अँतोनियो ग्राम्सी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ॲन्तोनिओ ग्राम्सी या पानावरून पुनर्निर्देशित)
अँतोनियो ग्राम्सी
अ‍ॅन्तोनिओ ग्राम्सी
जन्म नाव अ‍ॅन्तोनिओ ग्राम्सी
जन्म २२ जानेवारी, इ.स. १८९१
अलेस, सार्डिनिया, इटली
मृत्यू २७ एप्रिल, इ.स. १९३७
रोम, लॅझिओ, इटली
राष्ट्रीयत्व इटली
कार्यक्षेत्र तत्त्वज्ञान, साहित्य
भाषा इटालिअन
विषय मार्क्सवाद

ॲन्तोनिओ ग्राम्सी हा इटालिअन मार्क्सवादी विचारवंत बेनितो मुसोलिनीचा समकालीन होता. मुसोलिनीच्या राजवटीत त्याला स्थानबद्ध करण्यात आले. तिथेच त्याने प्रिझन नोटबुक्स आणि मॉडर्न प्रिन्स (मॅकिआवेलीचा प्रभाव, पण इथे राजकुमाराऐवजी राजकीय पक्ष येतो) ही पुस्तके लिहिली.

तत्त्वज्ञान[संपादन]

जॉर्ज ल्युकाच याच्या बरोबरीनेच ग्राम्सी हा नवमार्क्सवादाचा उद्गाता मानला जातो. चिकित्सावादी पंथ (मानवतावादी, जाणिवांना महत्त्व) आणि संरचनावादी पंथ (शास्त्रीय पद्धतीला महत्त्व, अनेक संरचना) हे नवमार्क्सवादातील प्रमुख पंथ ग्राम्सीच्या लिखाणाधारेच उदयाला आले. पायासोबतच अधिरचनेच्याही (इमला) अभ्यासास ग्राम्सी महत्त्व देतो. कार्ल मार्क्सच्या प्रभावासोबतच ग्राम्सीच्या विचारांवर हेगेल (नागरी समाज आणि जाणीव) आणि बेनेडेट्टो क्रोस यांचा प्रभाव दिसून येतो.

धुरीणत्व[संपादन]

धुरीणत्व (हिगेमनी) ही खास ॲन्तोनिओची देणगी म्हणावी लागेल. वर्चस्व राखणाऱ्यास गटाचे विचारप्रणालीविषयक वर्चस्व म्हणजे धुरीणत्व. पारंपरिक मार्क्सवादी विचारांमध्ये राज्य हे शोषणाचे आणि बळाचे एक साधन मानले जाते. या भूमिकेत ग्राम्सीने बदल घडवून आणला. भांडवलदार वर्गाने मिळविलेली संमती ही छळा-बळाने किंवा मन वळवून मिळविलेली नसते तर शोषितांच्या परवानगीनेच मिळविलेली असते असे ग्राम्सीने दाखवून दिले. भांडवलदार संमतीचेही ‘उत्पादन’ करीत असतात असे तो म्हणतो. नागरी समाज हे धुरीणत्वाचे उगमस्थान आहे सुद्धा ग्राम्सीची धारणा नागरी समाजाच्या उदारमतवादी प्रारूपाला छेद देते. उदारमतवादी प्रारूपानुसार नागरी समाज ही स्वातंत्र्याची मोकळीक आणि शोषणरहितता असलेली जागा असते.

ग्राम्सीचे विचार मार्क्सच्या पाया आणि इमल्यात काही बदल घडवून आणतात. ग्राम्सीच्या म्हणण्यानुसार नागरी समाज हा सेंद्रियदृष्ट्या पायाशी जोडला गेलेला असल्याने पायाच त्याला आकार देत असतो. त्यामुळे उदारमतवाद्यांनी प्रक्षेपित केल्याप्रमाणे नागरी समाज कधीही तटस्थ असू शकत नाही. बदल घडवून आणावयाचा असेल तर केवळ पायाच बदलून भागणार नाही तर वर्चस्वाच्या मार्गांचा आणि साधनांचाही नायनाट करावा लागेल असे ग्राम्सी म्हणतो. श्रमिकवर्गाने प्रतिधुरीणत्वाची साधने उभारायला हवीत अशी सूचनाही तो करतो.

