विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

साचा:ध्वनिचित्र हवे हे मराठी व्यंजनमालेधले क्रमाने २७वे येणारे व्यंजन आहे. वर्ण चिन्ह हाच याचा व्यंजनोच्चार आहे. ‘र’ हा अर्धस्वर समजला जातो.

‘र’चे वैशिष्ट्य[संपादन]

मराठी लिपीतले ’र’हे अक्षर, इंग्रजीतल्या ’i'प्रमाणे अत्यंत सडपातळ आहे. त्यामुळे या अक्षराची जोडाक्षरे निराळ्याच पद्धतीने बनतात. इतकेच काय पण, ‘र’ ला उकार लावताना अन्य व्यंजनांप्रमाणे ु, ू जोडून चालत नाही. ‘र’ सडपातळ असल्याने त्याच्यावरची शिरोरेषा फार आखूड असते. ‘र’ ला उकार लावला तर ते अक्षर वरून अरुंद आणि खालून रुंद होते. अशावेळी त्याचा दुसऱ्या अक्षराला स्पर्श होऊ नये म्हणून शिरोरेषा लांबवावी लागते, आणि मग अक्षराचा ‘तोल’ (balance) जातो. त्यामुळे ऱ्हस्व आणि दीर्घ उकारयुक्त ‘र’ अनुक्रमे ‘रु’आणि ‘रू’ असे लिहिण्याची पद्धत पडली आहे. ‘र’ ला हूकसारखा रफार लावलेला र्र, ही पुनर्रचना या शब्दात आहे. ‘रृ’ हे अक्षरसुद्धा उच्चारक्षम आहे.


उच्चारण[संपादन]

’र’ हे मूर्धन्य व्यंजन आहे. मूर्धा म्हणजे खरेतर मोठा मेंदू. (स्युर्मूर्धन्या ऋटुरषा । इति पाणिनी.) (ऋटुरषाणाम्‌ मूर्धा । इति अन्य संस्कृत व्याकरणकार). अर्थ असा की, ऋ, ॠ, ट, ठ, ड, ढ, ण, र, ष (आणि ळ) ही मुळाक्षरे मूर्धन्य आहेत. म्हणजे इंग्रजीत Retroflex, हिंदीत पूर्व तालव्य. मूर्धन्य वर्णांचे उच्चार करताना जिभेचा टाळूच्या कठीण भागाला, किंवा जवळच असलेल्या तालुशिखराला स्पर्श होतो.

इंग्रजीत ‘ट’ हा दंतमूलीय आहे, मराठी ‘ट’ च्या उच्चारापेक्षा इंग्रजी ‘T’ चा उच्चार वेगळा आहे.

लेखन[संपादन]

मराठी ‘र’ ला बाहेरून गाठ असते, हिंदी ‘र’ आतल्या गाठीचा असतो.[ चित्र हवे ]


सावरकरी ‘र’ = र्‍ा [संपादन]

हा एका चंद्रकोरीला उभी रेघ (स्वरदंड) जोडून लिहितात. टंकलेखन यंत्राच्या कळफलकावर मराठी लिपी बसवायची असेल तर उपलब्ध कळींचा वापर बचतपूर्वक व्हायला हवा, त्यासाठी स्वातंत्रवीर सावरकरांनी नेहमीच्या ‘र’ ऐवजी हा खास ‘र्‍ा’ सुचवला होता. सावरकरी र्‍ाची शक्य बाराखडी
र्‍ा् र्‍ा र्‍ाा र्‍ाि र्‍ाी र्‍ाु र्‍ाूर्‍ाृ र्‍ाॢ र्‍ाे र्‍ाॅ र्‍ाै र्‍ाो र्‍ाॉ र्‍ाौ र्‍ां र्‍ाः


शक्य समस्या:

जोडाक्षरे[संपादन]

मराठी भाषेत र लागून बनलेल्या जोडाक्षरांना रफार असेही म्हणतात. र् या व्यंजनाची जोडाक्षरे लिहिण्याच्या पाच पद्धती आहेत. ज्यात दुसऱ्या व्यंजनाचा (आखूड/अर्धा) उच्चार आधी होऊन र चे उच्चारण नंतर होते अशा जोडाक्षरांकरता प्र(श्र/ह्र) आणि ट्र हे दोन रफार प्रकार वापरले जातात.

ज्यात (आखूड/अर्ध्या) र् चे उच्चारण आधी होते आणि दुसरे व्यंजन नंतर येते त्या जोडाक्षरांचे लेखन र्प अथवा ऱ्ह/ऱ्य या प्रकारे केले जाते.


‘र’फार प्रकार १[संपादन]

उभी रेघ (स्वरदंड)(हिंदीत पाई) असणाऱ्या व्यंजनास र् जोडण्याच्या वेळी त्या उभ्या रेघेच्या डाव्या बाजूस एक बारीक तिरपी रेघ देतात. उदा० भ्रमर, ग्रहण, वज्र, आम्र, प्रकार, तीव्र, सहस्र, ह्रस्व (मराठी ऱ्हस्वचे संस्कृत/हिंदी लिखाण) वगैरे. या शब्दांत आधी व्यंजनाचा आणि मग ‘र’चा उच्चार होतो.

‘र’फार प्रकार २[संपादन]

अक्षरांना तिरप्या रेघेचा ‘र’ जोडताना जेव्हा अक्षराच्या एखाद्या अंगाचा अडथळा होतो, त्यावेळी ते जोडाक्षर एका स्वतंत्र पद्धतीने लिहिले जाते. उदा० त्‌+र=त्र. श्‌+ र=श्र. क्‌+र=त्र्क (हे जोडाक्षर ‘त्र’ला ‘क’ची उजवी वाटी जोडून लिहावयाचे असते.)

