शरद राजगुरू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(शरद नरहर राजगुरू या पानावरून पुनर्निर्देशित)

डॉ. शरद नरहर राजगुरू (जन्म : २६ नोव्हेंबर १९३३) हे एक जागतिक कीर्तीचे मराठी भूपुरातत्त्वज्ञ आहेत. त्यांचा जन्म पुण्यात शनिवार पेठेत एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांनी १९५५साली भूशास्त्र या विषयातली पदवी घेतली आणि १९५७साली आपले पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर दोन महिन्याततच शरद राजगुरू यांनी जमशेदपूर येथे सरकारी नोकरी मिळाली, पण ती लवकरच सोडली. पुण्यातील टाय एक्स्प्लोजिव्ह्ज (एचई), मुंबईतील खंडेलवाल आणि नंतर मुंबईतील मिनिस्ट्री ऑफ सायंटिफिक ॲन्ड कल्चरल अफेअर्स अशा ठिकाणीही त्यांनी भूशास्त्रज्ञ म्हणून नोकऱ्या केल्या. पण एकाही नोकरीत ते टिकले नाहीत.

पीएच.डी[संपादन]

नोकरीत आपल्याला काही तरी नवीन करायला-शिकायला मिळेल असे राजगुरू यांना वाटे. पण तसे काहीच न झाल्याने त्यांनी कोणत्या तरी संस्थेत जाऊन नवीन संशोधन करायचे ठरवले. त्यासाठी त्यांनी मे १९५८मध्ये पुण्यातल्या डेक्कन कॉलेजातील डॉ. सांकलिया यांना पत्र लिहिले आणि आपली इच्छा कळविली. सांकलियांच्या सांगण्याप्रमाणे शरद राजगुरूंनी नोव्हेंबर १९५८मध्ये गोदावरी खोऱ्यातील पुरातत्त्व आणि पर्यावरणीय पुरातत्त्वावर संशोधनाला सुरुवात केली. त्यात त्यांना अनेक अडचणी आल्या. त्यांचे निवारण करता न आल्याने राजगुरूंनी पीएच.डी करण्याचा नाद सोडून दिला, आणि परत नोकरीचे कुठे जमते आहे का ते पहायला सुरुवात केली.

पुन्हा नोकरी[संपादन]

१९६०साली शरद राजगुरू यांचे लग्न झाले. त्यावेळी ते मुंबईत नोकरी करत होते. एके दिवशी अचानक डॉ. सांकलिया घरी आले आणि त्यांनी राजगुरू यांना पुण्यात डेक्कन कॉलेजात भूशास्त्र विषयाच्या प्राध्यापकाची नोकरी देऊ केली. त्या कॉलेजातून त्यावेळी श्री. मिश्रा व आणखी दोघा जणांची पीएच.डी पूर्ण होत आली होती, पण त्यांना डावलून, केवळ आर्थिक परिस्थितीमुळे पीएच.डी.. न करता आलेल्या राजगुरूंना नोकरी मिळाली. कारण सांकलियांना त्या जागी भूपुरातत्त्वज्ञच हवा होता. १२ जुलै १९६१ रोजी राजगुरूंनी एम.ए.च्या वर्गात विद्यार्थ्यांना पहिले भाषण दिले.

पुन्हा पीएच.डी.[संपादन]

पुरात्तत्त्व विभागात नोकरी सुरू झाल्यावर शरद राजगुरू यांनी मुळा-मुठा नदी प्रणालीच्या उत्तर चतुर्थक कालखंडातील भूपुरातत्त्वीय इतिहासावर संशोधन केले. या संशोधनात त्यांना पुण्यातील दत्तवाडीजवळ एक महत्त्वाचा स्तराभिलेख सापडला. त्या स्तराभिलेखात राजगुरूंना, चतुर्थक कालखंडातील पर्जन्यमानातील बदल आणि त्यामुळे मुठेच्या वागणुकीत पडलेला फरक यांचे अतिशय चांगले चित्रण दगड, गोटे, वाळू, रेव, माती अशा अवसादांच्या स्वरूपात पहायला मिळाले.

आणखी संशोधन[संपादन]

पीएच.डी पूर्ण झाल्यावर शरद राजगुरू यांनी भारतातील दक्षिण पठारी नद्या, सौराष्ट्र, उर्वरित गुजरात, राजस्थान, केरळ, तमिळनाडूचा किनारा, आसाम, मणिपूर, नर्मदेचे खोरे,गारो टेकड्या, कोकण, पश्चिम बंगाल, जम्मू-काश्मीर अशा भारतातील जवळजवळ सर्व प्रांतांमध्ये चतुर्थक कालखंडातील भूपुरातत्त्वीय घडामोडींवर क्षेत्रीय संशोधन आणि समान्वेषण केले. यांशिवाय महाराष्ट्रातील नेवासा, इनामगाव व वाळकी, राजस्थानातील डिडवाना व बालाथल, सौराष्ट्रातील कुंतासी व पाद्री, मध्य प्रदेशातील समनापूर आणि कर्नाटकातील हुसंगी येथील उत्खनांमध्ये पुरातत्त्वशास्त्रज्ञ म्हणून भूमिका बजावली. त्या काळात भारतात ते एकमेव भूपुरातत्त्वज्ञ होते, त्यामुळे डेक्कन कॉलेजाव्यतिरिक्त राजगुरू यांना भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग आणि बडोद्याच्या महाराजा सयाजीराव विद्यापीठातर्फे होणाऱ्या उत्खनांमध्ये सल्लागार म्हणून बोलावणी येत. आता राजगुरू सेवानिवृत्त झाले असले तरी अशा आमंत्रणांचा ते अजूनही स्वीकार करतात.

