केळदी चेन्नम्मा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

केळदी चेन्नम्मा ही कर्नाटक राज्याच्या शिमोगा जिल्ह्यातील केळदी या संस्थानाची राणी होती.
चेन्नम्मा यांचा जन्म १६७१ साली झाला तर मृत्यू १६९६ साली झाला. केवळ २६ वर्षांच्या आयुष्यात या राणीने अतुलनीय असे शौर्य गाजविले.

केळदी हे राज्य आजच्या शिमोगा जिल्ह्यात होते. या राज्याची स्थापना इ.स. १४९९ साली झाली.हे राज्यकर्ते घराणे नायक घराणे या नावाने ओळखले जाई. या घराण्यातील सोमशेखर नायक या राजाशी इ.स.१६६७ मध्ये चेन्नम्माचे लग्न झाले. सोमशेखर नायक हा या घराण्यातील दहावा राजा होता. त्याचे राज्यकारभाराकडे नीट लक्ष नव्हते. या लग्नानंतर दहा वर्षांनी इ.स. १६७७ मध्ये विरोधी सरदारांनी सोमशेखर नायक याचा खून केला, पण त्यांना राज्य ताब्यात घेणे जमले नाही. राणी चेन्नम्मा सत्तेवर आली. सत्तेवर येताच तिने विरोधी सरदारांचा बंदोबस्त केला. कांही स्थानिक मांडलिक राजे वेगळे राज्य स्थापन करण्याच्या बेतात होते, त्यांचाही चेन्नम्माने बंदोबस्त केला. राणीला मूलबाळ नव्हते.तिने आपल्या जवळच्या नात्यातील बसवप्पा नायक याला दत्तक घेतले.

केळदी चेन्नम्माचे मोगल बादशाह औरंगजेब याच्याशी झालेले युद्ध ही ऐतिहासिकदृष्ट्या एक महत्त्वाची घटना आहे. औरंगजेब याने छत्रपती संभाजी महाराज यांचा क्रूर पद्धतीने खून केला होता. छ. संभाजी महाराज यांच्यानंतर त्यांचे धाकटे बंधू राजाराम महाराज इ.स.१६८९ मध्ये छत्रपती झाले. महाराज रायगड येथे असताना औरंगजेबाच्या मोठ्या फौजेने रायगडाला वेढा घातला. धोका ओळखून महाराणी येसूबाई यांनी छ. राजाराम महाराज यांना प्रतापगडला पाठवले. तेथून तमिळनाडुतील जिंजी येथे जाताना वाटेत ते केळदी राज्यात थांबले.राणी चेन्नम्माने छ. राजाराम महाराजांचे स्वागत केले. महाराजांनी तिला सगळ्या घटना सांगून जिंजीला जात असल्याचे सांगितले. महाराज केळदी राज्यात चेन्नमाचा अतिथी आहेत हे कळताच औरंगजेबाने महाराजांना ताब्यात देण्याचा निरोप राणीकडे पाठवला. चेन्नाम्माने नकार देताच चिडलेल्या औरंगजेबाने केळदीवर आक्रमण केले. चेन्नम्मा आणि औरंगजेब यांच्या सैन्यात घनघोर युद्ध झाले.

या युद्धात चेन्नम्माने औरंगजेबाचा पराभव केला असे कन्नड साधने व लोक गीते म्हणतात, तर पोर्तुगीज साधने म्हणतात की औरंगजेबाने चेन्नामाचा पराभव केला. राणी औरंगजेबाला घाबरली नाही, आणि तिने छ. राजाराम महाराज यांच्याशी दगा फटका केला नाही. दरम्यान छ. राजाराम महाराज आपल्या आणि चेन्नम्माच्या निवडक सैनिकांसह सुरक्षितपणे जिंजीला पोहोचले. राणी चेन्नम्माचा एक मांडलिक राजा सदाशिव याने महाराजांना आर्थिक मदत केली.
[१]

त्यानंतर मात्र या धोरणी राणीने औरंगजेबाबरोबर फार काळ लढणे आपल्याला जमणार नाही हे ओळखून त्याच्याशी तह केला.

संदर्भ[संपादन]

  1. ^ http://www.loksatta.com/lokbhramanti-news/chinamma-temple-in-karnataka-1316689/lite/