वर्धनगड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वर्धनगड
नाव वर्धनगड
उंची १५०० फूट
प्रकार गिरीदुर्ग
चढाईची श्रेणी सोपी
ठिकाण सातारा, महाराष्ट्र
जवळचे गाव वर्धनगड गाव,पुसेगाव
डोंगररांग सातारा फलटण
सध्याची अवस्था व्यवस्थित
स्थापना {{{स्थापना}}}


वर्धनगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. सह्याद्रीची एक रांग माणदेशातून फिरली आहे. तिचे नाव महादेव डोंगर रांग. त्या रांगेवर भांडलीकुंडल नावाचा जो फाटा आहे त्यावर कोरेगाव व खटाव तालुक्‍याच्या सीमेवर, कोरगावपासून ७ मैलांवर व साताऱ्याच्या ईशान्येस १७ मैलांवर हा किल्ला बांधलेला आहे. किल्ल्याला लागूनच असलेल्या लालगून व रामेश्वर ह्या दोन डोंगरांवरून किल्ल्यावर तोफांचा चांगला मारा करता येत असे.

इतिहास[संपादन]

५ मे १७०१ या दिवशी मोगलांनी पन्हाळा जिंकला. त्यानंतर औरंगजेबाने आपले लक्ष्य साताऱ्यातील किल्ल्यांकडे वळवले. मोगल सरदार फतेउल्लाखान याने सल्ला दिला की "बादशहांनी खटावला छावणी करावी म्हणजे पावसाळ्यात चंदन-वंदन व नांदगिरी हे किल्ले जिंकून घेता येतील. औंरगजेबाने मंजुरी दिली . दिनांक ८ जूनला फतेउल्लाखान आपल्याबरोबर काही सैन्य घेऊन खटावच्या बंदोबस्तासाठी गेला. त्याने खटावचे ठाणे जिंकले. मराठ्यांचा पराभाव झाला. यानंतर मोगलांची फौज खटावच्या ठाण्यात जमा होऊ लागली होती. आज न उद्या हे सैन्य वर्धनगडाला वेढा घालणार हे निश्‍चित होते, म्हणून वर्धनगडातील मराठ्यांनी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या वाड्यांमधील लोकांना आक्रमणाची अगाऊ कल्पना दिली होती. ज्या लोकांना शक्‍य होते त्यांनी आपल्या बायकांमुलांना किल्ल्यात नेले. नंतर वर्धनगडाच्या किल्लेदाराने आपला एक वकील फतेउल्लाखानाकडे पाठवला. त्याने सांगितले की""किल्लेदाराला प्राणाचे अभय मिळत असेल तर तो मोगलांना किल्ला दण्यास तयार आहे. फतेउल्लाखानाने विनंती ताबडतोब मान्य केले. फतेउल्लाखानाकडे वकील पाठवून किल्ला ताब्यात देण्याची बोलणी करणे हा वेळकाढूपणा होता. मोगलांचा किल्ल्यावर होणारा हल्ला पुढे ढकलणे हा त्यामागचा हेतू होता. किल्लेदाराने किल्ल्याच्या संरक्षणासाठी सैन्याची जमवाजमव करणे हा त्यामागील हेतू होता. फतेउल्लाखान किल्लेदार आज येईल उद्या येईल म्हणून वाट पहात राहिला, पण एकही मराठा सैनिक त्याच्याकडे फिरकलासुद्धा नाही. फतेउल्लाखानाला मराठ्यांचा खेळ लक्षात आला आणि त्याने १३ जून रोजी किल्ल्यावर हल्ला चढवला. त्याला मराठ्यांनी चोख प्रत्युत्तर दिले. पण यात अनेक मराठे मारले गेले; अनेकजण जखमी झाले. मोगलानी मराठ्यांच्या चाळीस लोंकाना कैद केले. मग मोगलानी किल्ल्याच्या पायथ्याच्या अनेक वाड्या जाळून टाकल्या. या लढाईत मोगलांचे पण अनेक सैनिक प्राणास मुकले. दि. १९जूनला रात्री मराठ्यांनी वर्धनगड सोडला. दि. २२ जून रोजी "मीर ए सामान ' या खात्याचा व्यवस्थापक अली रजा हा वर्धनगडातील मालमत्ता जप्त करण्यासाठी गेला. त्याने किल्ल्यातून सहाशे पंचाहत्तर मण धान्य, चाळीस मण सोरा व बंदुकीची दारू, सहा मोठ्या तोफा व जंबुरक असा माल जप्त केला. त्याच दिवशी औरंगजेबाने किल्ल्याचे नाव बदलून "सादिकगड' असे ठेवले. औरंगजेबाची पाठ फिरताच हा किल्ला मराठ्यांनी परत जिंकला आणि त्याचे सादिकगड हे नाव बदलून वर्धनगड केले.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे[संपादन]

