विद्रोही साहित्य संमेलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विद्रोही मराठी साहित्य संमेलने भरवणाऱ्या किमान दोन वेगळ्यावेगळ्या संस्था आहेत. त्यामुळे कोणते विद्रोही साहित्य संमेलन नेमके कोणत्या संस्थेचे हे समजणे जरासे अवघड आहे. त्यामुळे संमेलनांच्या खाली दिलेल्या अनुक्रमांकांत घोटाळा झाला असल्याची शक्यता आहे. विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे नेते प्रा. डॉ. बाबुराव गुरव यांनी चौफेर समाचारच्या २०१२ सालच्या दिवाळी अंकात लिहिल्याप्रमाणे, नोव्हेंबर २०१२पर्यंत विद्रोही सांस्कृतिक चळवळीची लहानमोठी पंचवीस साहित्य सांस्कृतिक संमेलने पार पडली आहेत.

तथाकथित धर्मांध-फॅसिस्ट शक्तींचा हल्ला आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी यांचा निषेध करणे हा सर्व विद्रोही साहित्य संमेलनांचा एक ठरावीक मेनू असतो. :

या संमेलन भरवणाऱ्या संस्थांपैकी एका संस्थेचे नाव नक्की ’विद्रोही सांस्कृतिक चळवळ’ हे आहे. या संस्थेचे अध्यक्ष २००२ साली डॉ. अजीज नदाफ होते, आणि २०१३सालचे अध्यक्ष प्रा. रणजित परदेशी आहेत. महाराष्ट्र साहित्य-सांस्कृतिक परिषद या नावाची संस्थाही हे संमेलन भरवते.

विद्रोही साहित्य संमेलनांचे प्रयोजन[संपादन]

प्रस्थापित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे भटा-ब्राह्मणांचे, प्रतिगाम्यांचे, प्रस्थापितांचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या उदात्तीकरण करणारे व शोषित, दुबळ्या, वंचित वर्गांना बेदखल करणारे आहे, अशी घणाघाती टीका करून दीड दशकापूर्वी कथित मराठी सारस्वतांची साहित्य क्षेत्रातील तथाकथित दादागिरी, चमकोगिरी व बडेजावपणा मोडीत काढून उपेक्षितांच्या परिवर्तनवादी साहित्याचा जागर मांडण्यासाठी काही पुरोगामी विचारवंत, कार्यकर्ते व साहित्यिकांनी विद्रोही सांस्कृतिक चळवळ स्थापन केली व त्या माध्यमातून स्वतंत्र विद्रोही सांस्कृतिक साहित्य संमेलन महाराष्ट्रातील विविध ठिकाणी दरवर्षी भरविण्याचा प्रघात पडला.

राजीव काळे यांचा लोकसत्तेतील १४ जानेवारी २०१७ च्या अंकातील लेख[संपादन]

पुढे काय?[permanent dead link] [१]

हा लेख चर्चापानावर वाचता येईल.

ज्ञात विद्रोही साहित्य संमेलने[संपादन]

ही संमेलने अनेक संस्था भरवीत असल्याने एकाच क्रमांकाची एकाहून अधिक संमेलने आहेत.

