हबीब जालिब

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हबीब जालिब (उर्दू : حبیب جالب) (जन्म :२४ मार्च १९२८; - १३ मार्च १९९३) हे पाकिस्तानी क्रांतिकारी कवी होते. जालिब हे त्यांचे टोपणनाव (तखल्लुस). या शब्दाचा अर्थ स्वतःकडे आकर्षून घेणारा असा होतो. ते डाव्या विचारसरणीचे कार्यकर्ते व कट्टर प्रजासत्ताकवादी राजकीय कवी होते. त्यांनी लष्करी कायदा, हुकूमशाही व राजकीय दडपशाहीचा कडाडून विरोध केला.

प्रारंभिक जीवन[संपादन]

हबीब जालिब २४ मार्च, १९२८ रोजी ब्रिटिश भारतातील पंजाबमधील होशियापूर प्रांतात, मियानी अफगानाँं या गावात जन्मले, व त्यांचे नाव "हबीब अहमद" ठेवण्यात आले. वडिलांचे नाव सुफी उनायत उल्लाह खान. हबीब यांचे बालपण गावातच गेले. दुसऱ्या महायुद्धानंतर वडील त्यांना घेऊन दिल्लीत आले आणि तेथे हबीब यांना अँग्लो उर्दूू अरेबिक स्कूलमध्ये सातव्या इयत्तेत दाखल केले.

हबीब यांना अभ्यासापेक्षा काव्यातच अधिक रस होता. इ.स. १९४१ पासून त्यांनी काव्यलेखनाला सुरुवात केली. त्यांच्या सुरुवातीच्या काव्यावर जिगर मुरादाबादी यांच्या काव्याची छाप होती. पुढे त्यांचे काव्य समाजवादी विचारसरणीकडे झुकले.

पाकिस्तान[संपादन]

भारताच्या फाळणीनंतर हबीब जालिब यांनी पाकिस्तानमध्ये स्थलांतर केले. त्यावेळी ते कराचीमधील दैनिक इमरोज़च्या कार्यालयात मुद्रितशोधक म्हणून काम करत. ते पुरोगामी लेखक होते. त्यांचे उत्साहवर्धक काव्यगायन ऐकायला बरेच श्रोते जमत. साधी शैली अंगीकारून, ते सोप्या भाषेत लिखाण करायचे, व जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडायचे. सभांमध्ये प्रेक्षकांच्यात अस्वस्थता निर्माण करण्यात यशस्वी होण्यामागे त्यांच्या सामाजिक व राजनैतिक जाणिवा, त्यांच्या शब्दांतली तळमळ, त्यांच्या आवाजातले संगीत व त्यांची भावनिक ऊर्जा ह्यांची सांगड जबाबदार होती.

राजकीय हुकूमशाहीला बेधडक आव्हान[संपादन]

फ़ैज़, फ़राज़ सारख्या पाकिस्तानी शायरांनी प्रस्थापित सत्तांविरुद्ध आवाज उठवला, पण तो आपल्या मर्यादेत राहून. ’लेकी बोले सुने लागे’असे या प्रतिभ्यावंत शायरांचे लिखाण असे. ’रंजिश ही सहीदिल ही दुखाने के लिए आ’ किंवा ’तुम आये न शबे-इंतज़ार गुज़री है’ यांसारख्या काव्यांत राजसत्तेच्या विरोधांत गर्भितार्थ दडला आहे, हे लोकांच्या सहजासहजी लक्षात येणे कठीण. अशा परिस्थितीत निरंकुश आणि बेलगाम राजसत्तेला तुरुंगात जाण्याची भीती न बाळगता बेधडक आव्हान देणारे हबीब जालिब चौका-चौकांत उभे राहून राजकीय व्यवस्थेवर आपल्या कवितांमधून कोरडे ओढू लागले. त्यांनी गायलेल्या प्रत्येक ओळीची उपस्थितांकडून पुनरावृत्ती व्हायची. समीक्षक आपल्या काव्याला कमी दर्जाचे (कम-रुत्बा) समजतात याची जालिब यांना जाणीव होती. म्हणूनच ते म्हणतात,

जालिब’ मेरे शेर समझ में आ जाते हैं
इसीलिए कम-रुत्बा शायर कहलाता हूँ।

स्वतःची अवस्था काव्यात शब्दबद्ध करताना जालिब लिहितात :-

बडे बने थे जालिब साहब, पिटे सड़क के बीच
गाली खाई, लाठी खाई, गिरे सड़क के बीच
कभी गरेबां चाक हुआ और कभी हुआ दिल ख़ून
हमें तो यूँ ही मिले सुखन के सिले सड़क के बीच
जिस्म पे जो ज़ख्मों के निशां हैं, अपने तमग़े हैं
मिली हैं ऐसी दाद वफ़ा की किसे सड़क के बीच ।

गरेबां चाक हुआ = शर्टाची बाही फाटते आहे
सुखन के सिले = काव्याची बिदागी
तमग़े = पदके

