"मराठी नावे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छोNo edit summary |
No edit summary |
||
ओळ ६०: | ओळ ६०: | ||
कोणत्याही नोंदवहीत किंवा अशाच कागदपत्रांत मराठीभाषकांचे नाव लिहिण्याची एकच पद्धत आहे. ती म्हणजे नाव लिहिताना ते आडनांव, स्वतःचे नाव आणि वडिलांचे(किंवा पतीचे) नाव या क्रमानेच लिहिणे. अपवादात्मक परिस्थितीत वडिलांच्या नावाच्या जागी आईचे नाव असू शकते. |
कोणत्याही नोंदवहीत किंवा अशाच कागदपत्रांत मराठीभाषकांचे नाव लिहिण्याची एकच पद्धत आहे. ती म्हणजे नाव लिहिताना ते आडनांव, स्वतःचे नाव आणि वडिलांचे(किंवा पतीचे) नाव या क्रमानेच लिहिणे. अपवादात्मक परिस्थितीत वडिलांच्या नावाच्या जागी आईचे नाव असू शकते. |
||
==नाव लिहिण्याच्या काही खास मराठी पद्धती== |
|||
* गावाचे नाव आणि मग व्यक्तिनाव : उदा० गारंबीचा बापू |
|||
* व्यक्तिनाव आणि नाते : उदा० कृष्णाबाईचा बाप |
|||
* नदीचे नाव आणि व्यक्तिनाव : उदा० पवनाकाठचा धोंडी |
|||
* जातीचे नाव आणि नंतर व्यक्तिनाव :उदा० मुलाण्याचा बकस |
|||
* व्यक्तिनाव आणि नंतर जातीचे नाव : उदा० गोरा कुंभार, नरहरी सोनार इत्यादी. |
|||
* मालकाचे नाव आणि नंतर दासीचे नाव : उदा० नामयाची जनी |
|||
* व्यक्तिनाव आणि मग मालकाचे नाव : उदा० जनी नामयाची |
|||
* वडिलांचे नाव आणि नंतर व्यक्तिनाव : उदा० शाहसूनो: शिव(स्य मुद्रा भद्राय राजते) |
|||
==पहा== |
==पहा== |
००:१४, ७ सप्टेंबर २०१२ ची आवृत्ती
मराठी लोकांच्या संपूर्ण नावाची रचना सामान्यत: व्यक्तिनाम, वडलांचे किंवा पतीचे नाव आणि आडनाव अशी असते, असे असले तरी अनेक मराठीजन आपली नावे वेगळ्या पद्धतीने लिहितात. पाळण्यातले नाव, व्यवहारातले नाव, व्यवसायासाठी घेतलेले नाव, टोपण नाव, सूचीमध्ये दाखल करण्यासाठीचे नाव असे नावाचे अनेक प्रकार आहेत.
- महाराष्ट्रीय किंवा मराठीभाषक असणाऱ्या व्यक्तीच्या नावांचे प्रकार आणि नाव लिहिण्याच्या पद्धती
जन्मनाव
मूल जन्माला येते तेव्हा त्याला किंवा तिला देण्यात येणारे तात्पुरते नाव म्हणजे जन्म नाव. ज्या प्रसूतिगृहात आईची प्रसूती होते होते तिथे हे नाव त्यांच्या नोंदणी वहीत नोंदण्यासाठीच्या उपयोगाचे असते.
अनेकदा हे नाव बालकाच्या जन्माच्या वेळी असलेल्या सूर्य, चंद्र, ग्रह, आणि नक्षत्रांच्या अंतराळातील स्थितीवर आधारलेल्या कुंडलीच्या अभ्यासातून मिळालेल्या अद्याक्षरापासून सुरू होणारे असते. मुलाच्या बारशाच्या वेळी हेच नाव मुक्रर करण्याचीही पद्धत अनेक समाजांत असते. त्यामुळे सारख्याच अक्षराने सुरू होणाऱ्या नावाच्या व्यक्तींची रास एकच असते, असे महाराष्ट्रात आणि विशेषत: महाराष्ट्राबाहेर आढळून येते.
