भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, महाड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक
सर्वसाधारण माहिती
प्रकार राष्ट्रीय स्मारक, संग्रहालय
ठिकाण महाड, रायगड जिल्हा, महाराष्ट्र, भारत
बांधकाम सुरुवात १४ एप्रिल १९९८
पूर्ण १० ऑगस्ट २००४
मूल्य २२ कोटी रुपये
क्षेत्रफळ १०,००० चौरस फुटांपेक्षा अधिक
बांधकाम
मालकी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन
व्यवस्थापन डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी)


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक किंवा क्रांतिभूमी हे महाराष्ट्रातील महाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित असलेले एक राष्ट्रीय स्मारक आहे. आंबेडकरांनी १९२७ साली महाडमध्ये चवदार तळ्याचा सत्याग्रह आणि मनुस्मृतीचे दहन केले होते. या दोन ऐतिहासिक घटनांच्या स्मृती कायम राहाव्यात म्हणून महाराष्ट्र शासनाने चवदार तळे सौंदर्यीकरण आणि २००४ साली या राष्ट्रीय स्मारकाची उभारणी केली. सध्या हे स्मारक समाज कल्याण विभागाच्या अखत्यारीत असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) त्याची देखरेख करते. या स्मारकाची वास्तू व इतर घटक सध्या बिकट अवस्थेत आहे.[१][२][३]

इतिहास[संपादन]

आंबेडकरांनी २० मार्च १९२७ रोजी महाडमध्ये चवदार तळ्याचा सत्याग्रह केला होता, त्यांनी तळ्याचे पाणी प्राशन करून केले होते. त्यानंतर २५ डिसेंबर १९२७ रोजी मनुस्मृतीचे दहन केले. या दोन घटना समाजपरिवर्तनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरल्या आणि त्यामुळे समाज जागृत झाला होता.

युती सरकारच्या काळात १४ एप्रिल १९९८ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या हस्ते स्मारकाच्या इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले. स्मारकाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर तत्कालीन १० ऑगस्ट २००४ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले.[१]

रचना[संपादन]

सुमारे १०,००० चौरस फुटांपेक्षा अधिक जागेवर इमारतीच्या बांधकाम झाले आहे. स्मारकामध्ये भव्य असे वातानुकूलित प्रेक्षागृह, संग्रहालय व वाचनालय, तरणतलाव व ड्रेसिंग रूम, बहुउद्देशीय सभागृह (१०४६ आसन व्यवस्था) व उपाहारगृह इत्यादी विविध दालने आहेत. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पूर्णाकृती ब्रॉंझचा पुतळा व अंतर्गत रस्ते डांबरीकरण, प्रेक्षागृहांतील फर्निचर, पाणीपुरवठा व जलनिःसारण, विद्युतीकरण, पथदिवे, ट्रान्सफॉर्मर, सबस्टेशन यांचे काम करण्यात आले. या कामाला सुमारे २२ कोटी रुपये खर्च लागला.[१]

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ a b c "महाडमधील डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाची दुरवस्था". Loksatta. 2019-07-14 रोजी पाहिले.
  2. ^ "Barti~Home". barti.in. 2019-07-14 रोजी पाहिले.
  3. ^ "चवदार तळे सुशोभीकरणासाठी निधी". Loksatta. 2019-07-14 रोजी पाहिले.