वर्धनगड गावातूनच किल्ल्याची भक्‍क्‍कम तटबंदी दिसते. आजही किल्ल्याची तटबंदी चांगल्या स्थितीत शाबूत आहे. पायथ्याच्या वर्धनगड गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी एक प्रशस्त वाट आहे. ही वाट थेट गडाच्या प्रवेशद्वारापाशी पोहचवते. या वाटेने गडाचा दरवाजा गाठण्यास अर्धा तास लागतो. वर्धनगड गावात शिरतांना दोन तोफा आपले स्वागत करण्यासाठी मोठ्या डौलाने उभ्या आहेत. गडाचे प्रवेशद्वार हे पूर्वाभिमुख असून गोमुखी बांधणीचे आहे. आजही ते सुस्थितीत उभे आहे. राजा शिवछत्रपती परिवार, महाराष्ट्र राज्य या संस्थेने तिथे सागवानी नवीन दरवाजा बसवून प्रवेशद्वाराची व किल्ल्याची शोभा अजून वाढवली आहे. दरवाज्यापासूनच किल्ल्याची तटबंदी चालू होते तर ती संपूर्ण गडाला वळसा घालून पुन्हा दरवाजाच्या दुसऱ्या टोकाशी येऊन पोहचते. ही तटबंदी आजही चांगली शाबूत आहे.

दरवाजातून आत शिरल्यावर डावीकडेच एक ध्वजस्तंभ आहे. या ध्वजस्तंभाच्या थोडे पुढे गेल्यावर तटातून बाहेर पडण्यासाठी चोरवाट तयार केलेली आहे. दरवाज्यातून आत शिरल्यावर समोरच एक माठे टेकाड दिसते. यावर चढून जाण्यासाठी दगडाच्या बांधलेल्या पायऱ्या आहेत. या टेकाडावर चढून जातांना वाटेतच हनुमानाची भग्न दगडी मूर्ती आहे. पुढे शंकराचे छोटेसे देऊळ लागते. त्याच्याच बाजूला पिण्याच्या पाण्याचे टाके आहे. प्रवेशद्वारापासून टेकाडावर असणाऱ्या मंदिरापर्यंत पोहचण्यासाठी १५ मिनिटे पुरतात. टेकाडावर असणारे मंदिर हे गडाची अधिष्ठात्री वर्धनीमातेचे आहे. मंदिराचा जीर्णोद्धार झाला आहे. त्यामुळे रंगरंगोटी केलेले मंदिर आकर्षक दिसते. मंदिरासमोर फरसबंदी चौथरा बांधलेला आहे. मंदिराचा सभामंडप प्रशस्त आहे. वर्धनीमाता नवसाला पावत असल्यामुळे कौल लावण्यासाठी भाविकांची गर्दी चालूच असते. मंदिराच्या गाभाऱ्यात कासवाची सुंदर मूर्ती कोरलेली आहे. मंदिराच्या मागच्या बाजूने टेकाडावरून एक वाट खाली उतरते. या वाटेने खाली उतरतांना उजवीकडे पाण्याची टाकी आढळतात.

संदर्भ[संपादन]

बाहय दुवे[संपादन]