रामदास स्वामींनी रचलेल्या आरत्या

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

समर्थांच्या आरत्या :

नीती आणि भक्तीचा सहज सोपा मार्ग मनाचे श्लोक आणि दासबोधाद्वारे सामान्य जनतेला योग्य दिशा दाखवणाऱ्या समर्थ रामदासांनी श्रीगणेश, श्रीराम, हनुमान या देवतांवर ६१ आरत्या रचल्या आहेत. त्यांच्या या आरत्यांत परिपूर्ण भक्तिरस तर आहेच, पण शांतरस, वीररस आणि करुणरसही आहे. आज दिनांक २६ फेब्रुवारी २०१२रोजी दासनवमी आहे. त्यानिमित्त त्यांनी रचलेल्या आरत्यांचा मागोवा...

रामदासस्वामींची वाङ्‌मय संपदा अफाट आहे. मानवी जीवन सर्वांगाने समृद्ध व्हावे म्हणून समर्थांनी विविध विषयांवर चिंतनपर रचना केल्या. दासबोध, आत्माराम, मनाचे श्लोक, करुणाष्टके, शेकडो अभंग, स्तोत्रे, स्फुट रचना, रुबाया, सवाया, भारुडे, कविता, अनेक ओवीबद्ध पत्रे तसेच आरत्या त्यांनी रचलेल्या आहेत. समर्थांच्या वाङमयाचे मूल्यमापन भिन्न प्रकारे, अनेक दृष्टिकोनातून, अनेक विचारवंतांनी केले आहे. त्यांच्या एक एक वाङ्‌मय प्रकाराचा ऊहापोह करून त्या प्रकारच्या वाङ्‌मयातून समर्थ काय सांगतात, हे पहातानाही त्यांच्या भक्तीचे, शैलीचे, बुद्धिमत्तेचे कुणालाही कौतुक वाटावे. त्यांचा भाषावैभव स्वयंभू होता. त्यांना शब्दांची कधी वाणच पडली नाही.

रामदास स्वामींनी रचलेल्या आरत्यांमध्ये विविधता आहे. आरती म्हणजे पूजेनंतर देवाला वातीचा दिवा लावून ओवाळणे आणि तो ओवाळताना म्हणायचे गीत. आरती म्हणजे आर्तता, व्याकुळता, वेदना, तळमळ, दुःख व्यक्त करणे, आत्मनिवेदन करणे, वगैरे. आरतीत ईश्वराची मनोभावे प्रार्थना व ईश्वराला भवबंधनातून सोडविण्यासाठी याचना असते. जिवाशिवाचे ऐक्य साधणे, देवाची स्तुती करणे, त्यांच्या रूपा-गुणाचे गान करणे, त्याचे लीलाचरित्र गाणे, भक्ताने पूर्णपणे शरणागती पत्करणे असा भाव आरतीत असतो. समर्थांनी "रामी रामदास' किंवा "दास रामाचा' असा स्वतःचा उल्लेख असलेल्या एकूण ६१ आरत्या रचल्या आहेत.

"रामी रामदास सहजी सहज ओवाळी।

दास रामाचा वाट पाहे सदना।'

रामदासांनी सर्वात जास्त म्हणजे १६ आरत्या त्यांचे आराध्य दैवत श्रीरामावर रचल्या आहेत. रामावर त्यांनी काकड आरती, धुपारती, शेजारती अशा निरनिराळ्या प्रसंगांवरच्या आरत्या केल्या. आरतीतून त्यांनी रामाच्या सगुण रूपाचे वर्णन केले आहे.

"कीरीट कुंडले माला विराजे।

झळझळ गंडस्थळ धननिळ तनु साजे।

घंटा किंकणी अंबर अभिनव गती साजे।

अंदवाकी तोडर नूपुर ब्रीद गाजे।

असे सालंकृत रामाचे वर्णन केले आहे. भक्त कैवारी राम म्हणून त्याची स्तुती केली आहे. "मंगल धामा रामा सद्‌गुरू निष्पापा' म्हणून रामाला सद्‌गुरू म्हणून गुणगायन केले आहे. रामाच्या गुणांचे, पराक्रमांचे वर्णन केले आहे. राम म्हणजेच परब्रह्म असे म्हणून त्याचे आरतीतून माहात्म्य वर्णिले आहे. विश्वकल्याणासाठी रामाजवळ कळवळून कल्याण करण्यास सांगितले आहे.

