गणेश श्रीकृष्ण खापर्डे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(दादासाहेब खापर्डे या पानावरून पुनर्निर्देशित)

गणेश श्रीकृष्ण खापर्डे उर्फ दादासाहेब खापर्डेे.

हे विदर्भाच्या इतिहासातील विलक्षण चैतन्यपूर्ण व्यक्तिमत्त्व होते. त्यांची बुद्धीमत्ता चतुरस्त्र होती. ते विदर्भातील नामवंत वकील होते.त्यांना वेदांत, ज्योतिष्यशास्त्र, अध्यात्म वगैरे विषयात रस होता. याशिवाय नाटक, काव्य, संगीत, नृत्य , सामाजिक कार्य यांत ते रंगत. त्यांचे वक्तृत्व विलक्षण प्रभावी होते. हे एक भारतीय वकील, विद्वान, राजकीय कार्यकर्ते आणि शिर्डीचे साईबाबा आणि संत गजानन महाराज यांचे प्रख्यात भक्त होते.

सुरुवातीचे जीवन[संपादन]

दादासाहेब खापर्डे यांचे वडील इंग्रजी सैन्यात पुरवठा खात्यात कारकुनी करीत होते, त्यासाठी त्यांची सतत एका गावाहून दुसऱ्या गावी फिरती चालत असे.

दादासाहेबांचा जन्म वऱ्हाडमधल्या इंगरोली या गावात झाला, पण बालपण अमरावती व नागपुरात गेले. अवांतर वाचनाची दांडगी हौस असल्याने दादासाहेबांचे क्रमिक अभ्यासाकडे लक्ष नसे. अकोल्याहून ते दुसऱ्या प्रयत्‍नात मॅट्रिकची परीक्षा पास झाले. पुढचे बी.ए.चे शिक्षण मुंबईतल्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात घेतले. तेथे असताना त्यांनी संस्कृत आणि इंग्रजी वाङ्मय अभ्यासले होते. पुढे कायद्याची एल्एल.बी. ही परीक्षा पास झाल्यानंतर ते वऱ्हाडात इ.स. १८८५ ते १८९० या सालांत, आधी अमरावतीत सरकारी वकील, नंतर मुन्सिफ या पदावर, व नंतर उपायुक्त झाले. नोकरीचा कंटाळा आला म्हणून ती सोडून देऊन ते अमरावतीतच वकिली करू लागले.

राजकारण[संपादन]

आपल्या प्रभावी वक्तृत्वामुळे दादासाहेब अमरावतीत लोकप्रिय झाले होते. त्यांनी राजकीय व सामाजिक क्षेत्रांत काम करायला सुरुवात केली. अमरावती म्युनिसिपालिटीत ते १६ वर्षे उपाध्यक्ष होते. टिळकांशी संबंध आला म्हणून सरकारने त्यांना उपाध्यक्षपदावरून दूर केले. इ.स. १८९७मध्ये अमरावतीला भरलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाच्या स्वागत समितीचे ते अध्यक्ष होते. कलकत्त्यात काँग्रेसने भरवलेल्या शिवजयंती उत्सवात ते टिळकांबरोबर हजर होते. टिळकांचे एकनिष्ठ विश्वासू सहकारी असल्याने, दादासाहेब खापर्डे हे लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक व बिपिनचंद्र पाल या त्रयीचे नेतृत्व असलेल्या काँग्रेसमधल्या जहाल गटात सामील होते. त्यांच्या कणखर व असामान्य व्यक्तिमत्त्वाचा मध्य प्रांतात दरारा असल्याने तेथे ते वऱ्हाडचे नबाब म्हणून ओळखले जात. दादासाहेब खापर्डे हे लंडनमधल्या प्रिव्ही काउन्सिलमध्ये इ.स. १९०८ ते इ.स. १९१० या काळात चाललेल्या टिळकांवरच्या खटल्यात त्यांचे वकील होते.

खापर्डे हे इ.स.१९१६ मध्ये लोकमान्य टिळकांनी काढलेल्या इंडियन होम रूल लीगच्या संस्थापक-सदस्यांपैकी एक होते. देशाच्या कारभारात सुधारणा सुचविणाच्या निमित्ताने भारताच्या व्हॉइसरॉयला भेटायला गेलेल्या काँग्रेसच्या समितीमध्ये ते होते. मे, इ.स. १९१९ ते जानेवारी, इ.स. १९२० या काळात खापर्डे यांचा मुक्काम इंग्लंडच्या संयुक्त संसदीय समितीत आपली बाजू मांडण्यासाठी इंडियन होम रूल संघाचे प्रतिनिधी म्हणून लंडनमध्ये होता. त्या काळात त्यांनी लंडनमध्ये अनेक जाहीर सभांमध्ये भाषणे केली. भाषणांदरम्यानचे त्यांचे हावभाव, त्यांचा नर्म विनोद आणि हजरजबाबीपणा पाहून इंग्लंडच्या काही वृत्तपत्रांनी त्यांची तुलना मार्क ट्वेन यांच्याशी केली.[१]

