मायनाक भंडारी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मायनाक भंडारी हे दर्यासारंग शिवाजी महाराजांच्या आरमाराचे सुभेदार होते. इ.स.१६७९ चे सुमारास महाराजांनी सागरी शत्रूंना थोपविण्यासाठी मुंबई बंदराच्या तोंडाशी असणाऱ्या खांदेरी-उंदेरी बंदरावर किल्ला बांधण्याचे ठरविले. त्यादृष्टीने राजांच्या वेगाने हालचालीही सुरू झाल्या .मुंबई बेटावर नजर ठेवून सागरी शत्रूंच्या हालचालींना प्रतिबंध करण्याची राजांची या मागची योजना होती. शिवाजी महाराजांच्या या हालचालीने इंग्रज प्रचंड धास्तावले आणि त्यांचा हा हेतू तडीस जाऊ नये म्हणून इंग्रजांनी खांदेरी-उंदेरीवर आपला हक्क दाखवीत महाराजांशी उघड उघड युद्ध पुकारले. कॅप्टन विलियम मिन्चीन, रिचर्ड केग्वीन, जॉन ब्रान्डबरी, फ्रान्सिस थोर्प असे नामांकित सागरी सेनानी खांदेरीवर पाठवून ते बेट मराठ्यांकडून काबीज करण्याचे मोठे प्रयत्न इंग्रजांनी केले. रिव्हेंज आणि हंटर नावाच्या दोन युद्धनौका (फ्रिगेट्स) त्यांनी पाठवल्या होत्या.

गेप नावाच्या माणसाकडून काही गुराबा भाड्याने घेऊन त्यावर कशातरी काही तोफा बांधून शिवाजी महाराजांनी इंग्रजी आरमाराला तोंड देण्याचा प्रयत्न केला. स्वराज्याच्या ह्या छोट्याश्या आरमाराचा आपण सहजासहजी पराभव करू, अशा समजात इंग्रज होते. महाराजांनी देखील इंग्रजांच्या या आव्हानास तोंड देण्याचा निर्धार केला व मायनाक भंडाऱ्यांना रवाना केले. मायनाक भंडाऱ्यांनी अतिशय पराक्रमाने आणि चिवटपणाने प्रखर संघर्ष करत इंग्रजांचा हा मनसुबा हाणून पाडला. याच मायनाक भंडारींना महाराजांनी हर्णे गावाजवळील सुवर्णदुर्ग जिंकण्याची मोहीम फर्मावली. महाराजांच्या आज्ञेवरून मायनाक भंडारी फौजेसह सुवर्णदुर्गवर तुटून पडले. त्यावेळी त्यांचा पुतण्या देखील त्यांच्या समवेत होता. या मोहिमेमध्ये भंडाऱ्यांचा पुतण्या धारातीर्थी पडला. मात्र मायनाक भंडाऱ्यांनी सुवर्णदुर्ग अखेर स्वराज्यात दाखल केला.

मायनाक भंडारी हे भंडारी समाजातून असून त्यांची समाधी रत्‍नागिरी जिल्ह्यातील भाटे येथे आहे.