करडा (वाशिम)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?करडा

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर रिसोड
प्रांत महाराष्ट्र
विभाग अमरावती विभाग
जिल्हा वाशीम
तालुका/के रिसोड
भाषा मराठी

करडा हे गाव वाशीम जिल्ह्याच्या रिसोड तालुक्यातील एक गाव आहे.

स्थान[संपादन]

येथून रिसोड हे तालुक्याचे ठिकाण दक्षिणेकडे १० किमी अंतरावर आहे. उत्तरेकडे पैनगंगा नदी असून, त्या पलीकडे गोभणी (७ किमी) हे गाव आहे. पश्चिमेकडे मोठेगाव (२.५ किमी) आहे. पूर्वेकडे खडकी सदार (२ किमी) हे गाव आहे. करडा गावापासून वाशीम हे जिल्ह्याचे ठिकाण ४८ किमीवर आहे.

हवामान[संपादन]

येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.

लोकसंख्येचा तपशील[संपादन]

गावाची लोकसंख्या १७७३ आहे (पुरुष ९७४, स्त्री ८३१). (इ.स.२०१३)

इतिहास[संपादन]

या गावाच्या रचनेवरून हे गाव प्राचीन नसावे याला पुष्टी मिळते. गावात एकही जुने मंदिर नाही. जुनी वास्तू म्हणावी ती केवळ गढी आहे. ती पूर्णतः ढासळली आहे; मात्र निजाम, मोगल यांच्या कार्यकाळातच गढ्या बांधल्या गेल्या. परिणामी, हे गाव ३५० ते ४०० वर्षांपूर्वीचे असावे असे वाटते. गावातील घरांची बांधणीसुद्धा आधुनिक आहे. जुन्या पद्धतीचा केवळ एकच वाडा आहे.वतनदार साहेबराव गंगाजीराव देशमुख यांचा तो पाटलांचा वाडा म्हणून ख्यातीप्राप्त आहे.

असे असताना गावाच्या एका कडेला एक टेकडी आहे. या टेकडीखाली शेकडो वर्षांपूर्वी दडलेले देवीचे मंदिर आहे, अशी आख्यायिका आहे. त्यामुळे गावातील लोक मोठ्या भक्तिभावाने या टेकडीची पूजा करतात. या टेकडीचे उत्खनन झाल्यास गावाचा खरा इतिहास समोर येईल, या हेतूने माजी सरपंच अशोकराव देशमुख यांनी पुरातत्त्व विभागाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला, परंतु संबंधितांनी दखल घेतली नाही. सध्या आता या टेकडीवर ग्रामस्थांनी लोकवर्गणी करून देवीचे छोटे मंदिर बांधले आहे. ॠषीटेकडी म्हणून तिची ओळख आहे.

गाव कुणी वसविले ?[संपादन]

हे गाव कुणी वसविले याचा ठोस असा पुरावा किंवा संदर्भ नाही; मात्र राजस्थानातून गावामध्ये तीन-चार वर्षांत एकदा येणा-या भाटांच्या दस्तऐवजाच्या आधारे १४०० व्या शतकात राजस्थानातील चार कुटुंब दक्षिण पुण्यातील सासवड येथे आले. ते सर्व लढवय्ये होते. सासवड येथून बाबुराव जगताप हे १४८४ मध्ये विदर्भात आले. त्यावेळी त्यांच्या सोबत गोपालन करणारे काही गवळीसुद्धा होते. बाबुराव जगताप यांनी करडा या गावाचा विस्तार केला. त्यांचे इतर बांधव भांडेगाव (जि. हिंगोली) आणि शेलगाव येथे स्थायिक झाले. त्यांच्यासोबत आलेले गवळी वाशीम जिल्ह्यातीलच वाघळूद आणि अमानी या गावांमध्ये स्थायिक झाले, असे भाटांकडे लिहून आहे.

करडा नाव कसे पडले?[संपादन]

गावाचे नाव करडा कसे पडले याचा काहीही संदर्भ कुठेलच उपलब्ध नाही; पण पूर्वी या परिसरात सिंचनाची फारशी व्यवस्था नव्हती. मोजक्याच शेतकऱ्यांच्या शेतात विहिरी होत्या. त्यामुळे अल्प पाण्यावर येत असलेले करडई हे पीक गावातील शेतकरी मोठ्या प्रमाणात घेत असावेत. त्यावरून करडा हे नाव पडण्याची शक्यता आहे. आता करडई सोबतच कपाशी हे गावातील प्रमुख पीकही हद्दपार झाले. महाराष्ट्रात करडा हे नाव असलेले हे एकमेव गाव आहे.