पाळण्यातले नाव
हिंदू समाजात बालकाच्या जन्मानंतरच्या बाराव्या दिवशी मुलाचे नामकरण किंवा बारसे करण्याची पद्धत आहे. त्या दिवशी शक्य नसले तर हे बारसे नंतरही केले जाते. त्यादिवशी ठेवल्या जाणाऱ्या नावाला ‘पाळण्यातले नाव’ असे म्हणतात. कधीकधी एकाऐवजी ‘हे’ ऊर्फ ‘ते’ असे जोडनावही ठेवले जाते. कारवार-मंगलोरकडे अशा वेळी पाच नावे ठेवण्याची पद्धत आहे.
व्यवहारातले नाव
पाळण्यातले नाव हेच बहुधा व्यवहारातले नाव असते, आणि त्याच नावाने मुलाला शाळेत दाखल करतात. पण क्वचित प्रसंगी मुलाचे शाळेतले नाव पाळण्यातल्या नावापेक्षा भिन्न असते. पाळण्यातले नाव किंवा व्यवहारातले नाव काहीही असले तरी मुलाला हाक मारायचे नाव तिसरेच असू शकते. महादेव गोविंद रानडे यांचे घरात वापरायचे नाव माधव होते. याशिवाय हाका मारण्याच्या सोयीसाठी मूळ नावांत किंचित बदल करून बनलेल्या नावाने मूल ओळखले जाते. उदा० विजयचे विजू, अलकनंदाचे अलका, बळवंतचे बाळ वगैरे. मुलाच्या कुटुंबातील स्थानानुसार त्याला अण्णा, भाऊ, ताई, अक्का असे एखादे टोपण नावही मिळते. तुकाराम भाऊ साठे यांना घरात अण्णा म्हणत आणि पुढे ते अण्णा भाऊ साठे म्हणून प्रसिद्धीस आले.
मुंजीतले नाव
ज्या समाजांत मौंजीबंधनाचा विधी होतो त्यांतल्या मुलग्यांना मुंजीच्या वेळी गुरुजी एक नाव देतात. हे नाव पुढील आयुष्यात एखाद्या धार्मिक गुरूकडून दीक्षा घेण्याचा प्रसंग आला तरच त्या वेळी फक्त कामाला येते.
विवाहित स्त्रीचे नाव
लग्न झाल्यानंतर मुलीचे आडनाव बदलते आणि वडिलांच्या नावाऐवजी पतीचे नाव येते. त्याशिवाय अनेकदा, लग्नसमारंभादरम्यान मुलीचे व्यक्तिनामही बदलून दुसरे ठेवले जाते. असे झाले तर स्त्रीच्या नावामधील प्रत्येक घटकात बदल होऊन तिला संपूर्णपणे वेगळेच नाव मिळते. या नव्या नावात तिच्या लग्नापूर्वीच्या नावातला कोणताही अंश शिल्लक नसतो.
नाव लिहिण्याच्या विविध पद्धती
नुसतेच व्यक्तिनाव
नाट्यचित्रपट सृष्टीतले कलावंत अनेकदा फक्त व्यक्तिनावाचेच ओळखले जातात. अभिनेत्री गौरी, सीमा, सुलोचना ही त्यांतली काही उदाहरणे. अभिनेते धुमाळ हे फक्त आडनावाचे ओळखले जात. यशवंत यांच्यासारखे काही कवीही फक्त व्यक्तिनावाने प्रसिद्ध आहेत. कवी कालिदास, गणिती भास्कराचार्य, मास्टर विनायक ही आणखी काही उदाहरणे. काही वर्षांपूर्वी ईव्ह्ज वीकली या स्त्रियांच्या नियतकालिकांनी स्त्रियांना त्यांचे व्यक्तिमत्त्व असावे, त्यासाठी त्यांनी आपल्या नावानंतर वडिलांचे नाव, पतीचे नाव वा आडनाव लिहू नये असा खूप प्रचार केला होता. त्याला त्याकाळी काही बायका बळी पडल्या होत्या. पण त्या पद्धतीतला फोलपणा दिसून आल्यामुळेच बहुधा ती पद्धत निदान महाराष्ट्रात तरी चालली नाही. दक्षिणी भारतीयांना आडनाव नसते, त्यामुळे नावांवरून त्यांची जात ओळखता येत नाही, म्हणून ती आदर्श पद्धत आहे, असे काहीजण समजतात. आडनावावरून जात किंवा गाव समजू नये म्हणून काहीजण आपले जुन्या काळापासून चालत आलेले आडनाव बदलतात.