अय्यूबखानाच्या राजवटीतील पाकिस्तानमधील फक्त वीस घराण्यांकडे सर्व राजकीय, आर्थिक आणि सामाजिक सत्ता होती; त्याबद्दलचे जालिबचे हे काव्य :-

बीस घराने हैं आबाद और करोड़ो हैं नाशाद
सद्रे अय्यूब ज़िंदाबाद
आज भी हमपर जारी है काली सदियों की बेदाद
सद्रे अय्यूब ज़िंदाबाद
बीस रुपैया मन आटा इस पर भी है सन्‍नाटा
ग़ौहर, सहगल, आमदजी बने हैं बिरला और टाटा
मुल्क के दुश्मन कहलाते हैं जब भी हम करते हैं फ़रियाद
सद्रे अय्यूब ज़िंदाबाद ।

ज़िया-उल-हक़च्या राजवटीवर लिहिताना जालिब म्हणतात :-

ज़ुल्मत को ज़िया, सरसर को सबा, बंदे को ख़ुदा, क्या लिखना
दीवार को दर, पत्थर को गुहर, जुगनू को दीया क्या लिखना

गहन काळोखाला (ज़ुल्मत को) मी झगमगता प्रकाश (ज़िया) कसे म्हणू ? वादळाला (सरसर को) पहाटेचा झुळझुळणारा वारा (सबा) म्हणून कसे चालेल ? भक्ताला परमेश्वर, भिंतीला दरवाजा कसे म्हणावे ? दगडाला मोती (गुहर)आणि काजव्याला दिव्याची उपमा कशी द्यायची?

नीलो[संपादन]

पाकिस्तानातील गाजलेली नर्तकी नीलो हिला इराणच्या राजाच्या स्वागतासाठी आपली कला सादर करण्यासाठी पाकिस्तानच्या सत्ताधाऱ्यांनी बोलावले होते; तिने नकार दिला म्हणून तिचा अतोनात छळ करण्यात आला; शेवटी तिने आत्महत्या केली. या घटनेवर जालिबने नीलो नावाचे काव्य लिहिले होते, ते इतके गाजले की पाकिस्तानात या विषयावर ज़र्का नावाचा चित्रपट निघाला.

तुरुंगवास[संपादन]

सोळा वर्षांहून अधिक काळ जालिब तुरुंगांत होते. जनरल अय्यूब खान, याह्याखान, ज़िया उल हक़, ज़ुल्फ़िक़ार अली भुट्टो या पाकिस्तानच्या प्रत्येक राज्यकर्त्याने त्यांना कारावासात टाकले. खून करण्याच्या प्रयत्‍नापासून ते राजद्रोहापर्यंतचे सर्व आरोप लावून जालिबना विविध प्रकरणांत गुंतविण्यात आले. ते कैदेत असताना त्यांचा मुलगा वैद्यकीय उपचारांअभावी मरण पावला. जालिब यांचा १९५८ साली जप्त केलेला पासपोर्ट १९८८ साली म्हणजे तीस वर्षांनी परत करण्यात आला. त्यानंतर पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाची परवानगी घेऊन लंडनला जायला निघालेल्या जालिब यांना कराची विमानतळावर परदेशी जाण्यापासून रोखण्यात आले.

कारावासात असताना रेडिओवरून लता मंगेशकर यांची गाणी ऐकून जालिब यांनी तुरुंगातले अत्याचार सहन केले, आणि त्यांतूनच आपल्याला जगण्याची प्रेरणा मिळाली असे ते नेहमी सांगत असत. हैदराबाद सिंधच्या तुरुंगात असताना ’लता’ नावाची एक मोठी कविताच त्यांनी लिहिली. जालिबची ’लता’वरील ती कविता आजही पाकिस्तानात प्रसिद्ध आहे. त्या कवितेतील काही ओळी :-
मीरा तुझ में आन बसी है
अंग वही है रंग वही है
जग में तेरे दास हैं कितने
जितने आकाश में हैं तारे
तेरे मधुर गीतों के सहारे
बीतें हैं दिन-रैन हमारे।

हबीब जालिब यांचे काव्यसंग्रह[संपादन]

  • अहदे-सज़ा
  • अहदे-सितम
  • इस शहरे-ख़राबी में
  • कुल्लियात-ए-जालिब
  • गुंबदे-बेदार
  • गोशे में क़फ़स के
  • जालिबनामा
  • ज़िक्र बहते खून का
  • बर्गे-आवारा
  • सरे-मक़तल
  • हर्फे-सरे-दर
  • हर्फे-हक़

पुरस्कार[संपादन]

जालिब यांना वारंवार तुरुंगात डांबणाऱ्या पाकिस्तान सरकारने त्यांना २००९ साली मरणोत्तर ’निशान-ए-इम्तियाज़’ या पुरस्काराने सन्मानित केले.