  • १ले विद्रोही साहित्य संमेलन  : धारावी (मुंबई), ७ फेब्रुवारी १९९९, संमेलनाध्यक्ष : बाबुराव बागूल. उद्‌घाटनाचे भाषण डॉ. आ.ह. साळुंखे यांनी केले होते.
  • ?वे विद्रोही साहित्य संमेलन, औरंगाबादला २०-२१ जानेवारी २००१ या कालावधीत झाले. डॉ. यशवंत मनोहर त्या संमेलनाचे अध्यक्ष होते.
  • ४थे(?) विद्रोही साहित्य संमेलन  : अमरावती, १९-२० जानेवारी २००२, संमेलनाध्यक्ष डॉ. अजीज नदाफ
  • ५वे(?) विद्रोही साहित्य संमेलन  : सावंतवाडी(सिंधुदुर्ग जिल्हा), २००३, संमेलनाध्यक्ष  : राजन खान
  • ५वे(?) विद्रोही साहित्य संमेलन  : नंदुरबार, २००३, संमेलनाध्यक्ष : आत्माराम राठोड
  • ७वे विद्रोही साहित्य संमेलन : २००५, संमेलनाध्यक्ष : तुळसी परब
  • ९ वे विद्रोही साहित्य संमेलन  : इंद्रापूर(पुणे जिल्हा?), इ.स. २००७
  • १०वे(?) विद्रोही साहित्य संमेलन : कणकवली(सिंधुदुर्ग जिल्हा),३१ जानेवारी - १ फेब्रुवारी २००९, संमेलनाध्यक्ष  : संजय पवार
  • १०वे(?) विद्रोही साहित्य संमेलन : सांगली, ७ ते १० मे २०१०, संमेलनाध्यक्ष  : राजाभाऊ शिरगुप्पे
  • ?वे विद्रोही साहित्य संमेलन : आटपाडी (सांगली जिल्हा), नोव्हेंबर २०१०
  • ११वे(?) विद्रोही साहित्य संमेलन : सांगली, २००९, संमेलनाध्यक्ष  : नागनाथअण्णा नायकवडी
  • ११वे (?) : बीडमध्ये २२ व २३ डिसेंबर २०१२
  • ११वे(?) विद्रोही साहित्य संमेलन : राहुरी (अहमदनगर जिल्हा), १९-२० जानेवारी २०१३, संमेलनाध्यक्ष  : प्रा. डॉ. बाबुराव गुरव
  • ११वे(?) विद्रोही साहित्य संमेलन : धुळे, १२-१४ जानेवारी २०१३, संमेलनाध्यक्ष : ऊर्मिला पवार , स्वागताध्यक्ष  : ॲड. निर्मलकुमार सूर्यवंशी
  • १२वे विद्रोही साहित्य संमेलन : परभणी, ८-९ फेब्रुवारी २०१४, संमेलनाध्यक्ष : डॉ. श्रीराम गुंदेकर, उद्‌घाटक : डॉ. फरिदा शेख.[१]
  • १२वे : बीड येथे १३-१४ डिसेंबर २०१४ या कालावधीत झालेल्या १२व्या विद्रोही संमेलनाच्या/विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाच्या अध्यक्षपदी रूपा कुळकर्णी-बोधी होत्या. संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी सत्यशोधक ओबीसी संघटनेच अध्यक्ष अ‍ॅड. हनुमंत उपरे तसेच संयोजन समितीच्या अध्यक्षपदी कॉ. नामदेव चव्हाण हे होते
  • १३वे विद्रोही साहित्य संमेलन बुलढाणा येथे १७-१८ जानेवारी २०१५ला झाले. संमेलनाध्यक्ष जयंत पवार होते. हे संमेलन महाराष्ट्र साहित्य-सांस्कृतिक परिषदेने भरवले होते.
  • १३वे : सांस्कृतिक चळवळीच्या वतीने लातूर येथे ६ व ७ डिसेंबर २०१४ या काळात १३ वे विद्रोही सांस्कृतिक साहित्य संमेलन पार पडले, तर नंतर लगेच बीड येथे १२ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन १३ व १४ डिसेंबर रोजी पार पडले. लातूरच्या संमेलनाचे उद्घाटन प्रा. राम पुनियानी यांनी केले. अध्यक्षस्थानी लखनौ विद्यापीठाचे प्रा. डॉ. कालीचरण स्नेही होते.
  • ?वे मुंबई विभागीय विद्रोही साहित्य संमेलन घाटकोपर-मुंबई येथे २२ फेब्रुवारी २०१५ला. अध्यक्ष प्रतिमा जोशी.
  • १४वे विद्रोही साहित्य संमेलन पुणे शहरात २१-२२ मे २०१६ला झाले. प्रा. राम पुनियानी अध्यक्षस्थानी होते.
  • १ले : २८ नोव्हेंबर २०१७ रोजी महात्मा फुले स्मृतिदिनानिमित्त पुण्यात एका दिवसाचे राज्यस्तरीय (पहिले) युवा विद्रोही साहित्य-संस्कृती संमेलन भरले होते. मंचरचे साहित्यिक संतोष पाकर पवार संमेलनाध्यक्ष होते.
  • १५वे : विद्रोही सांस्कृतिक चळवळीतर्फे १५वे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन २३ व २४ डिसेंबर २०१७ या काळात नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे झाले. या संमेलनाच्या अध्यक्षपदी दलित आदिवासी, ग्रामीण साहित्यिक व कष्टकरी आदिवासी समाजाच्या नेत्या काॅम्रेड नजूबाई गावित होत्या.
  • १५वे : १४ व १५ मार्च २०२० या कालावधीत जालना येथे होत आहे.
  • १६वे संमेलन मार्च २०२१मध्ये नाशिक येथे होणार होते, पण अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे मुख्य संमेलन पुढे ढकलल्यामुळे हे विद्रोही संमेलनही रद्द झाले आहे.

हे ही पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "परभणीत ८ फेब्रुवारीला विद्रोही मराठी साहित्यसंमेलन".