टोपण नाव
साहित्य लेखनासाठी अनेकजण एक वेगळेच नाव घेतात, त्याला टोपणनाव म्हणतात. टोपणनावानुसार मराठी कवी येथे कवींची एक यादी वाचता येईल.
नाव आणि पित्याचे नाव
इतिहासकाळात ही पद्धत अतिशय लोकप्रिय होती. खंडो चिमणाजी, चिंतो विठ्ठल, चिंतो विश्वनाथ, दादोजी कोंडदेव, खंडो बल्लाळ ही काही उदाहरणे.
नाव आणि आडनाव
हीही एक इतिहासकालीन पद्धत असून ती मराठी समाजात अजूनही प्रचलित आहे. तानाजी मालुसरे, बाजी पासलकर, बाजीप्रभू देशपांडे, राजा गोसावी, राजा परांजपे, माधव वझे, शांता शेळके, हरी नरके, लता मंगेशकर, दुर्गा भागवत वगैरे अनेक जणांचे नाव या पद्धतीचे आहे.
दुहेरी आडनावे
काही विवाहित स्त्रियांच्या नाव आणि आडनाव अशा पद्धतीने लिहिलेल्या नावांत आधी माहेरचे आडनाव आणि नंतर सासरचे आडनाव लिहिलेले आढळते. उदा० लीला मस्तकार रेळे, अलका कुबल आठल्ये, भक्ती बर्वे इनामदार, सई परांजपे जोगळेकर वगैरे. कधी काळी व्यवसायाने पाटील वा कुलकर्णी असणाऱ्या व्यक्ती आपल्या नावात दोन आडनावांचा समावेश करतात. विखे पाटील, बुट्टे पाटील, रेडे कुलकर्णी आदी. महाराष्ट्रातील काही कुटुंबांची आडनावे मुळातच दुहेरी आडनावे असतात. पाठकपुजारी, प्रभुदेसाई, ठाकुरदेसाई, प्रभुचिमुलकर, नाईकनवरे, कदमबांडे, पंतवैद्य, रावराणे, रावकवी, मानेशिर्के, राजेशिर्के, मानेशिंदे, पैधुंगट ही तसली काही उदाहरणे. सेनगुप्ता, दासगुप्ता, रायचौधरी, रायभौमिक ही बंगाली जोडआडनावे प्रसिद्ध आहेत.
बदललेली आडनावे
दक्षिणी भारतीयांना आडनाव नसते, त्यामुळे नावांवरून त्यांची जात ओळखता येत नाही, म्हणून ती आदर्श पद्धत आहे, असे काहीजण समजतात. आडनावावरून जात किंवा गाव समजू नये म्हणून, किंवा अन्य कारणाने काही मराठी माणसे आपले जुन्या काळापासून चालत आलेले आडनाव बदलतात. पण असे असले तरी त्यांची नाव लिहिण्याची एकूण पद्धत बदलत नाही. अशी काही आडनावे म्हणजे आंबेडकर, साठे वगैरे.