वर्चस्व आणि धुरीणत्व[संपादन]

ग्राम्सीने वर्चस्व आणि धुरीणत्व यांतील भेद स्पष्ट केला आहे. अधिशास्ता वर्ग कठोरपणे दुसऱ्या वर्गावर गुलामगिरी लादतो व आपले अधिशासन स्थिर करतो. अशा वेळी तेथे ‘वर्चस्व’ नांदत असते. दक्षिण आफ्रिकेत गोऱ्यांनी काळ्यांवर प्रस्थापित केलेले वर्चस्व हे या प्रकारात मोडते; मात्र जेव्हा वर्चस्व कठोरपणे व आदेशात्मक पद्धतीने न लादता चातुर्याने व सर्वसंमतीचे वातावरण निर्माण करून लादले जाते तेव्हा तेथे ‘धुरीणत्व’ असते. येथे गुलामगिरी लादली जात नाही पण अप्रत्यक्षपणे ‘संमती’ लादली जाते.

धुरीणत्वाची कार्यप्रणाली[संपादन]

तत्त्वज्ञान, नीती, कला, कायदे हे सर्वांचे म्हणून मिरवले जात असले तरी ते वरिष्ठ वर्गाचेच धुरीणत्व करतात. मंदिरे, मठ, विद्यापीठे, प्रतिष्ठाने यांचे समाजातील माहात्म्य वरिष्ठ वर्गाचे धुरीणत्व रुजविण्याची प्रक्रिया पार पाडीत असतात. सामाजिक संस्था, पुराणे, मिथके, कला, साहित्य यांच्या माध्यमातून वरिष्ठ वर्गाची मूल्ये व विचारप्रणाली सर्व समाजाची मूल्ये व विचारप्रणाली म्हणून संपृक्त स्वरूपात कार्यरत होतात. यातून ‘राजकीय समाज’ व ‘नागरी समाज’ यांत सत्ता आणि संमतीचा परस्पर सामंजस्याचा समतोल निर्माण होतो. राज्य केवळ घटनेतील नियमांच्या आदेशानुसार चालत नाही तर ते सत्ता व संमती यांतल्या समतोलाने चालते हाही विचार या संकल्पनेतून पुढे आला.

राज्यांची वर्गवारी ग्राम्सीने अपारदर्शक आणि पारदर्शक अशी केली आहे. अपारदर्शक राज्यांमध्ये नागरी समाज अस्तित्वात असतो आणि त्यामुळे राज्याचे आधार समजावून घेऊन क्रांती घडवून आणणे मुश्कील असते (उदा० ब्रिटन, अमेरिका), असे त्याला वाटते. पारदर्शक राज्यांमध्ये नागरी समाजच अस्तित्वात नसतात. त्यामुळे शोषक हे राज्याचे स्वरूप ठळकपणे दिसून येते. अशा राज्यांमध्ये क्रांती घडवून आणणे सोपे असते (उदा० रशिया). ग्राम्सी हे वर्गीकरण क्रांतीचे नियोजन करणाऱ्यांसाठी मार्गदर्शक आहे.

