शाहू पहिले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(छत्रपती शाहूराजे भोसले या पानावरून पुनर्निर्देशित)


छत्रपती सम्राट शाहूराजे भोसले
छत्रपती , सम्राट
छत्रपती शाहू महाराज यांचे अस्सल चित्र
मराठा साम्राज्य
अधिकारकाळ १७०७ - १७४९
अधिकारारोहण सम्राट पदाभिषेक
राज्याभिषेक १२ जानेवारी १७०८
राज्यव्याप्ती अफगाणिस्तान मधील अटक पासून बंगाल मधील कटक पर्यंत, काश्मीर पासून तामिळनाडू तील तंजावर पर्यंत
राजधानी सातारा
पूर्ण नाव शाहूराजे संभाजीराजे भोसले
जन्म १८ मे १६८२
माणगाव, महाराष्ट्र
मृत्यू १५ डिसेंबर १७४९
सातारा, महाराष्ट्र
पूर्वाधिकारी छत्रपती महाराणी ताराबाई
पेशवे बहिरोजी पिंगळे (१७०७-१७११),
परशुराम त्रिंबक कुलकर्णी (१७११-१७१३),
बाळाजी विश्वनाथ (१७१३-१७२०),
बाजीराव पेशवे
(१७२०-१७४०),
नानासाहेब पेशवे (१७४०-१७६१)
उत्तराधिकारी रामराजे छत्रपती
वडील छत्रपती संभाजी महाराज
आई महाराणी येसूबाई
पत्नी महाराणी सकवारबाई (द्वितीय) ,
महाराणी सगुणाबाई (द्वितीय) ,
महाराणी अंबिकाबाई (द्वितीय) ,
महाराणी सावित्रीबाई
संतती रामराजे छत्रपती (दत्तक),
संभाजीराजे,
फत्तेसिंह (मानस पुत्र),
गजराबाई,
राजसबाई,
पार्वतीबाई (दत्तक)
राजघराणे भोसले
राजब्रीदवाक्य । श्री वर्धिष्णुर्विक्रमे विष्णोः। सा मूर्तिरिव वामनी । । शंभूसुतोरिव । मुद्रा शिवराजस्य राजते ।।
चलन होन, शिवराई (सुवर्ण होन, रुप्य होन??)

छत्रपती शाहूराजे भोसले (१८ मे १६८२ ते १५ डिसेंबर १७४९), छत्रपती कार्यकाल १७०७-१७४९, भारताचा इतिहासातील धुरंधर राजकारणी, उत्कृष्ट योद्धा, प्रभावशाली मराठा शासनकर्ता,मराठा साम्राज्याचा सर्वाधिक विस्तार करणारा राजा म्हणून भारतीय आणि विशेषत्वाने महाराष्ट्रीय इतिहासावर महत्त्वपूर्ण ठसा उमटवला. शाहू महाराजांच्या कारकिर्दीत शिवाजी महाराजांनी उभ्या केलेल्या आणि संभाजी महाराजांनी मोठ्या शौर्याने सांभाळलेल्या स्वराज्याचा सर्वात मोठा विस्तार झाला.सातारा हे त्याकाळात भारताच्या राजकारणाचे केंद्रस्थान आणि सत्तास्थान ठरले.मध्य भारत,उत्तर भारत,माळवा,गुजरात हे महाराष्ट्राबाहेरील प्रांत मराठ्यांच्या अधिपत्याखाली आले,मुघल साम्राज्याचा अस्त होऊन मराठा साम्राज्याचा झेंडा भारतभर फडकला.

छत्रपति कार्यकाळ १७०७-१७४९[संपादन]