नावांची आद्याक्षरे आणि आडनाव
ही पुरुषांचे नाव कागदोपत्री लिहिण्याची रूढ पद्धत आहे. प्र.के अत्रे, ग,त्र्यं. माडखोलकर, वगैरे. यांत एक उपप्रकार म्हणजे स्वतःचे नाव आणि आणि आडनाव पूर्ण लिहून मधल्या वडिलांच्या किंवा पतीच्या नावाचे आद्याक्षर लिहिणे. राम कृ, जोशी, बाळ ज.पंडित, दिनकर द. पाटील वगैरे नावे या प्रकारातली. पुरुषोत्तम शिवराम रेगे आपले नाव एक तर पु.शि. रेगे असे लिहीत किंवा पुरु.शिव.रेगे असे. आणखी तिसरा उपप्रकार म्हणजे स्वतःच्या नावाचे आद्याक्षर लिहून, वडिलांचे नाव आणि आडनाव पूर्ण लिहिणे. उदा० के. नारायण काळे. काहीजण स्वतःच्या नावातली एकदोन अक्षरे लिहून नंतर आडनाव लिहितात. दत्ता वाळवेकर, विजू खोटे ही काही उदाहरणे. आडनावाचे इंग्रजी आद्याक्षर लिहून आधी किंवा नंतर स्वतःचे नाव लिहिणारी मराठी माणसे अनेक आहेत.उदा० व्ही.शांताराम, पी.बाळू(क्रिकेटखेळाडू), सी. रामचंद्र, जयश्री टी., मीना टी. वगैरे. स्वतःचे घरगुती नाव लिहून नंतर आडनाव लिहिणारे अण्णा हजारे, नाना फडणीस, बापू गोखले, तात्या टोपे दादा धर्माधिकारी हे, तर मध्ये वडिलांचे नाव लिहिणारे अण्णा भाऊ साठे. ह्याही मराठीभाषकांच्या नाव लिहिण्याच्या तऱ्हा आहेत.
नाव, वडिलांचे नाव आणि आडनाव
नाव वडिलांचे(किंवा पतीचे) नाव आणि आडनाव अशा पद्धतीने नाव लिहिणारे अनेक जण आहेत. कोणत्याही पोलिसी किंवा कायद्याच्या व्यवहारात असे नाव लिहिणेच आवश्यक असते. अच्युत बळवंत कोल्हटकर, दत्तो वामन पोतदार ही तसली उदाहरणे. वडिलांच्या नावाऐवजी आईचे नाव लिहिले तरी चालते. उदा० किशोर शांताबाई काळे, संजय लीला भन्साळी, वगैरे.
नावांच्या सूचीसाठी नाव लिहिण्याची पद्धत
कोणत्याही नोंदवहीत किंवा अशाच कागदपत्रांत मराठीभाषकांचे नाव लिहिण्याची एकच पद्धत आहे. ती म्हणजे नाव लिहिताना ते आडनांव, स्वतःचे नाव आणि वडिलांचे(किंवा पतीचे) नाव या क्रमानेच लिहिणे. अपवादात्मक परिस्थितीत वडिलांच्या नावाच्या जागी आईचे नाव असू शकते.
नाव लिहिण्याच्या काही खास मराठी पद्धती
- गावाचे नाव आणि मग व्यक्तिनाव : उदा० गारंबीचा बापू
- व्यक्तिनाव आणि नाते : उदा० कृष्णाबाईचा बाप
- नदीचे नाव आणि व्यक्तिनाव : उदा० पवनाकाठचा धोंडी
- जातीचे नाव आणि नंतर व्यक्तिनाव :उदा० मुलाण्याचा बकस
- व्यक्तिनाव आणि नंतर जातीचे नाव : उदा० गोरा कुंभार, नरहरी सोनार इत्यादी.
- मालकाचे नाव आणि नंतर दासीचे नाव : उदा० नामयाची जनी
- व्यक्तिनाव आणि मग मालकाचे नाव : उदा० जनी नामयाची
- वडिलांचे नाव आणि नंतर व्यक्तिनाव : उदा० शाहसूनो: शिव(स्य मुद्रा भद्राय राजते)