विदिता वैद्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डॉ. विदिता अजित वैद्य (१५ नोव्हेंबर, इ.स. १९७० - ) या एक मराठी शास्त्रज्ञ आहेत. त्या मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेन्टल रिसर्च या संस्थेत मज्जातंतुविज्ञान (न्युरोसायन्स) आणि मोलेक्युलर सायकियाट्री या विषयांवर संशोधन करतात. या संसंथेत त्या मार्च २००० मध्ये लागल्या.

विदिता वैद्य या इंडियन ॲकॅडमी ऑफ़ सायन्सेसच्या असोशिएट आहेत.

शिक्षण[संपादन]

विदिता वैद्य यांनी आधी मुंबईतील सेन्ट झेव्हियर कॉलेजातून जीवशास्त्र आणि जैवरसायन शास्त्रात पदवी प्राप्त केली आणि नंतर त्‍यांनी अमेरिकेतील येल विद्यापीठातून मज्जातंतूविज्ञान (न्युरोसायन्स) डॉक्टरेट केली. त्यानंतर स्वीडन आणि इंग्लंड येथे अनुक्रमे कॅरोलिन्स्का इन्स्टट्यूट आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये संशोधनकार्य केल्यानंतर त्या मुंबईला परतल्या आणि मुंबईतील टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या जैविक विज्ञान विभागात काम करू लागल्या.

विदिता वैद्य यांचे संशोधन[संपादन]

नैराश्यासारख्या तणावाशी संबंधित विकारांत व्यक्तिगत कमकुवतपणातील फरकाचा काय परिणाम होतो? सातत्याने बदलणाऱ्या वर्तणुकीला पेशीसंबंधित, रेणूपातळीवरील आणि जनुकीय पातळीवर कोणते बदल कारणीभूत असतात? आयुष्याच्या प्रारंभिक काळातील घटनांमुळे निर्माण झालेले ताणतणाव पुढे मानसिक विकारांच्या वाढीला कसे कारणीभूत ठरतात? आदी प्रश्नांचा शोध डॉ. वैद्य यांनी प्राण्यांवरील विविध प्रयोगांतून घेतला आहे. उंदरांची जन्मदात्यांशी प्रारंभिक ताटातूट, जन्मानंतरची पिल्लांची त्वरित हाताळणी तसेच औषधांचा वापर यातून तणाव आणि मूड संबंधित वर्तणुकीवर आयुष्यभरासाठी होणारे परिणाम कोणते असतात, यांचा त्यांनी अभ्यास केला आहे.

अल्प प्रमाणातील तणाव माणसाच्या प्रगतीला, त्याच्यातील सृजनशीलतेला प्रोत्साहक असला तरी त्याचे अतिरिक्त प्रमाण गंभीर नुकसान करू शकते आणि माणूस नैराश्याच्या काळोखात लोटला जाऊ शकतो. नैराश्याच्या जगात पोचलेला माणूस जीवनाबद्दल हताश, आयुष्याबाबत निराश आणि मानसिक पातळीवर अशांत होतो आणि त्याचे रूपांतर गंभीर रुग्णात होते, असे विदिता वैद्य यांचे आकलन आहे.

विदिता वैद्य यांना मिळालेले पुरस्कार[संपादन]