विकिपीडिया:मासिक सदर/२०१९०५३०

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

२०१९ क्रिकेट विश्वचषक (अधिकृतपणे आय.सी.सी क्रिकेट विश्वचषक २०१९) ही जागतिक क्रिकेट स्पर्धा क्रिकेट विश्वचषकातील १२वी स्पर्धा इंग्लंड आणि वेल्समध्ये ३० मे ते १४ जुलै २०१९ दरम्यान खेळण्यात येईल. याआधी इंग्लंड आणि वेल्सकडे १९७५, १९७९, १९८३ आणि १९९९ मध्ये या स्पर्धेचे यजमानपद होते. ऑस्ट्रेलिया विद्यमान जेते आहेत.

या स्पर्धेचे यजमानपद इ.स. २००६ मध्ये इंग्लंडला देण्यात आले. पहिला सामना द ओव्हलवर तर अंतिम सामना ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर होईल.

विश्वचषक स्पर्धेच्या या आवृत्तीमध्ये स्पर्धेच्या स्वरुपात बदल करण्यात आले. २०११ आणि २०१५ मधील विश्वचषक स्पर्धांमध्ये १४ संघ पात्र ठरले होते, ज्यांमध्ये घट होऊन २०१९च्या विश्वचषक स्पर्धेमध्ये दहाच संघांना स्थान मिळाले. यजमान, इंग्लंड आणि ३० सप्टेंबर २०१७ पर्यंत आयसीसी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय रँकिंगमधील अन्य पहिले सात संघ हे आपोआप पात्र ठरले, तर उर्वरित दोन स्थानांसाठी २०१८ क्रिकेट विश्वचषक पात्रता स्पर्धेतील दोन अव्वल संघ पात्र झाले. सर्व दहा संघ एकाच गटात असून प्रत्येक संघ दुसऱ्या संघाशी एक सामना खेळेल. गुणफलकातील अव्वल ४ संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. या स्वरुपाला व विशेषतः दहाच देशांचा विश्वचषकाला जगभरातून खासकरुन असोसिएट देशांकडून विरोध झाला कारण असोसिएट सदस्य देश या मोठी संधी देण्याऱ्या स्पर्धेस मुकले. पात्रतेचे निकष घोषित करताना आयसीसी असोसिएट आणि संलग्न सदस्य, ज्यांना मागील दोन विश्वचषक स्पर्धांमध्ये चार स्थानांची हमी देण्यात आली होती, त्यापैकी जास्तीत जास्त दोन संघ जर त्यांच्यापेक्षा खालील क्रमांकांच्या संघांकडून पराभूत न झाल्यास पात्र होऊ शकतात. यानुसार कसोटी क्रिकेट खेळणार्‍या १० देशांपैकी किमान दोन संघांना पात्रता स्पर्धेला तोंड द्यावे लागले, आणि विश्वचषक स्पर्धेला मुकावे लागण्याची शक्यता निर्माण झाली.

२०१७ मध्ये आय.सी.सी.ने आयर्लंड आणि अफगाणिस्तान यांना कसोटी देश घोषित करून पूर्ण सदस्यांची संख्या १० वरून १२ केली होती. त्यामुळे सगळे पूर्ण सदस्य खेळत नसलेला हा पहिलाच विश्वचषक असणार आहे तर पात्रतेतून एकही असोसिएट देश पात्र न ठरल्याने एकही असोसिएट देश खेळत नसलेला हा पहिलाच विश्वचषक आहे.

फेब्रुवारी २०१९ मध्ये पुलवामा येथे भारतीय सैन्यावर झालेल्या हल्ल्यानंतर अनेक भारतीय खेळाडू आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारत आणि पाकिस्तान यांच्यातील गट फेरीतील सामन्यावर बहिष्कार घालून, पाक संघाला स्पर्धेत खेळण्यास बंदी घालण्याची विनंती केली. परंतु दुबई येथील पत्रकार परिषदेत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) विश्वचषक स्पर्धेमध्ये पाकिस्तानवर बंदी घालण्याच्या बीसीसीआयच्या निवेदनास नकार दिला आणि दोन्ही देशांमधील सुरू असलेल्या वादानंतरही निर्धारित सामना नियोजित वेळेवरच खेळवला जाईल असे आश्वासन दिले.

पुढे वाचा... २०१९ क्रिकेट विश्वचषक