हनुमंताच्या आरत्या :

समर्थ रामदास स्वामींनी हनुमंतावर ७ आरत्या रचल्या आहेत. त्यांची हनुमंतावर निस्सीम भक्ती होती. श्री समर्थांचे हनुमंत हे काळजीवाहू सरकार होते. हनुमंतामध्ये बुद्धिमत्ता आणि शक्तीचा मनोहर मिलाप असल्याने त्यांच्या हनुमंताच्या आरत्यांतून वीररसाचे दर्शन घडते.

"पर्वत कडाडिले,

भू मंडळ भयभीत झाले।

सिंधूचे जळ डळमळू लागले,

सुरवर, नर निशाचर पळू लागले'

असे हनुमंताचे ते रौद्र रूप वर्णन करतात. हनुमंताला त्यांनी त्याच्या कर्तृत्वाला, रूपाला साजेल असेच वर्णन आरतीतून केले आहे. "भीमरूपी महारुद्रा' असे मारुतीचे वर्णन ते करतात.

समर्थांनी सद्‌गुरू या विषयावर तीन आरत्या रचल्या. आरतीतून सद्‌गुरूबद्दलची अतीव भक्ती, प्रेम व कृतज्ञता व्यक्त केली आहे. संसारसागरात हेलकावे खाणाऱ्या जीवन नौकेला एखाद्या नाविकाप्रमाणे पैलतीरावर आणण्याचे कार्य सद्‌गुरू करतात. भक्तिमार्गात सद्‌गुरूचे स्थान अढळ आहे. "सद्‌गुरू प्रसादे सुगम उपाय' अशी त्यांना खात्री आहे. सद्‌गुरूला रामदास स्वामी, माहेर असे म्हणतात. सद्‌गुरूलाभ हा अध्यात्माचा आत्मा आहे. म्हणून तर "सद्‌गुरू सारिखा असता पाठीराखा' या भावनेने त्यांनी आरत्यांतून त्याचे वर्णन केले आहे.

त्यांनी गणपतीच्या तीन आरत्या रचल्या आहेत. त्यांच्या "सुखकर्ता दुःखहर्ता' या आरतीने सात समुद्र ओलांडले. ती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तर पोहोचलीच पण जगात जेथे जेथे भारतीय स्थायिक झाले, तेथे तेथे ती आरती होतेच. गणपती उत्सवात तर दिवसरात्र ह्या आरतीचे सूर आळवले जातात. पूजेनंतर गणपतीच्या आरतीनेच आरत्यांचा प्रारंभ होतो.

गणपतीच्या आरतीत मोदक, दूर्वा, गजमुख, वक्रतुंड, तंदुलधारी असे वर्णन आहे. गणपतीला ते संकट नाशक, सुखकर्ता, दुःखहर्ता, विघ्नविनाशक म्हणून गौरवितात. समर्थांनी देवीवर, संतांवर, ज्ञानेश्वरांवर, भगवद्‌गीतेवर, खंडोबावर, शंकरावर, विष्णूवर, दत्तावर, कृष्णा नदीवर अशा अनेक देवतांवर आरत्या रचल्या आहेत. शंकराच्या आरतीत "विषकंठ व्याघ्रांबर' गजचर्मधारक, जटाजूट, गंगाधारक, फणिवरबंधक, असे वर्णन आढळते तर खंडोबाच्या आरतीत मल्लांना मारलेल्यांचे वर्णन आहे. इतर देवतांच्या आरत्यांतही त्यांनी त्यांच्या सगुणरूपाचे त्यांच्या वैशिष्ट्यांचे, त्यांच्या माहात्म्यांचे वर्णन केले आहे. समर्थांनी विठ्ठलावरही आरती केली आहे. संतमंडळींवर आरत्या आहेत. भगवद्‌गीतेवर त्यांची अतूट श्रद्धा होती. त्यांनी तिच्यावरही आरती केली आहे. ते कृष्णाकाठी वास्तव्यास होते म्हणून कृष्णा नदीवर आरती करून त्यांनी तिच्या ठायीची भक्ती व्यक्त केली आहे.