नाट्य चळवळीत सहभाग[संपादन]

सभांमध्ये भाषणे देण्याच्या निमित्ताने दादासाहेबांचा पुण्या-मुंबईशी आणि नाट्यक्षेत्राशी संबंध आला. अमरावतीला गेल्यावर दादासाहेब खापर्डे यांनी ह.ना. आपटे यांच्या कांचनगडची मोहना, जयध्वज आणि त्राटिका या नाटकांच्या जातीने तालमी घेतल्या होता. पुण्यात त्यांची ’नाट्यकला प्रवर्तक’ आणि शाहू नगरवासी’ या नाटक कंपन्यांशी जवळचा संबंध प्रस्थापित झाला. बालगंधर्व म्हणजे नारायणराव राजहंसांशी त्यांची मैत्री झाली. बालगंधर्व जेव्हा जेव्हा अमरावतीला यायचे तेव्हा दादासाहेब खापर्डे यांच्याकडेच उतरायचे.

प्रत्यक्ष रंगभूमीशी दादासाहेबांचा कधीच संपर्क आला नसला तरी एक कलोपासक म्हणून त्यांनी नाव कमावले होते. त्याकाळी महाराष्ट्रात नाट्यचळवळ नुकतीच बाळसे धरू लागली होती. महाराष्ट्रातील तमाम नाट्यसंस्था आणि कलापथके यांना एकत्र आणण्याची कल्पना दादासाहेब खापर्ड्यांनी मांडली आणि यशस्वी केली. त्यातूनच नाट्यसंमेलनाची संकल्पना पुढे आली. नाट्यसंस्थांतील अनेक दिग्गजांची मुंबईला बैठक झाली; अमरावतीला खास आमंत्रण धाडून दादासाहेबांना बैठकीसाठी बोलावले होते. आणि बैठकीत ठरल्याप्रमाणे पहिल्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची माळ दादासाहेब खापर्डे यांच्या गळ्यात पडली.

व्यक्तिगत जीवन[संपादन]

दादासाहेब खापर्डे शिरडीच्या साईबाबांचे भक्त होते. डिसेंबर इ.स. १९१० मध्ये ते साईबाबांना भेटले आणि त्यानंतर इ.स. १९१८ पर्यंत त्यांनी त्यांच्या शिरडीभेटीच्या हकीकती रोजनिशीत नोंदून ठेवल्या आहेत. त्या नोंदींवरून साईबाबांची दिनचर्या, त्यांचे आयुष्य व त्यांचे काम कसे चाले यांवर पुरेसा प्रकाश टाकता आला आहे. शेगावच्या गजानन महाराजांविषयीच्या गजानान विजय या ग्रंथातही त्यांचा उल्लेख आहे.

मानसन्मान[संपादन]

  • दादासाहेब खापर्ड्यांनी आपल्या आयुष्यात अनेक मानसन्मान व पुरस्कार मिळवले, अनेक जबाबदार पदांवर काम केले. स्वातंत्र्यपूर्व काळात डिस्ट्रिक्ट काउन्सिलचे ते पहिले आणि पुढे अनेक वर्षे अध्यक्ष होते.
  • ते इ.स. १९०५ साली मुंबईत भरलेल्या पहिल्या मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष होते.

निधन[संपादन]

१ जुलै, इ.स. १९३८ रोजी दादासाहेब खापर्डे यांचे निधन झाले. त्याचे चिरंजीव बाळकृष्ण गणेश खापर्डे हेही वकील आणि राजकीय पुढारी होते.

दादासाहेब खापर्डे यांची चरित्रे[संपादन]

  • भारतरत्न गणेश श्रीकृष्ण उपाख्य दादासाहेब खापर्डे यांचे जीवन चरित्र (लेखक - वासुदेव बळवंत खापर्डे)

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. ^ डॉ. बी जी कुंटे. "लाइफ-स्केच ऑफ दादासाहेब खापर्डे (इंग्लिश: Life-Sketch of Dada Saheb Khaparde)" (PDF) (इंग्रजी भाषेत). p. २. ५ फेब्रुवारी, इ.स. २०१० रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)

बाह्य दुवे[संपादन]