स्वराक्षरांना आणि ङ, ञ, ण, य, र, ल, ष, ळ, क्ष, आणि ज्ञ या अक्षरांना तिरप्या रेघेचा किंवा काकपादासारखा ‘र’ जोडून बनलेल्या अक्षरांचे शब्द मराठी भाषेत नाहीत.

‘र’फार प्रकार ३[संपादन]

उभी रेघ (स्वरदंड) नसलेल्या (ट, ठ, ड, ढ, छ) या व्यंजनांस ‘र्’ जोडण्याच्या वेळी त्या अक्षराच्या खाली काकपादासारखे चिन्ह वापरतात. उदा० ट्राम, ड्रायव्हर, ट्रे, राष्ट्र, ड्रॉइंग, ड्रि

ट् +र =ट्र्;; ठ् +र् = ठ्र्; ड्+र्=ड्र्; ढ्+र्=ढ्र्; छ्+र्=छ्र्. याही शब्दांत व्यंजनाच्या उच्चारानंतर ’र’चा उच्चार होतो.

‘र’फार प्रकार ४[संपादन]

र् या व्यंजनाला दुसरे अक्षर जोडताना मागल्या अक्षरावर आघात येत नसेल तर (सामान्यतः ह किंवा य जोडावयाचा असल्यास) र् ऐवजी ‘र्‍’ (चंद्रकोर) हे चिन्ह वापरतात. उदा० वऱ्हाड, कुऱ्हाड, सुऱ्या, चऱ्हाट, भाकऱ्या, दुसऱ्या, साताऱ्याची. हा प्रकार फक्त मराठीत आहे‚ हिंदी किंवा अन्य भारतीय भाषांत असे आघातरहित ऱ्य किंवा ऱ्ह नाहीत. काही व्याकरणकार ऱ्ह आणि ऱ्य या अक्षरांना जोडाक्षरे मानीत नाहीत. त्यांच्या मते, ज्याप्रमाणे “ख, छ, ठ, थ, फ” आणि “घ, झ, ढ, ध, भ” ही जोडाक्षरे नसून ते अनुक्रमे “क, च, ट, त, प” आणि “ग, ज, ड, द, ब” यांचे ‘ह’कारयुक्त उच्चार आहेत, त्याचप्रमाणे ऱ्ह हा ‘र’ चा ‘ह’कारयुक्त उच्चार आहे, आणि ऱ्य हा ‘य’कारयुक्त उच्चार. असेच व्ह, ल्ह, हे अनुक्रमे व-लचे ‘ह’कारयुक्त उच्चार आहेत, आणि व्य, ल्य हे ‘य’कारयुक्त, असे काही भाषाशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

‘र'फार प्रकार ५[संपादन]

र् या व्यंजनाला दुसरे अक्षर जोडताना मागल्या अक्षरावर आघात येत असेल तर त्या दुसऱ्या अक्षराच्या डोक्यावरच्या शिरोरेषेच्या वर जाईल असा एक रेफ (हूक-आकडा) काढतात. उदा० सूर्य, पूर्व, गर्व, मूर्ख, दर्प. या शब्दांच्या उच्चारात आधी ’र’चा उच्चार होतो आणि मग शिरोरेषेखालील अक्षराचा.

हा रफार क्वचित स्वराक्षरांवरही द्यावा लागतो जसे र्ऋ, र्अ, र्आ, र्उ, र्ऐ, वगैरे. उदाहरणार्थ : नैर्ऋत्य, हविर्अन्न, कुर्आन, पुनर्आखणी, पुनर्उच्चार, पुनर्ऐक्य,

रेफ असलेल्या शब्दांचे वैशिष्ट्यः

संस्कृतमध्ये शब्दात येणाऱ्या ज्या अक्षरावर ‘रेफ’ असेल त्या अक्षराच्या आधीच्या अक्षराचा इकार किंवा उकार दीर्घ असतो. उदा० कीर्तन, जीर्ण, गीर्वाण, ऊर्ध्व, ऊर्जा, ऊर्मि, ऊर्मिला.

परंतु, शब्दाच्या सुरुवातीला असलेल्या निर्‌ किंवा दुर्‌ या उपसर्गांतील ’र्‌’चा रेफ झाला असेल तर, ’नि’आणि ’दु’ ऱ्हस्वच राहतात. उदा० निर्मल, निर्मिती, दुर्योधन, दुर्वास वगैरे.

मात्र उर्वशी, उर्वी, उर्वरा, उर्वरित, कुर्कुट, कुर्कुर, गिर्यारोहण या शब्दांत ‘रेफ’ असलेल्या अक्षराच्या आधीचे उकार ऱ्हस्व आहेत.

मराठीमध्ये ‘रेफ’ च्या आधीचा अक्षराचा इकार किंवा उकार ऱ्हस्वच काढावा असा काही शुद्धलेखनतज्‍ज्ञांचा आग्रह आहे. त्याप्रमाणे इर्दगिर्द, कुर्ग, किर्र, कुर्र, खुर्ची, गुर्जर, चुर्र, तिर्री, तुर्क, दुर्बीण, भुर्र, हे शब्द असे लिहितात. या शुद्धलेखनतज्ज्ञांच्या मतानुसार कीर्द, कारकीर्द, ऊर्फ या शब्दांतल्या ‘रेफा’ पूर्वीचे इकार-उकार ऱ्हस्व लिहिले पाहिजेत. असे असले तरी (कीर्द, कारकीर्द आणि ऊर्फ) हे शब्द अजूनही असेच छापलेले आढळतात. कारकीर्द शब्दाला प्रत्यय लागून बनलेल्या ’कारकिर्दीत’ या शब्दातली ’कि’ मात्र, ऱ्हस्व काढली तरी चालते, असे दिसते आहे.