नवरसांचे दर्शन:

त्यांच्या आरत्यात भक्तिरस तर परिपूर्ण आहेच. पण शांतरस, वीररस, करुणरस, हास्यरस ही आहे. दत्ताच्या आरतीत ब्रह्मा, विष्णू, महेश अनसूयेच्या पातिव्रत्याची परीक्षा घेण्यास आले तेव्हा तिच्या पातिव्रत्याच्या तेजाने तिन्ही देव बालके झाली. पतीचे बालरूप पहाण्यास अनसूयेने देवांच्या पत्नींना हाका मारल्या आणि आपला पती ओळखा बघू म्हणून सांगितले, अशी गंमत त्यांनी आरतीत वर्णिली आहे. देवीच्या आरतीत "आदिमाया, जगत्‌जननी, मायभवानी" अशी विशेषणे वापरून, जगदंबेचे माहात्म्य अती ओजसपणे, भक्तिरसाने परिपूर्ण, नतमस्तक होऊन, आणि मी तुझा पुत्र आहे हा भाव अंतरी ठेवून वर्णिले आहे.

समर्थांची भाषाशैलीत त्यांच्या ठायीचा आत्मविश्वास दिसतो. सगुण रूपाचे वर्णन करताना ते प्रत्यक्ष रामदर्शनात रंगून जातात. ‘मी दास’ हा भाव प्रकट करतात. रामी रामदासी अशी त्याची समाधी लागलेली असे. आरतीत त्यांनी अनेक वाद्यांचे गजर केले आहेत. अनेक फुलांचा, दागिन्यांचा उल्लेख आहे. तू राक्षसांचा संहार कर्ता, भूतबाधा नाश करणारा, भक्त तारणारा, पतितपावन, संकटमोचन असे परिणामकारक, अर्थपूर्ण वर्णन आहे. प्रचिती देणारी रसपूर्ण अशी त्यांच्या आरत्यांची रचना आहे. त्यांच्या भाषेत कुठे कुठे टप्पे घेणाऱ्या चेंडूप्रमाणे तर कुठे सोंडेत साखळदंड धरून आवाज करणाऱ्या हत्तीप्रमाणे तर कधी धनुष्याच्या टणत्काराप्रमाणे तर कुठे सरस्वतीच्या वीणेच्या झंकाराप्रमाणे, कुठे रसपूर्ण चवदार फळांप्रमाणे तर कुठे मधाचे बोट चाटावे तसे अतिशय गोड असे वैचित्र्य आहे. त्यांच्या आरत्यांत औदार्य आहेच, पण जीवीचे आर्तही आहे. रामाला वर देण्याची ताकद दाखवून देवीचे माहात्म्य किती श्रेष्ठतम वर्णिले आहे. देवांच्या, देवीच्या, गुरूंच्या आणि जे आपणास आदरणीय आहेत, त्यांच्या आरत्या गायल्या जातात. कवीसमोर, सर्वशक्तिमान, सर्वसाक्षी, सद्‌गुणसंपन्न दैवत असते. त्याला अनन्यभावाने शरण जाणे आणि आपला उद्धार करण्याची याचना करणे, मी लीन, अज्ञानी, मूढ, अविवेकी असा हीन भाव स्वीकारणे हा भाव असतो. ह्या भवसागरातून सोडव हेच मागणे आरत्यांत असते. आरती वाङ्‌मयातून भारतीय संस्कृतीचे प्रतिबिंब दिसते. मंदिर असो, घर असो, सार्वजनिक स्थळ असो, जेथे भगवंताची मूर्ती तेथे आरतीचे सूर गुंजत असतात. समर्थ रामदासांच्याकडे केवळ भावभक्तीच नव्हती तर, तिच्या जोडीला कलाविलास होता. कवित्व करणारा मति-प्रकाश होता. ज्यायोगे "‘श्रवण रस तुंबळे' असा वाग्विलास त्यांना साध्य झाला" अशा शब्दात कवी यशवंतांनी समर्थांच्या आरत्यांची महती सांगितली आहे.

