गोवा मुक्तिसंग्राम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(गोवा मुक्ती: १९६१चे युद्ध (गोवा, दमण व दीव) या पानावरून पुनर्निर्देशित)

गोवा राज्याला पोर्तुगीजांच्या तावडीतून सोडवण्यासाठीचे आंदोलन केले गेले त्यास गोवा मुक्तिसंग्राम असे संबोधतात.

१९ डिसेंबर १९६१ रोजी भारतीय सेनेने गोवा, दमण व दीव हा पोर्तुगीज हिंदुस्थानातील ऊर्वरित प्रदेश मुक्त केला. दादरा व नगर हवेली हा पोर्तुगीज हिंदुस्थानातील प्रदेश त्यापूर्वीच मुक्त करण्यात आला होता. गोव्याच्या मुक्तीबरोबर पोर्तुगीजांचे हिंदुस्थानातील सुमारे ४५० वर्षांचे राज्य समाप्त झाले. त्यामुळे दरवर्षी १९ डिसेंबर हा दिवस गोवा मुक्ती दिन म्हणून पाळला जातो. पोर्तुगीजांनी गोवा येथे आल्यानंतर ख्रिस्ती धर्मपरिवर्तनाची मोहीमच सुरू केली. आणि त्याला विरोध करणाऱ्यांवर अघोरी अत्याचार सुरू केले.[१] पद्धतशीर हिंदू विरोधी हिंसाचार, जबरदस्तीने केलेले हिंदूंचे धर्मांतर , दस्तऐवजीकरण केलेले हिंदू हत्याकांड , हिंदू मूर्ती भंजन, हिंदू मंदिरांचा विध्वंस आणि हिंदू मुद्रा विटंबना, तसेच हिंदू शैक्षणिक केंद्रांचा विनाश या पोर्तुगीजांच्या अत्याचारांना गोव्याचे मूळ हिंदू कंटाळले होती. त्यामुळे सशस्त्र आणि सविनय अशा दोन्ही मार्गानं गोवन जनतेने स्वातंत्र्यासाठी आंदोलने सुरू केली. भारत स्वतंत्र झाल्यानंतर पोर्तुगीजही आपोआप गोव्यातून काढता पाय घेतील असा अंदाज होता. पण तसं झालं नाही. उलट पोर्तुगालचा शासक सालाझार अधिक कठोर झाला. त्यानं इथं अत्याचारांची मालिकाच सुरू केली. पोर्तुगीजांविरोधात उठाव होऊ नये म्हणून कडक निर्बंध टाकले. लिहिणे, बोलणे यावरही निर्बंध लावले गेले. [२] भारतीय सैन्याने 'ऑपरेशन विजय' राबवत गोवा मुक्त केला. भारताने गोवा आणि दमण दीव स्वतंत्र केले.

विलंब[संपादन]

भारतावर ब्रिटिशांचं तर गोवा आणि दमण-दीववर पोर्तुगीजांची सत्ता होती. 15ऑगस्ट 1947 ला भारतातून ब्रिटिशांची सत्ता गेली. नंतरच्या काळात काश्मीरपासून हैदराबादपर्यंत अनेक संस्थानंही देखील भारतात सामील झाली. पण गोवामुक्ती लांबली. कारण भारत सरकारमधील मंत्रिमंडळातील तत्कालीन मंत्री आणि खुद्द पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हे गोव्यातील पोर्तुगीजांच्या विरोधात लष्करी कारवाई करण्यास अनुकूल नव्हते.[३] पोर्तुगालच्या विरोधात सत्याग्रहींनी केलेल्या कुठल्याच कृत्यांना भारत सरकारकडून परवानगी किंवा पाठिंबा मिळणार नाही हे भारत सरकारने आधीच स्पष्ट केले होते.' 'एवढंच नव्हे तर नेहरूंनी गोवा मुक्तीसाठी चालवलेल्या सशस्त्र लढा आणि सत्याग्रहाला कोणतंच सहकार्य केले नाही' जर भारत सरकारने आणि पंडित नेहरूंनी त्यावेळी ठाम भूमिका घेतली असती तर गोवा देखील भारतापाठोपाठ मुक्त झाला असता.[४] डॉ. राम मनोहर लोहिया यांच्यामुळे या लढ्याला बळ मिळाले.

लढा[संपादन]

याकाळात 'आझाद गोमंतक दल'सारख्या सशस्त्र दलाची स्थापना झाली. पोर्तुगीजांच्या विरोधात गमिनी पद्धतीने अनेक हल्ले या सशस्त्र दलाने केले. गोवा मुक्ती संग्रामात महाराष्ट्रातील जनतेने मोठी साथ दिली. महाराष्ट्रातून गोवा स्वातंत्र्य सैनिकांची पथके वारंवार गोव्याच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करत असत. पुण्यात एस. एम. जोशी, ना. ग. गोरे, शिरूभाऊ लिमये, सेनापती बापट, हिरवे गुरुजी यांनी 'गोवा विमोचन समिती'ची स्थापना केली. संगीतकार सुधीर फडके देखील गोवा मुक्ती संग्रामात सहभागी होते. गोवा मुक्ती संग्रामात महिलांचा मोठा सहभाग होता. पोर्तुगीजांनी केलेल्या गोळीबारात केशवराव गोरे, हिरवे गुरुजी, रामात्यागी बाबा यांच्या बरोबरीने कमल उपासनी, प्रभा साठे, शांता राव यांचा मृत्यु झाला.

१९६१ च्या युद्धानंतर भारतभूमीवरील उरलेसुरले पोर्तुगीज अधिपत्य समाप्त झाले, तसेच गोवा, दमण व दीव हा प्रदेश संपूर्णपणे मुक्त झाला. या अर्थाने, १९६१ चे युद्ध हा गोवा मुक्ती आंदोलनाचा (किंवा खरे तर गोवा मुक्ती प्रक्रियेचा) शेवटचा व अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पा होता. तरीसुद्धा आपणास हे लक्षात घ्यावे लागेल, की हे मुक्तियुद्ध म्हणजे गोवा मुक्ती आंदोलनाचा फक्त एक लहानसा (परंतु निर्णायक) भाग होता. या युद्धाव्यतिरिक्त गोवा मुक्ती आंदोलनाचा खूप मोठा इतिहास आहे, ज्यामध्ये स्थानिक गोवेकर स्वातंत्र्यसैनिकांचा खूप मोठा वाटा आहे. या अर्थाने, "१९६१ चे युद्ध म्हणजेच गोवा मुक्ती आंदोलन" असे म्हणणे अत्यंत चुकीचे ठरेल.[ संदर्भ हवा ]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ team, abp majha web (2021-12-19). "Goa Liberation Day : आज गोवा मुक्ति दिन; काय आहे मुक्ति संग्रामाचा ज्वलंत इतिहास?". marathi.abplive.com. 2022-09-28 रोजी पाहिले.
  2. ^ team, abp majha web (2021-12-19). "Goa Liberation Day : आज गोवा मुक्ति दिन; काय आहे मुक्ति संग्रामाचा ज्वलंत इतिहास?". marathi.abplive.com. 2022-09-28 रोजी पाहिले.
  3. ^ "भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही गोवा मुक्त व्हायला 14 वर्षं का लागली?".
  4. ^ "भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही गोवा मुक्त व्हायला 14 वर्षं का लागली?".