लोकवनस्पतिविज्ञान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लोकवनस्पतिविज्ञान, किंवा जनजातिवनस्पति विज्ञान अर्थात Ethnobotany म्हणजे आदिम समाजाजवळ परंपरेने चालत आलेला वनस्पतिविषयक ज्ञानाचा ठेवा होय. देवराया व लोकवनस्पति विज्ञान यांचा परस्परसंबंध अतूट आहे. आदिम समाजाची नाळ जंगलांशी बांधलेली असते. त्यांना जंगलातील सामान्य वनस्पतींची जाण असते आणि जंगली खाद्यवनस्पती, बहुमोल औषधी अशा काही अत्यंत गुणी वनस्पतीचे गुपितही माहीत असते.

आंध्र प्रदेशातील आदिवासी समाजातील एका वृद्धेने वन्य तांदुळांच्या अनेक वाणांची जपणूक मोठ्या आस्थेन्र केली आहे. सर्पगंधा ही आधुनिक वैद्यकशास्त्राने उच्च रक्तदाबावरील उपाय म्हणून मान्यता दिलेली औषधीसुद्धा आदिम समाजातील परंपरागत ज्ञानाचेच योगदान आहे. केरळमधून जगविख्यात झालेली, थकवा-ताण नाहीसा करणारी ‘जीवनी‘ ही वनस्पतीसुद्धा आदिवासी समाजाचीच ‘देन‘ आहे.

भविष्यात अशा कित्येक वनस्पती जनकल्याणासाठी वापरता येतील. पण सुशिक्षित समाजाला हे ज्ञान नसल्याने, केवळ जनजातिविज्ञानच हे जाणून घेण्यास मदत करील. म्हणूनच सुधारित समाज आणि रानावनात नांदणारे आदिवासी यांना जोडणारा सेतू म्हणजे लोकवनस्पतीविज्ञान - एथ्नो-बॉटनी. भारतात डॉ. जानकी अमल या विदुषीने या शास्त्रशाखेची पायाभरणी केली. महाराष्ट्रात याची मुहूर्तमेढ रोवण्याचा मान डॉ. वा.द. वर्तकांचा.

वनस्पती शास्त्राच्या या शाखेला निसर्ग संरक्षणासाठी अनन्यसाधारण महत्त्व आहे. महाराष्ट्रातले डॉ. वर्तक हे त्यांचे आद्य पुरस्कर्ते.

हेसुद्धा पाहा[संपादन]