ओंड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातल्या सातारा जिल्ह्याच्या कराड तालुक्यातील एक गाव आहे.

स्थान[संपादन]

कऱ्हाड शहराच्या दक्षिणेला १६ किमी अंतरावर दक्षिण मांड नदीच्या तीरावर ओंड हे गाव वसले आहे. कराड-रत्‍नागिरी राज्य महामार्ग क्र. ८४ वर हे गाव आहे. ओंडच्या पूर्वेला नांदगाव (१ कि.मी.), पश्चिमेला उंडाळे (३ कि.मी.), दक्षिणेला मनु/मनव (२ कि.मी.) आणि उत्तरेला ओंडोशी (२ कि.मी.) ही गावे आहेत.

विस्तार[संपादन]

ओंड या गावाचा विस्तार पूर्व-पश्चिम २ किमी आणि दक्षिणोत्तर ३ किमी असा आहे.

कसे जाल[संपादन]

कऱ्हाडहून शेडगेवाडी, येवती, भुरभुशी, येळगाव, उंडाळे या एस.टी. बसेस ओंडला जाण्यासाठी उपयोगी आहेत. तसेच खासगी वाहतूक ही मोठ्या प्रमाणात आहे. त्याच बरोबर कराड तालुक्यातील महत्त्वाची बाजारपेठ असल्याने अनेक वाहने ओंडला जाण्यासाठी उपलब्ध होतात.

भौगोलिक महत्त्व[संपादन]

ओंड हे दक्षिण मांड नदीच्या काठावर वसलेले गाव आहे. परंतु दक्षिण मांड ही हंगामी पाणी असलेली नदी असल्याने त्या नदीचा शेतीसाठी फारसा उपयोग होत नाही. ओंड गावाच्या तीन बाजूला डोंगर आहे. ओंड गावात खडी, काठी, मळा, शिव, कुंभारकी, न्हावकी, म्हरपडी, बेलाचे माळ, शिलंगणाचे माळ, शिपिच लवान, बादा, गावंधर, मोरयाचे तळे, गोंधळ झरा अशा नावाच्या शेत जमिनी आहेत. गावाच्या शेत जमिनीपैकी अर्धा भाग (मळा) विहीर बागायत आहे[ संदर्भ हवा ]. बाकीचा भाग जिरायत असून पावसाच्या पाण्यावर तेथील शेती अवलंबून आहे. अलीकडे येवती बंधाऱ्यातून रब्बी पिकासाठी एक किंवा दोन वेळा पाणी सोडले जाते.

ऐतिहासिक महत्त्व[संपादन]

"ओम" पासून ओंड या शब्दाची निर्मिती झाली आहे अशी वदंता आहे[ संदर्भ हवा ]. पूर्वी येथे जैन धर्मीय लोकांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती अशी आख्यायिका सांगितली जाते. त्यावेळची दिवान विहीर आजही अस्तित्वात आहे. त्याला भुयारी मार्गही आहे. भुयारी मार्गाला पायऱ्या असून एका वेळेस सात-आठ व्यक्ती आत उतरू शकतात. भारताचे पहिले गृहमंत्री पंडित गोविंद वल्लभ पंत यांचे मूळ गाव ओंड होय[ संदर्भ हवा ]. आजही ओंडमध्ये त्यांच्या नावाने एक माध्यमिक विद्यालय आहे. पंडित गोविंद वल्लभ पंत हे महात्मा गांधींचे चिटणीस होते. तसेच ते उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्रीही होते.

ओंडचे सरपंच सध्या श्री. बी. टी. थोरात सर हे आहेत. (इ.स. २०१६)

वैशिष्ट्य[संपादन]

महाराष्ट्रात सर्वप्रथम लोकशाही पद्धतीने दारुबंदी ओंड या गावात झाली. गावात असणारा बिअर बार बंद करण्यासाठी महिला आणि युवकांच्या पुढाकाराने मोठे आंदोलन उभे राहिले. शासनाने त्याची दखल घेऊन जिल्हा अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांचे मतदान घेतले. यासाठी उभी बाटली आणि आडवी बाटली यात झालेल्या मतदानामध्ये आडवी बाटली विक्रमी मतदानाने विजयी होवून बिअर बार बंद करण्यात आला. ओंड गावच्या महिलांनी सबंध महाराष्ट्राला दारूबंदीच्या बाबतीत एक आदर्श घालून दिला. दारूबंदीचे हे लोण नंतर संपूर्ण सातारा जिल्हा आणि महाराष्ट्रात पसरले.

