शबरीकुंभ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शरदपौर्णिमेला शबरी मातेचा जन्म झाला. या दिवशी दरवर्षी शबरीधाम येथे यात्रा भरते. वसंत पंचमीच्या (माघ शु. ५) या शुभ दिनी प्रभु राम चंद्राचे या ठिकाणी आगमन झाले होते.

इतिहास[संपादन]

पितृआज्ञा पाळण्यासाठी राम वनवासात गेले होते. वनवासानिमित्त दंडकारण्यातील पंचवटीत निवास असताना रावणाने सीतेचे अपहरण केले. सीतेच्या शोधात निघालेले श्री राम, लक्ष्मण एक दिवस शबरीच्या झोपडीत पोहचले. वर्षानुवर्ष रामाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शबरीच्या घरी जणू काही सोन्याचा दिवस उगवला. माताशबरीने प्रभु रामचंद्राच्या चरणावर प्रेमाश्रुने अभिषेक केला. प्रभुरामचंद्राच्या येण्याने व माता शबरीच्या भक्तीरसाने ही धरा धन्य झाली.

गोस्वामी तुलसिदासांनी रामचरितमानसाच्या अरण्यकांडामधे या प्रसंगाचे वर्णन करताना म्हटले आहे की…..

ताहि देई गति राम उदारा। शबरी के आश्रम पगु धारा। शबरी देखी राम गृह आए। मुनि के बचन समुझि जियँ भाए।।

उत्सव[संपादन]

या पवित्र स्थानी म्हणजे ‘शबरीधाम’ येथे निर्माण केलेल्या भव्य मंदिरात, शरदपौर्णिमा २००४ला, प्रभूराम, लक्ष्मण व माता शबरी यांच्या मूर्तिच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा संपन्न झाला. याच दिवसात राम-लक्ष्मण आगमन यात्रा गावोगाव फिरून अत्यंत उत्साहात शबरीधाम येथे पोहोचते. याचठिकाणी हजारो वर्षानंतर सन २००२साली वनवासी बंधूनी पू. मूरारी बापूनी सांगितलेल्या रामकथेचे अमृतपान केले. कथेच्या दरम्यान पू. मुरारीबापूनी शबरीकुंभाच्या योजनेविषयी सहज उद्गार काढले. पू. संताची वाणी ही आज्ञा समजून ते आवाहन सर्वानी स्वीकारले. स्थानिक वनवासीनी या कुंभाला भव्य रूप देण्याच्या दिव्य संकल्प केला.[ संदर्भ हवा ]

शबरीधाम परिसराचा परिचय[संपादन]

डांग अर्थात दंडकारण्य भारताच्या पश्चिमेला आणि गुजरात महाराष्ट्राच्या दक्षिण-उत्तर सीमेवर गुजरातचा डांग जिल्हा आहे. गुजरातच्या वलसाड, नवसारी, सुरत व महाराष्ट्राच्या नाशिक, नंदुरबार, धुळे इ. जिल्हयांचा मिळून जो डोंगराळप्रदेश आहे तो अत्यंत नयनरम्य व सदाहरित असतो. निसर्गाने या प्रदेशाला भरभरून दान दिले आहे. डांग व त्याच्या आजूबाजूच्या क्षेत्राला दंडकारण्य म्हणून ओळखले जाते. वाल्मीकी रामायणात अरण्यकांडामधे पंचवटीच्या नेऋत्येला दंडकारण्याचा उल्लेख आहे. डांगचे जिल्हा केंद्र आहवा येथे दंडकेश्वर महादेव जणू याचीच प्रचीती देत असतात. डांग ही एक धर्मभूमी आहे. डांग परिसरातीत विविध धार्मिक स्थानावर लाखो श्रद्धाळू भक्त विविध प्रसंगी एकत्र जमतात. डांग जिल्ह्याचा सांस्कृतिक व ऐतिहासिक परिचय रामायण काळापर्यंत जातो. जिल्ह्यामधील अनेक तीर्थस्थळे याची साक्षीदार आहेत. त्यातील काहींचा परिचय प्रवासात आणखीन आनंद वाढवू शकतो.

