ओंकारेश्वर (पुणे)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ओंकारेश्वर पुणे या पानावरून पुनर्निर्देशित)
ओंकारेश्वर मंदिर,पुणे

ओंकारेश्वर मंदिर हे पुण्यातील शंकराचे एक पेशवेकालीन मंदिर आहे.

नक्षीकामाचे नऊ कळस, महर्षी व्यासांचे शिल्प, हाताची घडी घातलेले आणि डोक्यावर पगडी असलेले दत्तगुरूंचे शिल्प, अंतर्गत प्रदक्षिणामार्ग अशी आगळी वेगळी वैशिष्ट्ये असलेले पेशवेकालीन ओेंकारेश्वर मंदिर सोमवारी २ जुलै २०१२ रोजी आपल्या स्थापनेची २७४ वर्षे पूर्ण करीत आहे. नर्मदेवरून आणलेल्या बाणाची शिवलिंगाच्या तांबड्या पाषाणाच्या साळुंखेमध्ये प्रतिष्ठापना झाली तो आषाढ शुद्ध त्रयोदशीचा दिवस होता. हा योग साधून हे पेशवेकालीन मंदिर २७५ व्या वर्षांत पदार्पण करीत आहे.

स्थापना[संपादन]

पेशव्यांनी ऑक्टोबर १७३६ मध्ये या मंदिराच्या पायाभरणीचा कार्यक्रम केला आणि पुढील वर्षी आषाढ शुद्ध त्रयोदशीच्या मुहूर्तावर शिवलिंगाची स्थापना करण्यात आली. ‘गाय उतारी शिवालया करविले' असा त्याचा पेशवे दप्तरामध्ये उल्लेख आहे. अवघा खर्च पेशव्यांनी केला. कामकाजाचे पौरोहित्य चित्रावशास्त्री यांनी केले, असेही पेशवे दप्तरामध्ये नमूद केले आहे. पेशव्यांतर्फे ओंकारेश्वराला दरवर्षी १३५० रुपये अधिक साडेसात रुपये इतके अनुदान दिले जात होते. याखेरीज महाशिवरात्रीला एक हजार रुपये स्वतंत्र दिले जात असत. त्याकाळी सोने १५ रुपये तोळा होते. यावरून या अनुदानाची रक्कम किती असावी याचा अंदाज येतो.

स्थापत्य[संपादन]

मुठा नदीच्या काठावर प्रशस्त आवार असलेल्या या मंदिराला नऊ कळस आहेत. अन्य मंदिरांमध्ये कीर्तिमुख उंबरठ्यात असतो. ओंकारेश्वर मंदिरामध्ये मात्र, कीर्तिमुख कळसामध्ये आहे. मधल्या कळसामध्ये असलेल्या मोकळ्या जागेला तालीम असे म्हटले जाते. स्वातंत्र्य लढ्यात येथे गुप्त बैठका होत असत. महर्षी व्यास, दत्तगुरू, दोन सिंह आणि चार साधूंची शिल्पे कळसामध्ये आहेत. पानशेत पुरामध्ये या साधूंच्या दाढीपर्यंत पाणी आले होते. तसेच मंदिरासमोरील नंदी आणि दीपमाळ पुराच्या पाण्याबरोबर वाहून गेले. हा नंदी नंतर पुन्हा आणून बसविण्यात आला. यामध्ये नंदीचे शिंग तुटले असून कालांतराने ते शिंग फायबरचे बसविण्यात आले आहे. वैशाखामध्ये चंदनाची पूजा आणि शंकराची बसलेली मूर्ती साकारली जाते. तर, गुढीपाडवा, दिवाळी आणि वसंत पंचमी या सणांना पेशवेकाळापासूनचा मुखवटा आणि पोषाख परिधान करून देवाला सजविले जाते.

१९७० पर्यंत ओंकारेश्वर परिसरात स्मशान होते. अजूनही तेराव्याला दीपदान करून सुतक पूर्ण करण्याच्या प्रथेचे पालन केले जाते. पुलाच्या उभारणीमुळे स्मशानाचे स्थलांतर झाल्यानंतर ओंकारेश्वराच्या दर्शनासाठी गर्दी वाढू लागली.