लगे रहो मुन्ना भाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(लगे रहो मुन्नाभाई या पानावरून पुनर्निर्देशित)
लगे रहो मुन्नाभाई
दिग्दर्शन राजकुमार हिरानी
निर्मिती विधू विनोद चोप्रा
कथा राजकुमार हिरानी
विधू विनोद चोप्रा
प्रमुख कलाकार संजय दत्त
अर्शद वारसी
बोमन इराणी
विद्या बालन
दिया मिर्झा
दिलीप प्रभावळकर
संवाद राज वसंत
संकलन बंटी नेगी
संगीत शंतनू मोइत्रा
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित १ सप्टेंबर २००६
अवधी १३० मिनिटे



लगे रहो मुन्नाभाई हा संजय दत्त यांची प्रमुख भूमिका असलेला चित्रपट आहे. हा चित्रपट २००६ मध्ये प्रदर्शित झाला व अतिशय वेगळ्या वाटेवरचा चित्रपट म्हणून चांगलाच गाजला. महात्मा गांधींच्या तत्त्वांचे पुनर्जीवन करण्यात व एकूणच आजच्या पीढीत गांधीजींबाबत आत्मीयता व त्यांच्या विचारांवर विचार करण्यास या चित्रपटाने हातभार लावला. हा चित्रपट मुन्नाभाई चित्रपट शृंखलेतील दुसरा चित्रपट आहे. पहिला चित्रपट मुन्ना भाई एम.बी.बी.एस. होता ज्यात या चित्रपटातील मुन्नाभाई व सर्किट ही पात्रे आहेत परंतु कथानकाचा पहिल्या भागाशी काहीही संबंध नाही.

कथानक[संपादन]

या चित्रपटात मूळात व्यवसायाने गुंड असलेला मुन्नाभाई एका मुलीच्या प्रेमात पडतो व तिला इंप्रेस करण्यासाठी तो गांधीजींचे अनुयायी असल्याचे भासवतो. आपले मूळ स्वरूप समजू नये या साठी तो गांधींजीच्या चरित्राचे अध्ययन करतो. त्यामध्ये गढून गेल्यानंतर त्याला सातत्याने गांधीजी जवळ असल्याचे भास होतात व गरज पडेल तेव्हा त्यांच्याकडून तो अहिंसेचे सल्ला घेत असतो. हळूहळू त्याच्या या सल्यांचे सर्वत्र कौतुक होते व मुळात गुंड असलेला मुन्नाभाई मध्ये परिवर्तन घडून येते.

कथेचा नायक मुरलीप्रसाद शर्मा उर्फ मुन्नाभाई हा व्यावसायिक गुंड असतो. जागा खाली न करणाऱ्यांना धमकावून ती खाली करून घेणे हा त्याचा मुख्य धंदा. याकामी सर्किट नावाचा मित्र मदत करत असतो. मुन्नाभाईला रेडिओ वरील एका कार्यक्रमातील जानव्ही या मुलीचा आवाज खूप आवडत असतो व मनोमन तिच्यावर प्रेम करत असतो. एकेदिवशी रेडिओवरील ही मुलगी गांधी जयंती प्रश्णमंजुषा आयोजित करते व जो कोणी सर्व प्रश्नांची उत्तरे देईल त्याला तिच्याबरोबर रेडिओवर गप्पा मारायची संधी मिळेल असे जाहीर करते. त्याप्रमाणे मुन्नाभाई तयारी करतो व गांधीजीवर जाणणाऱ्या सर्व प्राध्यापक लोकांना धमाकावून घरी आणतो व रेडिओवरील प्रश्णमंजूषा सहजपणे जिंकतो. जानव्हीला पाहाताच मुन्नाभाईला ती अजून आवडते. जानव्हीला ही मुन्नाभाईचा विनोदी स्वाभाव आवडतो व मुन्नाभाईची सध्याच्या पीढीत न आढळणारी गांधीजींबद्दल आस्था पाहून कौतुक करते व मुन्नाभाईला आपल्या ती काम करत असलेल्या वृद्धाश्रमात गांधीजीवर भाषण देण्यास आमंत्रित करते. तिच्या प्रेमात घायळ झालेला मुन्नाभाई दोन् तीन दिवस सलग एका ग्रंथालयात बसून गांधींजींची सर्व पुस्तके वाचून काढतो. ती पुस्तके वाचून झाल्यानंतर त्याला गांधीजी समोर दिसतात, सुरुवातील मुन्नाभाई घाबरतो परंतु गांधीजी त्याला चांगल्या कारणांसाठी नक्कीच मदत करतील व फक्त मुन्नाभाईलाच दिसतील असे आश्वासन देतात. मुन्नाभाईला हवेत गप्पा मारताना सर्किट त्याला पाहून चक्रावतो परंतु मुन्नाभाईच्या दराऱ्याने तो मुन्नाभाईच्या हो मध्ये हो मिळवत साथ देतो.