इमल्याचा सिद्धांत[संपादन]

ग्राम्सी हा ‘इमल्याचा सिद्धांतकर्ता’ म्हणून ओळखला जातो. पारंपरिक विचारानुसार इमला हे पायाचे प्रतिबिंब मानले जात असल्याने त्याचा खास अभ्यास केला जात नसे. ग्राम्सीच्या लिखाणामुळे इमल्याचाही गंभीर विचार सुरू झाला. इमल्याच्या दोन उपरचना असतात असे ग्राम्सी म्हणतो – पायाजवळची उपरचना म्हणजे नागरी समाज आणि दुसरी उपरचना म्हणजे ‘राज्य’. म्हणजेच नागरी समाज हा राज्य आणि पायाच्या मधोमध असतो. ग्राम्सीच्या या विचारांनी नवमार्क्सवादातील संरचनावादी पंथाचा पाया घातला.

ग्राम्सीच्या ‘भाषेत’ शोषितांच्या गटाला ‘स्थित्यंतरकारी’ (सब-आल्टर्न) अशी संज्ञा आहे. हा गट अस्तित्वात असलेल्या वर्चस्ववादी गटाला नामोहरम करू शकतो. हाच क्रांतिकारी गट असतो. लेनिनप्रमाणेच ग्राम्सीलाही श्रमिक वर्गाचा एक बौद्धिक गट असावा असे वाटते.

राजसत्ता[संपादन]

‘राजसत्ता’ ही राजनीतिक समाज आणि नागरी समाज यांच्यातील संतुलन होय असे म्हणणारा ग्राम्सी नंतर नागरी समाज आणि राज्य वास्तवात एकच आहेत अशी टिप्पणी करतो. आर्थिक संरचना आणि आपल्या बलप्रयोगासह उभ्या असलेल्या ‘राजसत्ते’च्या तंतोतंत मध्ये ‘नागरिक’ उभा आहे. थोडक्यात, राजसत्ता हे असे साधन आहे की जे नागरिकांना आर्थिक संरचनेच्या स्वरूपात बदलत असते किंवा त्या संरचनेच्या अनुरूप बनवीत असते. प्रचार आणि अनुनय या मार्गांचे अपयश किंवा मर्यादित यश अपरिहार्यपणे बलप्रयोग हा एकच पर्याय राजसत्तेपुढे शिल्लक ठेवतात.

बुद्धिजीवीं(इन्टलेक्च्युअल्स)ची संकल्पना[संपादन]

बुद्धिजीवींचे पारंपरिक आणि जैविक असे दोन गट ग्राम्सी मानतो. पारंपरिक बुद्धिजीवी (साहित्यिक, वैज्ञानिक) कोणत्याही गटाशी निष्ठेने बांधलेले नसतात. जैविक गटातील बुद्धिजीवींची कोणत्यातरी गटाशी सेंद्रिय जवळीक असते. जैविक बुद्धिजीवी स्थित्यंतरकारी गटासाठी प्रतिवर्चस्वाची सामग्री उभारू शकतात असे ग्राम्सीला वाटे. समाजातील जो घटक वर्गीय शक्तींच्या संघर्षात मध्यस्थाचे कार्य पार पाडीत असतो त्यास ग्राम्सीने ‘बुद्धिजीवी’ म्हटले. हा सजग घटक समाजातील तणाव कमी करीत असतो.

ऐतिहासिक खंडा(हिस्टॉरिकल ब्लॉक)ची संकल्पना[संपादन]

क्रांतिकार्याला योग्य अशी पार्श्वभूमी तयार करण्यासाठी व्यक्तिनिष्ठ आणि वस्तुनिष्ठ प्रेरणा एकत्र येतात तेव्हा ऐतिहासिक खंड तयार होतो. हे पाया आणि इमल्याचे सहकार्य असते. तसेच ही भौतिकवादी आणि तत्त्ववादी बळांची युती असते. इतिहास घडण्याचा हा काळ असतो, असे ग्राम्सी म्हणतो.

प्रॅक्सिस ही कार्ल मार्क्सने सर्जक कृतीसाठी वापरलेली संज्ञाही ॲन्तोनिओ वापरतो. ‘स्थानयुद्ध’ (वॉर ऑफ पोझिशन) ही त्याची आणखी एक संकल्पना.