ऑस्ट्रेलियातील संशोधन[संपादन]

१९७४साली शरद राजगुरू यांना ऑस्ट्रेलियातल्या कॅनबेरा येथील ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटीच्या जैविक भूगोल आणि भूरचना विज्ञान विभागात एका वर्षासाठी व्हिजिटिंग फेलो म्हणून काम करण्याची संधी मिळाली. प्रोफेसर जेम्स बाऊलर यांच्या चमूबरोबर राजगुरू यांनी ऑस्ट्रेलियातील वाळवंटे आणि तेथे असलेली मंगो व फ्रॉमे तळी आणि त्यांच्या परिसरातील प्रदेशात काम केले. त्या उत्खननात त्यांनी ’मंगो मॅन’या ४०,००० वर्षापूर्वीच्या आणि त्या वेळी ऑस्ट्रेलियात सर्वात जुन्या समजल्या जाणाऱ्या मानवाचा शोध लावला.

जगाचा प्रवास[संपादन]

शरद राजगुरू यांना शैक्षणिक कारणांसाठी अकरा देशांचा प्रवास केला. इराण, जॉर्डन व बंगला देश येथील काही विद्यार्थ्यांनी त्यांच्या हाताखाली पीएच.डी. केली. चीन, जपान आणि इस्रायलमध्येही ते कामानिमित्त गेले.

शरद राजगुरू यांचा जीवनपट[संपादन]

  • जन्म : पुणे, २६ नोव्हेंबर १९३३.
  • शैक्षणिक पात्रता : एम.एस्‌सी. (भूशास्त्र, पुणे विद्यापीठ); पी.एच.डी (भूपुरातत्त्व, पुणे विद्यापीठ)
  • भूषविलेली पदे : प्राध्यापक आणि सहसंचालक (डेक्कन कॉलेज, पुणे).
  • संशोधनकार्य : राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकांमध्ये १५०हून अधिक शोधनिबंध प्रसिद्ध. (त्यांतले ४० निवृत्तीनंतर)
  • हाती घेऊन पूर्ण केलेले प्रकल्प : एकूण ७, त्यांतील ४ निवृत्तीनंतर.
  • मार्गदर्शन :२० विद्यार्थ्यांनी राजगुरूंच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. मिळविली.
  • महत्त्वाचे शोध :
    • यादवकालात पुण्याची पहिली वस्ती असल्याचा शोध. पुण्याचा इतिहास २००० वर्षे मागे नेला.
    • थरचे वाळवंट दोन लाख वर्षे जुने असल्याचा शोध.
    • ३००० वर्षापूर्वी राजस्थानात पडलेला दुष्काळ काही दशके चालू होता, हा शोध.
    • कुकडी नदीच्या पात्रात असलेल्या इंडोनेशियातून आलेल्या साडे सहा लाख वर्षापूर्वीच्या ज्वालामुखीच्या राखेचा शोध.
    • साडे सहा लाख वर्षांपूर्वीही भारतात मान्सून होता, हा शोध.
    • अरवली पर्वतातून निघून उत्तरेच्या दिशेने वहात जाणाऱ्या एका नदीचा शोध. भूकंपमुळे नदीचे पात्र वर उचलले गेले आणि तेथे एका टेकाड बनले.
    • पुरंदरच्या डोंगरावर एके काळी जांभा दगड असल्याचा शोध.
    • ऑस्ट्रेलियाच्या वाळवंटातील ४०,००० वर्षापूर्वीच्या मंगो लेडीचा शोध, वगैरे.

मानसन्मान[संपादन]

  • इंडियन सोसायटी फॉर प्री-हिस्टरी ॲन्ड क्वाटर्नरी स्टडीज या संस्थेचे अध्यक्षपद (१९८२)
  • डेहराडूनच्या वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन जिऑलॉजी या संस्थेच्या संशोधन सल्लागार समितीचे सदस्यत्व (१९८२ ते १९८८).
  • भारतातील पुरा हवामान संशोधन समितीचे सदस्यत्व (१९८८-८९)
  • ऑस्ट्रेलियातील कॅनबेरा युनिव्हर्सिटीची फेलोशिप (१९७४).
  • अलाहाबाद येथील नॅशनल ॲकॅडमी ऑफ सायन्सेसची फेलोशिप (१९९०)
  • पश्चिम बंगालच्या एशियाटिक सोसायटीकडून सुवर्णपदक (२००५)
  • इंटरनॅशनल युनियन फॉर क्वाटर्नरी रिसर्च (इन्क्वा-INQA) या संस्थेची जीवनभराची फेलोशिप (२०११)




वर्गːमराठी शास्त्रज्ञ