अर्चना (जन्म नाव सुधा) ही एक भारतीय अभिनेत्री आणि कुचीपुडी आणि कथ्थक नृत्यांगना आहे, जी तेलुगू, तमिळ, मल्याळम आणि कन्नड चित्रपटांमधील तिच्या कामांसाठी ओळखली जाते. तिच्या अभिनयासाठी भारतीय चित्रपटसृष्टीतील एक महान अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. तिला दोन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले आहेत.[१][२]
१९८० च्या दशकात, अर्चनाने तिच्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात विविध छोट्या भूमिकांनी केली, सुरुवातीला तमिळ आणि तेलगू चित्रपटांमध्ये. तमिळ मधील थाई पोंगल (१९८०), थुनिव्ह थोझान (१९८०) आणि तेलुगू मधील मधुरा गीतम (१९८१) हे तिचे सुरुवातीचे काही चित्रपट होते ज्यात ती छोट्या भुमीकांमध्ये दिसली होती.
१९८६ च्या तेलुगू चित्रपट निरीक्षणा मध्ये ती एका आदिवासी महिलेची भूमिका साकारते जी भानू चंदरने साकारलेल्या वन अधिकाऱ्याच्या प्रेमात पडते. एका पोलिस अधिकाऱ्याला चुकून मारल्याबद्दल चंदरला जन्मठेपेची शिक्षा होते. पण अर्चना त्याचे प्रेम परत येण्याची वाट पाहते. या चित्रपटासाठी तिला नंदी स्पेशल ज्युरी पुरस्कार मिळाला.[३] तमिळ चित्रपट वीडू (म्हणजे घर) मध्ये अर्चना एका अविवाहित तरुणीची भूमिका साकारते, जी स्वतःसाठी, तिच्या धाकट्या बहिणीसाठी आणि वृद्ध आजोबांसाठी घर बांधण्याची योजना आखते. बऱ्याच नोकरशाहीच्या संघर्षानंतर, कामगार आणि कंत्राटदारांचे व्यवस्थापन केल्यानंतर, नैसर्गिक आणि वैयक्तिक समस्यांनंतर, ती बांधकाम पूर्ण करू शकते. पण अखेर दुसऱ्या सरकारी संस्थेने ती जमीन त्यांची असल्याचा दावा केला. या अभिनयासाठी तिला राष्ट्रीय सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.[४] या चित्रपटासाठी तिला दक्षिण - तमिळ फिल्मफेर पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला. पुढच्या वर्षी लगेचच, तिला दासी या तेलुगू चित्रपटासाठी तोच पुरस्कार मिळाला. तिने १९२० च्या दशकात एका गुलाम महिलेची भूमिका साकारली होती, जिला घरातील सर्व कामे करावी लागतात तसेच ती ज्या कुटुंबात काम करते त्या कुटुंबातील पुरुष आणि पाहुण्यांच्या लैंगिक इच्छा पूर्ण कराव्या लागतात.[५][६]
२०२२ ते २०२३ अर्चनाने मीनाक्षी पोननुंगा (अर्थ - मीनाक्षीच्या मुली) या झी तमिळवरील टीव्ही मालिकेत मीनाक्षीची मुख्य भूमिका साकारली. ही तिची पहिली दूरदर्शन मालिका होती. पण तिला कार्यक्रमाचा आशय आवडला नाही आणि म्हणूनच एप्रिल २०२३ मध्ये तिने मालिका सोडली आणि तिच्या जागी अभिनेत्री श्रीरंजनी आली.[९]