साखरशाळा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सेवांकुर साखर शाळा
विकिस्रोत
विकिस्रोत
साखरशाळा हा शब्द/शब्दसमूह
विकिस्रोत, या ऑनलाईन मुक्त मराठी ग्रंथालयात पाहा.

साखरशाळा[संपादन]

साखरशाळा म्हणजे ऊसतोडणी कामगारांच्या मुलांसाठी ऊसतोडणी होणाऱ्या भागात चालवल्या जाणाऱ्या हंगामी शाळा. महाराष्ट्रात साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला की ऊसाचे क्षेत्र असलेल्या भागात बीड, उस्मानाबाद अशा दुष्काळी क्षेत्र असलेल्या भागातून ऊस तोडणी कामगार येतात. त्यांच्या बरोबर त्यांची लहान मुलेही असतात. आपल्या गावात असताना शाळेत जाणारी ही मुले ऊस हंगामापुरती स्थलांतरित झाल्यामुळे त्यांच्या शिक्षणात खंड पडतो. ही मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी १९९४ सालापासून महाराष्ट्रातील काही भागात त्यांच्या तात्पुरत्या वस्तीवरच हंगामी शाळा सुरू करण्यात आल्या. त्यांना साखर शाळा असे नाव देण्यात आले.[१]

समस्या आणि उपाय[संपादन]

सुमारे सहा महिने शिक्षणापासून वंचित राहिल्याने ही अभ्यासात मागे पडतात. काहींची शाळा कायमची सुटते आणि मोठ्या प्रमाणावर शाळाबाह्य मुले तयार होतात. यावर उपाय म्हणून काही स्वयंसेवी संस्थांनी साखरशाळा सुरू केल्या. ऊस तोडणी कामगारांचे हे गट, ज्याला टोळी असे म्हणतात, ते ऊस तोडत पुढे पुढे सरकत असल्यामुळे एखाद्या भागात अशा शाळांचे एक जाळेच तयार करावे लागते, म्हणजे पूर्ण हंगामभर मुले शाळेचा लाभ घेऊ शकतात.आई वडील ऊस तोडणीस गेले की मोठी मुले आपली लहान भावंडे तसेच बकऱ्या, इतर गुरे यांचा सांभाळ करण्यासाठी आपल्या या हंगामी वस्तीतील घरातच राहतात. त्यामुळे त्या गावात जरी शाळा असली तरी ती शाळेत जाऊ शकत नाहीत.

या मुलांनी स्थलांतरित न होता आपल्या मूळ गावीच राहावे, यासाठी वसतिगृहे सुरू करण्याचे प्रयत्न चालू आहेत. सर्व शिक्षण अभियानाअंतर्गत या मुलांना स्थलांतर झालेल्या ठिकाणच्या स्थानिक शाळेत समाविष्ट करून घेण्याचे प्रयत्नसुद्धा सुरू आहेत.

काही साखरशाळा[संपादन]

  • पुण्यातील ज्ञान प्रबोधिनी या संस्थेने १९९२ मध्ये ऊसतोडणी कामगाराच्या मुलांसाठी साखर कारखाना परिसरात साखरशाळा सुरू केली. महाराष्ट्रातील २८ सहकारी कारखाम्यांव्या परिसरात या शाळा चालवल्या जात असत. या हंगामी शाळांच्या माध्यमातून हजारो मुलांना स्थलांतर काळात प्राथमिक शिक्षण मिळाले. हा उपक्रम १६ वर्षे ज्ञान प्रबोधिनीने राबवला.
  • इचलकरंजी येथील अनुतारा बालशिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेने १९९४ पासून कोल्हापूर परिसरातील अब्दुल लाट, शिरदवाड, घोसरवाड, कोथळी, कुरुंदवाड, शिरढोण, टाकवडे अशा विविध १२ गावांमध्ये साखर शाळा सुरू केल्या. हा उपक्रम या संस्थेने २०१३ सालापर्यंत म्हणजे २० वर्षे चालवला.
  • याच संस्थेच्या कामातून प्रेरणा घेऊन कोल्हापूर जिह्यातील अब्दुल लाट येथील विद्योदय या संस्थेने २०१६ साली अब्दुल लाट येथे साखरशाळा सुरू केली. २०१७ मध्ये परिसरातील १० ठिकाणी शाळा सुरू झाल्या. त्यांचे काम सध्या खूप उत्तम रितीने चालू आहे.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "साखर शाळेविषयी प्रशासन उदासीन". Maharashtra Times. 2020-05-13 रोजी पाहिले.