Jump to content

अप्पा बळवंत चौक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(आप्पा बळवंत चौक या पानावरून पुनर्निर्देशित)

अप्पा बळवंत चौक हा महाराष्ट्राच्या पुणे शहरातील एक मध्यवर्ती भाग आहे.

हा भाग एबीसी म्हणूनही ओळखला जातो . पुस्तकांची आणि इतर गोष्टींची दुकाने , ग्रामदेवता जोगेश्वरी मंदिर व दगडूशेठ गणपती मंदिर , हुजूरपागा व नू.म.वि. या शाळा , प्रभात-रतन-वसंत ही चित्रपटगृहे , अनेक महत्त्वाचे रस्ते या चौकाजवळ असल्याने हा भाग सतत रहदारीचा व गजबजलेला असतो.

अप्पा बळवंत म्हणजेच 'कृष्णाजी बळवंत मेहेंदळे' . त्यांचे वडील बळवंतराव गणपत मेहेंदळे हे पेशव्यांचे एक प्रमुख सेनापती होते . अत्यंत कुशल लढवय्ये असणाऱ्या बळवंतरावांनी त्यांच्या कारकीर्दीत पराक्रम गाजविला होता . पण दुर्दैवाने ते १७६० मध्ये पानिपत रणसंग्रामात मरण पावले . अब्दालीने त्यांचे शिर सदाशिवभाऊंना भेट म्हणून पाठवले होते . त्यांची पत्नीही तिथे सती गेल्या . तेव्हा या अवघ्या बारा वर्षांच्या अल्पवयीन कृष्णाजी उर्फ अप्पांची जबाबदारी पेशव्यांनी घेतली .

                एके दिवशी सवाई माधवराव पेशवे पर्वतीहून शनिवारवाड्याकडे हत्तीवरून परतत होते . त्यांच्याबरोबर त्यावेळेस अंबारीत अप्पा बळवंत हे देखील होते . त्यावेळेस येताना पेशवे यांना भोवळ आली . आणि सवाई माधवराव पेशवे खाली पडणार तोच मागे बसलेल्या अप्पा बळवंतांनी प्रसंगावधान दाखवून त्यांना सावरले , या अपघातातून वाचविले . पेशवे खाली पडले असते तर मोठा अनर्थ झाला असता . आपल्यावरील संकट टळले म्हणून हा प्रसंग जेथे घडला , ती जागा अप्पा बळवंतांच्या नावाने ओळखली जाईल , असे सवाई माधवराव पेशवे यांनी जाहीर केले . तर ही आहे या चौकाच्या नावामागची आख्यायिका . १७९८ मध्ये अप्पा बळवंतांचे निधन झाले .
 पुढे याच चौकात म्हणजे आत्ताच्या किबे लक्ष्मी थिएटर समोर सरदार बळवंत मेहेंदळ्यांनी इ.स. १७६१ च्या आधी ३ मजली ४ चौकी असा भव्य वाडा उभारला होता असे कळते . या वाड्यातील एक भुयार थेट शनिवारवाड्यापर्यंत होते . काही गुप्त बैठका घ्यायच्या असतील तर पेशवे या भुयारातून मेहेंदळ्यांकडे येत . भारत इतिहास संशोधन मंडळाची स्थापना याच वाड्यात आषाढ शुद्ध प्रतिपदा शके १८३२ म्हणजे ७ जुलै १९१० रोजी झाली . याप्रसंगी सरदार खंडेराव चिंतामण मेहेंदळे व विश्वनाथ काशिनाथ राजवाडे हे दोघेच उपस्थित होते . काळाच्या ओघात येथे रस्ता रुंदीकरणात त्यांच्या वाड्याचा जवळपास सगळाच भाग त्यात गेला . परंतु आज अप्पा बळवंत हे नाव मात्र चौकाच्या निमित्ताने राहिले आहे .