शमसुद्दिन अल्तमश
शमसुद्दिन अल्तमश हा दिल्ली सल्तनतीतील एक सुल्तान होता. याचा कार्यकाळ इ.स. १२११ ते इ.स. १२३६ असा पंचवीस वर्षांचा राहिला. इल्तुमिशचा जन्म मध्य आशियातील इल्बारी टोळीत झाला. दिल्लीच्या कुतुबुद्दीन ऐबकच्या मुलीशी इल्तुमिशने विवाह केल्याने कुतुबुद्दीनचा जावई म्हणून तो दिल्लीला आला. कुतुबुद्दीन ऐबकच्या मृत्यूनंतर तो दिल्लीच्या गादीवर बसला. खलिफाकडून मुसलमानी राज्यकर्ता म्हणून त्याने मान्यता मिळवली होती.
साम्राज्यविस्तार[संपादन]
महंमद घोरीने उत्तर भारतात लष्करी विजय मिळवून तुर्की साम्राज्याची सुरुवात करून दिली होती, त्याचे रूपांतर मोठ्या साम्राज्यात करण्याचे काम इल्तुमिशने केले. आपल्या पंचवीस वर्षांच्या कार्यकाळात सिंधपासून पश्चिम बंगालपर्यंत त्याने भारतात तुर्की साम्राज्याचा विस्तार केला. आपल्या कारकिर्दीत इल्तुमिशने दिल्लीत स्थिर तुर्की राजवट स्थापन केली. त्याच्या पश्चात त्याने त्याची मुलगी रझिया सुल्तान हीला आपला वारसदार म्हणून निवडले होते. या पश्चिमेला मुलतान पासून ते पूर्वेला बंगाल तसेच दक्षिणेला नर्मदा नदीपासून उत्तरेला हिंदुकुश पर्वतरांगा पर्यंत असा राज्य विस्तार अल्तमशचा होता. अल्तमशने रणथंबोर, मंदसौर, अजमेर, बयाना, ग्वाल्हेर, उज्जैन इत्यादी प्रदेशही आपल्या राज्यात सामील केला.