवांसारख्या सणांचा खर्च कमी करून तो पैसा शाळेसाठी उभा करण्याच ठरवण्यात आलं.

वाबळेवाडीची ही शाळा का उभा राहू शकली याचं मुख्य कारण म्हणजे गाव आणि शाळा एकत्र आली. शाळेतील शिक्षकांवर गावाने विश्वास दाखवला आणि शिक्षकांनी देखील तो सार्थ करून दाखवला. शिक्षक प्रयोग करत आहेत म्हणल्यानंतर शाळेची विद्यार्थीसंख्या देखील वाढू लागली. गावाची मदत कशी होत गेली याबद्दल सांगायच झालं तर गावात यात्रेनिमित्त तमाशा आयोजित करण्यात आला होता.

सुमारे सव्वा लाख रुपये यात्रा कमिटीमार्फत तमाशासाठी गोळा करण्यात आले होते. वारे गुरुजींनी यात्रा कमिटीची भेट घेतली, तेव्हा यात्रा कमिटीने तात्काळ १ लाख २० हजार रुपयांची रक्कम वारे सरांना देण्याच मंजूर केलं. त्या रकमेतून वारे सरांनी विद्यार्थांना टॅब घेतले.

  • महाराष्ट्रातील पहिले टॅब स्कूल म्हणून या शाळेचा उल्लेख करावा लागतो.* हे पैसै तमाशासाठी गोळा करण्यात आले होते. ते खऱ्या अर्थाने सत्कारणी लागले.

आज शाळेची जी इमारत आहे ती गावकऱ्यांनी दिलेल्या जागेवर आहे. नवीन खोल्या बांधाव्यात म्हणून वारे सरांनी गावकऱ्यापुढे आपलं म्हणणं मांडल. गावकऱ्यांनी देखील सुमारे दिड एकर शेती बक्षीसपत्र करून शाळेच्या नावावर केली.

तालुक्यातल्या जमिनीचे भाव पाहता दिड एकर जमिनीची किंमत अडीच कोटी रुपयांपेक्षा अधिक होते. हळूहळू शाळा रुपडं बदलत असताना गावकऱ्यांनी पुन्हा नजीकची दिड एकर जमीन शाळेसाठी देवू केली. शाळेमध्ये सुमारे दोनशे विद्यार्थी झाले. तरिही खैरे सर आणि वारे सर असे दोनच शिक्षक विद्यार्थांना शिकवण्याच काम करत होते. सर्व इयत्तेच्या विद्यार्थांना शिकवण्यासाठी दोघांनी मिळून अभिनव अशा संकल्पना सुरू केल्या. दहा दहा विद्यार्थांचे गट तयार करून त्यांना वरच्या वर्गातील एक विद्यार्थी विषय मित्र म्हणून देण्यात आले. छोटे प्रयोग करून विज्ञानाच्या संकल्पना विद्यार्थांमध्ये रुजवण्यात आल्या.

शाळेची कीर्ती सर्वदूर पोहचू लागल्यानंतर एक दिवस *बँक ऑफ न्यूयार्कचे काही अधिकारी शाळेला भेट देण्यासाठी आले.* त्यांनी शाळेला देणगी देण्याची भावना बोलून दाखवली. नक्की कोणत्या प्रकारची शाळा हवी असे विचारल्यानंतर वारे सरांनी त्यांना शाळेचे डिझाइन दाखवले. ते डिझाइन पसंत पडले. नव्याने शाळेची रचना करण्यात आली. *आतराष्ट्रीय दर्जाची* मिळतीजुळती अशी *झिरो एनर्जी स्कुल*ची निर्मीती करण्यात आली.

जपान आणि आयर्लेंड सोडल्यानंतर जगातली ही तिसरी शाळा ठरली. अनुभवातून शिक्षण देण्याच सुत्र शाळेने स्वीकारलं. दिवाळीच्या सुट्टीत मुलांना पोहायला शिकवण्याची जबाबदारी देखील शाळेने घेतली. संगीत, नाटक अशा प्रत्येक गोष्टीत विद्यार्थांची रुची वाढवण्यात आली. मुलांनी श्रमसंस्कार मिळावेत म्हणून पंचक्रोशीत झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला. त्यातूनच परिसरात सुमारे एक लाख वृक्षांची लागवड करण्यात आली.

शाळेची यशस्वी घौडदौड पाहून राज्य सरकारकडून दहा शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली. आज शाळेत बारा शिक्षक आहेत. ओजसच्या उपक्रमातून शाळेत आठवीपर्यन्तचे वर्ग निर्माण करण्यात आले. आज शाळेत नववी प्रर्यन्तचे वर्ग आहेत. तर भविष्यात १२ वी पर्यन्तचे शिक्षण देण्यात येणार आहे. १२ वी पर्यन्तचे शिक्षण देणारी राज्यातील पहिली शाळा असण्याचा सन्मान वाबळेवाडीच्या शाळेला मिळणार आहे. आज शाळेची विद्यार्थीसंख्या सुमारे सहाशे असून चार हजार विद्यार्थी वेटिंग लिस्टमध्ये आहेत. आणि *विशेष म्हणजे ही शाळा आजही मराठी माध्यमच आहे.*

संदर्भ[संपादन]

  1. ^ "महाराष्ट्र भूमि अभिलेख (महाभुलेख)". Archived from the original on 2020-05-25. 2014-06-01 रोजी पाहिले.
  2. ^ "भीमा कोरेगावची लढाई नेमकी आहे तरी काय?",[[बीबीसी], 3-Jan-2018
  3. ^ "बशीर मोमीन (कवठेकर)", दै.महाराष्ट्र टाइम्स, 2-March-2019
  4. ^ आयुष्यभराच्या निरपेक्ष सेवेचा गौरव- लोकशाहीर बशीर मोमीन यांच्या भावना Archived 2020-11-08 at the Wayback Machine. "दै.सामना”, 1-March-2019
पुणे जिल्ह्यातील तालुके
हवेली तालुका | पुणे शहर तालुका | खेड तालुका | जुन्नर तालुका | आंबेगाव तालुका | मावळ तालुका | मुळशी तालुका | भोर तालुका | शिरूर तालुका | राजगड तालुका | पुरंदर तालुका | बारामती तालुका | इंदापूर तालुका | दौंड तालुका