ओंड हे गाव शैक्षणिक क्षेत्रात आघाडीवर असून पदवीधरांचे गाव म्हणून ओळखले जाते. वकील, प्राध्यापक, शिक्षक, इंजिनिअर, डॉक्टर, वैज्ञानिक अशा प्रकारचे अनेक मोठे लोक या गावातून घडले आहेत. गावात तीन प्राथमिक शाळा असून एक माध्यमिक विद्यालय (पंडित गोविंद वल्लभ पंत हायस्कूल) आहे. तसेच गावात पाच अंगणवाड्या आहेत. प्राथमिक शाळेमध्ये शिक्षकांच्या पगारासाठी तालुका पगार कार्यालय ओंड येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेत आहे. सदर शाळेची स्थापना ब्रिटिशांच्या राजवटीत इ.स. १८६९ साली झाली आहे.गावात सुसज्ज वाचनालय आहे.

गावाची लोकसंख्या साधारण १० हजार आहे. गावात ग्रामपंचायत असून तिची स्थापना १९४१ साली झालेली आहे. गावात दोन विविध कार्यकारी सेवा सोसायट्या आहेत. गावात कराड जनता बँक, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक, कोयना बँक या बँका आहेत. तसेच यशवंतराव मोहिते पतसंस्था, शामराव पाटील पतसंस्था,आनंदराव चव्हाण पतसंस्था , जयवंतराव भोसले पतसंस्था, प्रसाद नागरी पतसंस्था, सिद्धेश्वर नागरी पतसंस्था, मर्चंट नागरी पतसंस्था, धनसंपदा नागरी पतसंस्था कार्यरत आहेत. गावात तलाठी कार्यालय, सिटी सर्वे कार्यालय, सब पोस्ट ऑफिस आहे.

ओंड गावाचा आठवडी बाजार बुधवारी असतो. या बाजारासाठी ओंड परिसरातील १५-२० गावातून लोक येतात. बाजारात भाजीपाला, कपडे, मसाल्याचे पदार्थ, जीवनोपयोगी वस्तू, धान्ये यांची खरेदी-विक्री होते.

ओंड गावाची यात्रा माघ महिन्याच्या पहिल्या दिवशी चालू होते. ती जवळजवळ आठवडा भर चालते. ही यात्रा राघोबा देवाच्या नावाने भरते. राघोबा हे ओंड गावातील थोर संत होते. यात्रेत जनावरांचा बाजार व प्रदर्शन असते. या बाजारात मोठ्या प्रमाणावर जनावरांची खरेदी विक्री केली जाते. यात्रेत सिनेमाचे तंबू असतात. त्याद्वारे लोकांचे मनोरंजन केले जाते. मनोरंजनासाठी तमाशाचे कार्यक्रमही आयोजित केले जातात. त्याचप्रमाणे यात्रेच्या निमित्ताने कुस्त्यांचे मैदानही भरवले जाते. या मैदानात नामवंत मल्लांच्या कुस्त्या लावल्या जातात.

ओंड गावात दहा खाजगी आणि दवाखाने आणि एक सरकारी उपप्राथमिक आरोग्य केंद्र आहे. तसेच गावात जनावरांचा ही मोठा सरकारी दवाखाना आहे. गावात शासकीय टेलिफोन एक्स्चेंज आहे. गावात एअरटेल, आयडिया, बी.एस.एन.एल., व्होडाफोन या मोबाईल सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांचे टॉवर आहेत. गावात महादेव, बिरोबा, मायाक्का, कामाबाई, सुराप्पा, मारुती, जोतिबा, निनाई, विठ्ठल-रुक्मिणी, मरीआई, सती, दत्तमंदिर इ. मंदिरे आहेत. गावात सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणारी भगवा कट्टा ग्रुप, अहिल्याबाई होळकर युवक मंडळ, बिरुदेव वालूक मंडळ, सूर्योदय मंडळ, भाग्योदय मंडळ, नवभारत गणेश मंडळ, हनुमान गणेश मंडळ, जोतिलिंग गणेश मंडळ,बिरुदेव ओविकार मंडळ,शिव शंकर गणेश मंडळ इत्यादी मंडळे आहेत.

नोंदी[संपादन]