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या मराठी राज्याच्या कोल्हापूरसातारा अशा दोन स्वतंत्र छत्रपतींच्या गाद्या औरंगजेबाच्या मृत्यूनंतर (१७०७) निर्माण झाल्या. औरंगजेबाच्या अझमनामक मुलाने शाहूंची सुटका करून त्यांना राजपदाची वस्त्रे व राजपद दिले; मात्र चौथाई व सरदेशमुखीसाठी १७१३ पर्यंत मराठ्यांच्या अंतर्गत संघर्षामुळे त्यांना वाट पाहावी लागली. ⇨छत्रपती शाहू (कार. १७०८–४९) यांनी १२ जानेवारी १७०८ रोजी राज्याभिषेक करून घेऊन विधिवत मराठी राज्याचे अधिपती असल्याचे जाहीर केले. त्यांनी सातारा ही राजधानी केली. अष्टप्रधान मंडळ स्थापन करून मातब्बर सरदारांकडे खाती सुपूर्त केली. त्यांनी अनेक गुणी, कर्तृत्त्ववान व पराक्र मी माणसे निवडून राज्यविस्तार केला. या कामी त्यांना धनाजी जाधवराव, बाळाजी विश्वनाथ, खंडेराव दाभाडे, सेखोजी थोरात, चिमणाजी दामोदर, सुभानजी आटोळे, पुरंदरे यांसारखे कर्तबगार व निष्ठावान सरदार लाभले. दक्षिण हिंदुस्थानातील मोगलांचा सुभेदार सय्यद हुसेन अली याने छत्रपती शाहूंबरोबर १७१३ मध्ये तह केला. त्यानुसार मोगलांच्या दक्षिणेतील मुलखावर चौथाई व सरदेशमुखीचे हक्क मराठ्यांनी स्वतःहून वसूल करावे आणि त्याबदल्यात मोगल मुलखाचा बंदोबस्त करून मराठ्यांनी बादशहास दहा लाख रु. खंडणी द्यावी आणि १५,००० फौज मराठ्यांनी बादशहाच्या मदतीस ठेवावी; तसेच शाहूंच्या मातोश्री, कुटुंब वगैरेंची दिल्लीच्या बादशहाच्या कबजात असलेल्या आप्तेष्टांची मुक्तता करावी असे ठरले. त्याची शाहूंनी तत्काळ अंमलबजावणी केली; तथापि मोगल बादशहा फर्रुखसियार यास हा तह मान्य नव्हता. म्हणून त्याने सय्यद बंधूंबरोबर युद्घाची तयारी केली, तेव्हा सय्यदहु सेन अली वरील करारानुसार मराठ्यांची फौज घेऊन दिल्लीला गेला. त्या सोबत बाळाजी विश्वनाथ, राणोजी शिंदे, खंडो बल्लळ, सरसेनापती खंडेराव दाभाडे, बाजीराव, संताजी भोसले वगैरे मातब्बर सरदार होते. हे सर्व सैन्य यथावकाश फेब्रू वारी, १७१९ मध्ये दिल्लीत पोहोचले. सय्यद बंधूंनी फर्रुखसियार यास पदच्युत करून तुरुंगात टाकले आणि रफी-उद्-दरजत यास बादशाही तख्तावर बसविले. सय्यद बंधूंनी या नामधारी बादशहाकडून मराठ्यांना विधिवत सनदा दिल्या. त्यामुळे दक्षिणेतील मोगलांच्या सहा सुभ्यांतून चौथाई व सरदेशमुखी वसूल करण्याचे हक्क मराठ्यांना मिळाले आणि छ. शाहूंना स्वराज्याचा सनदशीर हक्क प्राप्त झाला. शिवाय बादशहाच्या कैदेत असलेले शाहूंच्या मातोश्री येसूबाई यांची सुटका करण्यात आली; परंतु महाराणी ताराबाई संस्थापित करवीरच्या गादीबरोबरचा म्हणजे छ. संभाजी राजांबरोबरचा संघर्ष संपला नव्हता. निजामाच्या मदतीने संभाजींनी शाहूंविरुद्घ मोहीम उघडली. ती आठ-दहा वर्षे चालली. अखेर दुसरा पेशवा पहिला बाजीराव याने निजामाचा पालखेड युद्घात पराभव करून ६ मार्च १७२८ रोजी मुंगी-शेगाव येथे तह होऊन शाहू हेच मराठ्यांचे एकमेव छत्रपती असून चौथ व सरदेशमुखीचा तोच खरा धनी आहे, हे निजामाने मान्य केले. त्यानंतर संभाजी व शाहू या बंधूंत १३ एप्रिल १७३१ रोजी वारणेचा तह झाला. या तहानुसार वारणा नदी दोन्ही राज्यांची सरहद्द म्हणून मान्य करण्यात आली.