पंचधारा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


भाषावार प्रांत रचनेनंतर हैद्राबाद संस्थानातील मराठी समाजाचे अस्तित्व एक प्रकारे धोक्यात आले. तेलुगू समाजाचे बाहुल्य, उर्दू भाषेचा आणि हिंदी भाषेचा वाढता प्रभाव यामुळे मराठी समाजाची स्वतंत्र ओळख टिकविण्याची गरज तेथील मराठी विचारवंतांच्या लक्षात आली. या गरजेतून आणि ध्यासातून आंध्र प्रदेश मराठी साहित्य परिषद आणि तिचे मुखपत्र त्रैमासिक पंचधाराचा उदय झाला. (१९५८) कै. श्री. रं.कुलकर्णी, भा.शं.कहाळेकर, रा.ब.माढेकर या संस्थापक संपादक त्रयीने भाषा-साहित्याच्या आदान प्रदानाचे अंतर्भारतीय धोरण पंचधारेच्या पहिल्या अंकापासूनच निर्धारित केले. यामध्ये पुढे संपादक द.पं.जोशी यांनी भर घातली. त्यांना अनंत अरगडे, नलिनी साधले, डॉ.पद्माकर दादेगावकर इत्यादींचे मोलाचे सहकार्य लाभले. पंचाधाराचे विशेषांक संपादकांच्या दृष्टीची यथार्थ कल्पना देणारे आहेत. साहित्य, भाषा, अनुवाद, तत्त्वज्ञान, इतिहास, संस्कृती, ललितकला इ. विषयांना यथोचित स्थान पंचाधारेत मिळालेले आहे असे दिसते. उत्तर आधुनिकतावाद, गजानन माधव मुक्तिबोध, प्रेमचंद, कुमार गंधर्व, वा.वि. मिराशी, नरहर कुरुंदकर, गालिब, दक्षिण भारतीय साहित्यातील समकालीन प्रवाह, मिथक-पुराणकथा, हैद्राबाद मुक्ती, भारतीय साहित्य कल्पना. दक्षिणी भाषा शब्दकोश, नृत्य-नाट्य- शिल्प इत्यादी विषयांवर पंचाधारेचे विशेषांक आहेत. स्त्रीवाद आणि स्त्रीमुक्ती चळवळीबद्दल तीन विशेषांक आहेत. दक्षिणेतील स्त्री साहित्यावर एक अंक आहे. तेलुगू, कन्नड, उर्दू, हिंदी भाषांमधील सुमारे अकरा कादंबऱ्यांचे अनुवाद यातून प्रकाशित झाले आहेत.

संदर्भ[संपादन]

अष्टावधानी संपादक, लेखक- धनंजय कुलकर्णी, रविवार, १५ जानेवारी २०१२ महाराष्ट्र टाइम्स संवाद