Jump to content

शंकरराव बाजीराव पाटील

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शंकरराव बाजीराव पाटील (१५ फेब्रुवारी, इ.स. १९२४ - १३ सप्टेंबर, इ.स. २००६) हे भारतीय राजकारणी होते. ते काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून बाराव्या आणि तेरावी लोकसभेत महाराष्ट्र राज्यातील बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले.

शंकरराव बाजीराव पाटील यांचा जन्म 15 फेब्रुवारी 1924 रोजी इंदापूर तालुक्यातील बावडा येथे महाशिवरात्रीच्या दिवशी झाला. त्यामुळे त्यांचे नाव ‘शंकर’ ठेवण्यात आले, आणि पुढे ते ‘भाऊ’ म्हणून परिचित झाले. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पुण्यातील नानावाड्यातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झाले. 1941 मध्ये मॅट्रिक उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयात बी.ए.ची पदवी मिळवली. त्यानंतर पुण्यातील आय.एल.एस. महाविद्यालयातून एलएल.बी. पदवी प्राप्त केली आणि स्पर्धा परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळवले.

परंतु, सामाजिक कार्याची जाणीव ठेवत त्यांनी राजपत्रित अधिकाऱ्याची नोकरी नाकारली आणि 1949 मध्ये इंदापूर येथे वकिली व्यवसाय सुरू केला. त्यांच्या सामाजिक कार्याच्या यशस्वी प्रवासादरम्यान, त्यांना इंदापूर मतदारसंघातून काँग्रेसकडून विधानसभा निवडणुकीची उमेदवारी मिळाली. 1952 ते 1978 या कालावधीत सलग 26 वर्षे त्यांनी इंदापूरचे आमदार म्हणून काम पाहिले. तसेच, 1980 च्या लोकसभा निवडणुकीत खासदार म्हणून निवडून आले.

त्यांच्या नेतृत्वाखाली सहकारी साखर कारखान्यांमध्ये कामगार आणि व्यवस्थापन यांच्यात सुसंवाद प्रस्थापित करून कामगारांना न्याय मिळवून देण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. माथाडी कामगारांसाठी आदर्श सेवा नियमावली तयार करून आर्थिक न्याय मिळवून दिला, तसेच भारतात माथाडी कामगारांसाठी पहिला कायदा त्यांच्या कार्यकाळात लागू झाला. शेतकऱ्यांसाठी खात्रीशीर खातीपुस्तिका तयार करण्याचे श्रेयही त्यांना जाते.

शैक्षणिक क्षेत्रातही त्यांनी मोठे योगदान दिले. 1971 मध्ये इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून इंदापूर महाविद्यालयाची स्थापना करून संस्थापक व अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली. 1978 च्या संपकाळात त्यांनी यशस्वी मध्यस्थी करत कर्मचाऱ्यांसाठी चौथा वेतन आयोग लागू करण्यास मदत केली. 1984 मध्ये इंदापूर सहकारी साखर कारखान्याची स्थापना करून हजारो कुटुंबांना रोजगार उपलब्ध करून दिला.

याशिवाय, त्यांनी दूध उत्पादक संघ, इंदापूर येथील आय.टी.आय., पिंपरी-चिंचवड येथील अभियांत्रिकी महाविद्यालय, शिवाजी शिक्षण संस्था अशा अनेक संस्थांची स्थापना करून विविध क्षेत्रांत भर घातली.