ठरल्याप्रमाणे मुन्नाभाई जानव्हीच्या वृद्धाश्रमात पोहोचतो व गांधीजी ठरल्याप्रमाणे अदृश्य स्वरूपात मागून त्याला भाषणात साथ देतात आपल्या गांधीजीबाबतच्या विचारांने सर्वानाच भारावून टाकतो.मुन्नाभाई हळू हळू सर्वत्र गांधीगीरीच्या सल्यांसाठी प्रसिद्ध होऊ लागतो. याकामी जानव्ही त्याला रेडिओवर त्याचे कार्यक्रम घेउन मदत करते. काहीजण त्याला कार्यक्रमामध्ये प्रश्न विचारतात, मागे अदृश्य स्वरूपातील गांधीजी सातत्याने त्याला मदत करत असतात अश्याप्रकारे मुन्नाभाई गांधीगिरीसाठी प्रसिद्ध होतो.

जानव्हीच्या वृद्धाश्रमाची जागा एका बिल्डरकडे गहाण असते. हा बिल्डर मुन्नाभाईलाच जागा खाली करण्यासाठी काम देत असतो. परंतु मुन्नाभाई गांधीगीरीमध्ये अडकल्याने मुन्नाभाईच्या अनुपस्थितीमध्ये सर्किट वृद्धाश्रमाची जागा बळाचा वापर करून सर्व वृद्धांना बाहेर काढतो. मुन्नाभाईला हे कळते व दुःख होते आपण जिच्या प्रेमासाठी मरतो आहोत तिचेच घर आपल्या व्यवसायाने उजाडल्याचे दुःख होते. परंतु तिची जागा बिल्डरकडून घेण्यासाठीही तो बिल्डर विरुद्ध गांधीगीरीचाच वापर करतो. एके दिवशी गांधीगिरी नुसारच तो जानव्हीला आपले खरे स्वरूप काय आहे ते सांगतो व तिचे घर आपल्या माणसांकडूनच खाली झाल्याचे सांगतो. त्यामुळे जान्हवी दूर जाते व मुन्नाभाईला काही काळ स्वत बद्दल घृणा होते. परंतु तो आपले गांधीगिरीचे काम चालू ठेवतो. व बिल्डरला गांधीगिरीद्वारे सातत्याने छळायचे काम करतो. परंतु बिल्डर ही अतिशय हट्टी असतो व अजिबात नमत नाही.

एका पत्रकार परिषदेत, बिल्डर मुद्दाम मुन्नाभाईच्या डॉक्टरला बोलवतो. डॉक्टर मुन्नाभाईचे गांधीप्रेम नसून त्याला होणारे भास आहेत हे तो सिद्ध करतो. त्यामुळे मुन्नाभाईची प्रसिद्दी लोप पावते व त्याचे बिल्डरकडून जमीन परत घेण्याचे मनसुबेही धुळीस मिळतात. मुन्नाभाई निराश होतो व गांधीगीरी सोडून पुन्हा पहिल्या मार्गाला लागतो. चित्रपटाच्या शेवटला तो पुन्हा एकदा जान्हवीचे मन जिंकण्याचा प्रयत्न करतो. जान्हवीला त्याच्या प्रेमाला प्रतिसाद देते. त्याच वेळेस बिल्डरचेही मन परिवर्तन होते. व सर्व काही सुरळीत होउन जाते.

बाह्य दुवे[संपादन]