धुंधुरमास (धनुर्मास)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(धुंदुरमास (धनुर्मास) या पानावरून पुनर्निर्देशित)

सूर्य एका वर्षात १२ राशींतून भ्रमण करत असतो, तो ज्या महिन्यात धनु राशीत असतो, त्या मासाला धनुर्मास किंवा धुंधुरमास म्हणतात. मकरसंक्रातीच्या आदल्या दिवशी येणारी भोगी हा (मार्गशीर्ष अमावास्या) या महिन्याचा शेवटचा दिवस असतो. हा काळ १३-१७ डिसेंबरच्या आसपास सुरू होऊन १३-१५ जानेवारीला संपतो. हिंदू पंचागात हा काळ मार्गशीर्ष-पौष या काळात येतो.

हा कालखंड दक्षिणायनात हेमंत ऋतूमध्ये असतो. यावेळी हवेत अत्यंत गारठा असतो. विशेषतः रात्री हे शैत्य वाढते. रात्रीही मोठ्या असतात. जठराग्नी या शैत्यामुळे नाभिस्थानी कोंडला जातो आणि मनुष्याची भूक वाढते –

बलिन: शीतसंरोधात् हेमन्ते प्रबलोऽनल:भवति , -अष्टाङ्गहृदय सूत्रस्थान अध्याय ३

याचा परिणाम असा होतो की मनुष्याला सकाळी लवकर भूक लागते. आयुर्वेदात हा परिणाम असा वर्णन केला आहे-

दैर्घ्यात् निशानाम् एतऱ्हि, प्रातः एव बुभुक्षित: (भवति)।-अष्टाङ्गहृदय सूत्रस्थान अध्याय ३

आरोग्याचा नियम असा की भूक लागल्याशिवाय खाऊ नये आणि भूक लागल्यावर खाण्यास विलंब करू नये.भूक लागल्यावरही जर अन्न पोटात गेले नाही तर त्याचा परिणाम असा होतो-

अल्पेन्धनो धातून्स पचेत्॥ -अष्टाङ्गहृदय सूत्रस्थान अध्याय ३

अग्नीला इंधन हवे असते.ते मिळाले नाही तर तो विझून जातो. जठराग्नीचे इंधन म्हणजे अन्न. अग्नी प्रदीप्त झाल्यावर ते त्याला मिळालेच पाहिजे. न मिळेल तर तो रस, रक्त इत्यादी धातूंचा नाश करतो. आणि थकवा जाणवू लागतो, वजन कमी होते.
हे सर्व टाळायचे असेल तर अग्नीला त्या त्या वेळी इंधन पुरवले पाहिजे.म्हणून धनुर्मासात प्रातः एव म्हणजे सूर्योदय झाल्याबरोबर आहार करणे आरोग्याच्या दृष्टीने चांगले.
हा झाला आरोग्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून विचार.याला आता आपल्या संस्कृतीत कसे बसवले तेही पहाण्यासारखे आहे.

तैर्दत्तान् अप्रदाय एभ्यः यो भुङ्क्ते स्तेन एव स:भ.गी.३.१२

इंद्र, वरुण, अग्नी, सूर्य अशा अनेक देवतांमुळे आपल्याला भोग्य पदार्थ उपलब्ध होत असतात, म्हणून आपण भोग घेण्यापूर्वी थोडा त्यांना अर्पण करावा. त्यांनीच दिलेले भोग त्यांना न देता जो स्वतः उपभोगतो तो स्तेन म्हणजे चोर ठरतो. धनुर्मासात सकाळी सकाळी कितीही कडकडून भूक लागली असली तरी ताजे गरम अन्न आधी सूर्याला अर्पण करावे, म्हणजे नैवेद्य दाखवावा आणि मग भक्षण करावे अशी परंपरा आहे.
धनुर्मास हे महिनाभर आचरण्याचे व्रत आहे. किमान गारठा असेपर्यंत आणि सकाळी भूक लागते आहे तोवर तरी निश्चितच आचरावे.
आरोग्यशास्त्र आणि धर्मशास्त्र यांचा सुंदर मेळ धुंधुरमासव्रतात दिसतो.

पहा : खरमास