प्राचीन वस्तीचा पुरावा (काताळशिल्प)[संपादन]

हे गाव जरी प्राचीन नसले तरी या परिसरात कधीकाळी मनुष्यवस्ती होती याचा पुरावा गावाच्या बाहेर उत्तरेकडे असलेल्या दोन कातळशिल्पांवरून मिळतो. ही कातळशिल्पे माजी सरपंच बाबाराव देशमुख यांच्या शेतात आहे. ती कधी कोरली गेली, कुणी कोरलेली या बाबत कुणालाच काहीही माहिती नाही; पण हे काताळशिल्प म्हणजे थडगी असावीत. कारण दोन दग्ड जमिनीत पुरलेले आहेत आणि त्यावर परत जाणाऱ्या पावलांचे ठसे आहेत. त्यामुळे ही थडगीच असावी, याला पुष्टी मिळते. ती दोन ते अडीच हजार वर्षांपूर्वीची असावीत.

धर्म[संपादन]

गावात हिंदू आणि बौद्धधर्मी अधिक. सध्या गावामध्ये मुस्लिम धर्माचे केवळ एकच घर आहे. पूर्वी गावात मुस्लिमांची सहा कुटुंबे होती; पण कालांतराने ती जवळच्याच रिसोडला स्थायिक झाली. त्यांची घरे आणि शेत जमिनी अजूनही गावामध्ये आहेत. त्यासाठी त्यांचे गावात नेहमी येणेजाणे असते.

धार्मिक स्थळे[संपादन]

गावामध्ये मारुती, गणपती, विठ्ठल-रखुमाई ही तीन मंदिर आहेत. शिवाय ॠषीटेकडीवर नव्याने दुर्गादेवीचे मंदिर बांधण्याचे काम सुरू आहे. गावाबाहेर जुने आणि नवे असे भवानी मातेची दोन मंदिरे आहेत. पैनगंगेच्या काठावर महादेवाचे मंदिर आहे. शिवाय मुस्लिम धर्मीयांचा एक पीरसुद्धा गावात आहे.

अर्थव्यवस्था[संपादन]

बहुतांश ग्रामस्थांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. काही पशुपालनही करतात. सोयाबीन, हरभरा, गहू, उडीद, मूग ही प्रमुख पिके आहेत. त्यावरच गावाची अर्थव्यवस्था चालते.

प्रशासन[संपादन]

ग्रामपंचायत सदस्य संख्या नऊ. प्रकाशकुमार शेषराव धांडे २०१० पासून सरपंच आहेत. त्यांचा कार्यकाळ २०१५ पर्यंत आहे.

  • गावाची एकूण व्याप्ती १२१५ हेक्टर आहे.

पिण्याच्या पाण्याच्या सुविधा[संपादन]

या गावात पाटबंधारे विभागाचा सिंचन तलाव आहे. शिवाय पैनंगगा नदीसुद्धा आहे. गावात चार सार्वजनिक विहिरी आहेत. त्यामुळे गावामध्ये अजिबात पाणीटंचाई नाही. राज्य शासनाची पाणीपुरवठा योजना आहे. त्या अंतर्गत संपूर्ण गावांमध्ये नळजोडणी केली गेलेली आहे; पण बहुतांश कुटुंबांकडे स्वतःचे हापशे, कूपनलिका आहेत. शिवाय ग्रामपंचायतीचे दोन हापशे आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत नळ योजना बंद आहे.

शैक्षणिक सुविधा[संपादन]

  • जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा करडा. इयत्ता पहिले ते चौथी. स्थापना सन १९३३.
  • ज्ञानेश्वर विद्यालय करडा. इयत्ता पाचवी ते दहावी. स्थापना सन १९९१. संस्था अध्यक्ष : वामनराव कि. देशमुख. सचिव : अशोकराव आ. देशमुख.
  • अप्पास्वामी कृषी विद्यालय, करडा.
  • शेतीतंत्रज्ञान महाविद्यालय, करडा

स्वरानंत रेडिओ केंद्र[संपादन]

माजी खासदार अनंतराव देशमुख यांच्या पुढाकाराने येथे स्वरानंत एफएम रेडिओ केंद्र सुरू झाले आहे. वाशीम जिल्ह्यासह बुलडाणा, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातील काही भागात त्याच्या कार्यक्रमाचे प्रक्षेपण केले जाते.

कृषी विज्ञान केंद्र करडा[संपादन]

या ठिकाणी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते शिवाय शेतीसंबंधी संशोधनही केले जाते. माजी खासदार अनंतराव देशमुख यांच्या पुढाकाराने सुविदे फाउंडेशनच्या अंतर्गत केंद्र सरकारच्या वतीने ते चालविले जाते.

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]