गेली साडेतीनशे वर्षे महाराष्ट्रात आणि मराठी माणसांच्या जगभरातल्या कुटुंबात समर्थांनी रचलेल्या आरत्या गायिल्या जातात. श्रीरामांनी, श्री गणेशाने आणि अन्य देवतांनी भक्तावर प्रसन्न व्हावे, दुष्टांचा संहार करावा, सज्जनांचे रक्षण करावे, भक्तांच्या मनोकामना पूर्ण कराव्यात, अशी प्रार्थना समर्थांनी या आरत्यांद्वारे केली आहे. त्यांच्या आरत्यांचा निनाद सर्व मंदिरात दररोज होतोच. सामान्यांतला सामान्य भाविकही या आरत्या करताना तल्लीन होतो. अत्यंत साधे सोपे पण, परमेश्वराला आर्ततेने साद घालणारे शब्द, प्रासादिक रचना यामुळेच समर्थांच्या आरत्या चिरंतन आणि समाजाला संजीवनी देणाऱ्या ठरल्या आहेत. गणेशोत्सवात श्री गणेशाची आरती समूहाने म्हणण्याची परंपरा सुरू झाली. आता गणेशोत्सवाच्या काळात ही आणि अन्य आरत्या हजारो भक्त एका तालासुरात म्हणतात तेव्हा, सारे वातावरणच श्री गणेशमय होऊन जाते. या आरत्या म्हणजे श्री समर्थ रामदासांनी मराठी भाषेला आणि माणसांना दिलेले वरदान आहे.

श्री समर्थ रामदास स्वामी कृत : - शंकराची आरती

लवथवती विक्राळा ब्रम्हांडी माळा| विषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा| लावण्यसुंदर मस्तकीं बाळा| तेथुनियां जळ निर्मळ वाहे झुळझुळा||1|| जयदेव जयदेव जय श्री शंकरा| आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा|| कर्पुगौर भोळा नयनीं विशाळा| अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा| विभुतीचे उधळण शितिकंठ नीळा| ऐसा शंकर शोभे उअमवेल्हाळा||2|| देवीं दैत्यीं सागर मंथन पैं केले| त्यामाजी अवचित हलहल जे उठिले| तें त्वां असुरपणें प्राशन केलें| नीलकंठ नाम प्रसिद्ध झालें||3|| व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी| पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी| शतकोटींचे बीज वाचे उच्चारी| रघुकुळटिळक रामदासाअंतरी||4||


पंचानन हय वाहन सूर भूषित निळा

खंडा मंडित दंडित दानव अवळीला

मणी मल्ल मर्दूनी तो धूसर पिवळा

करी कंकण बाशिंगे सुमनांच्या माळा


जयदेव जयदेव जय शिव मल्हारी

वारी दुर्जन असुरा भाव दुस्तर तारी ll १ ll



सुरवर सत्त्वर वर दे मजलागी देवा

नाना नामे गाईल ही तुमची सेवा

अघटीत गुण गावया वाटतसे हेवा

फणीवर शिणला तेथे नर पामर केवा


जयदेव जयदेव जय शिव मल्हारी

वारी दुर्जन असुरा भाव दुस्तर तारी ll २ ll


रघुवरस्मरणी शंकर हृदयी निवाला

तो हा मल्लांतक अवतार झाला

यालागी आवडे भावे वर्णिला

रामी रामदास जिवलग भेटला


जयदेव जयदेव जय शिव मल्हारी

वारी दुर्जन असुरा भाव दुस्तर तारी ll ३ ll