  • शबरीधाम

आहवा या मुख्यशहरापासून ३५ कि. मी. अंतरावर सुबीर गावाजवळ हे तीर्थस्थळ आहे. ‘चमक’डोंगर’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या या टेकडीवर प्रभुराम-लक्ष्मण व शबरी यांची भेट झाली होती. अशी इथली आख्यायिका आहे. ज्या दोन शीलांवर राम-लक्ष्मण बसले होते त्या शिला आजही पहावयास मिळतात. वर्षानुवर्षे स्थानिक वनवासी हिंदु समाज, या शीलांचे अत्यंत भक्तियुक्त अंतःकरणाने पूजन करतो. वाल्मिकी रामायणातील उल्लेखानुसार, प्रभुरामचंद्राच्या दर्शनानंतर शबरीमातेने योगाग्निने आपल्या जीवनाची सांगता केली. या योगाग्निच्या प्रकाशाने हा पर्वत व सारा परिसर उजळून निघाला. कदाचित यामुळेच याडोंगराला ‘चमक डोंगर’ या नावाने सर्व जण ओळखत असावेत असे वाटते. शबरीधाम हे एक पवित्र स्थान आहे. जिथे वर्षभर विविधधार्मिक कार्यक्रम सुरूच असतात. या कार्यक्रमाद्वारे सतत समाज जागृति होत असते. दरवर्षी शरदपौर्णिमेला इथे यात्रा भरते. कुंभपर्वाच्या निमित्तेशबरीधामचा विकास सुरू आहे.

  • पंपा सरोवर

शबरीधामपासून ६ कि. मी. दूर असणारे हे स्थान म्हणजेच श्री शबरीकुंभाचे स्थान होय.रामायणामधे पंपा सरोवर पुष्करिणी नदीच्या किनाऱ्यावर आहे. असा उल्लेख येतो. इथे पूर्णा नदीचा प्रवाह आहे. कदाचित हिलाच प्राचीन काळात ‘पुष्करिणी’ नावाने ओळखले जात असावे, असे वाटते. तसेच पंपा सरोवराच्या किनाऱ्यावर असंख्य सुगंधित पुष्प आहेत.रामायणामधेही करंज पुष्पांचे वर्णन आहे. पंपा सरोवराजवळील ‘करंजडा’ गावाचे नाव कदाचित या करंज पुष्पामुळेच पडले असावे. शबरीमातेचे गुरू मातंग ऋषिंचा आश्रमही जिथे होता असा ‘मातंग पर्वत’ पंपा सरोवराच्या जवळच आहे.

  • उनाई

संपूर्ण भारतामध्ये ‘घरवापसी’चा संदेश देणारे स्थान वनवासी समाजाच्या श्रद्धेचे केंद्र आहे.या स्थानावर गरम पाण्याचे कुंड व उनाई मातेचे भव्य मंदिर आहे. रामायणकाळामधे शरभंग ऋषिंना कुष्ठरोगातून मुक्त करण्यासाठी प्रभूरामांनी मंत्रशक्तीने बाण सोडून येथे गरम पाण्याचा प्रवाह सुरू केला होता. आजही शेकडो भाविक गरम पाण्याच्या कुंडामधे स्नान करून रोगमुक्त होतात. आहवापासून ५० कि. मी. दूर असलेले हे स्थान श्रद्धेची त्रिवेणी आहे.

  • अंजन कुंड

शबरीधामपासूव ५१ कि. मी. अंतरावर असलेल्या डोंगरात हे कुंड आहे. पवनपुत्र हनुमानाच्या आईच्या नावाने हे कुंड प्रसिद्ध आहे. अंजनीदेवीने या कुंडामधे स्नान केले होते. आणि हनुमानाचा जन्म याच पर्वत रांगामधे झाला होता. अशी एक लोकआख्यायिका आहे. रामायणातील सुग्रीवाच्या निवास स्थानाच्या वर्णनाशी जुळणाऱ्या गुफाही या पर्वतरांगेमधे विद्यमान आहेत. पायथ्याशी पवित्र कुंड आहे. या कुंडा शेजारीच बसून लक्ष्मणाने आपल्या बाणाला टोकदार बनवले होते. त्याच्या खुणाही इथे आहेत अशी श्रद्धा आहे. हनुमानजी सीतेच्या शोधार्थ निघाल्यावर त्यानी ज्या मार्गाने चारण जाता तोच मार्ग निवडला होता. आजही चारण समाज त्या परिसरात विखुरलेला आहे. त्यामुळे या मान्यतेला पुष्टी मिळते. अंजनकुंडा पर्यंत जाण्याचा रस्ता अजूनही कच्चा व दुर्गम आहे. परंतु एकदा तिथे पोहचले की अविस्मरणीय अनुभव येतो.

बाह्य दुवे[संपादन]