आडिवरे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आडिवरे हे भारतातल्या महाराष्ट्र राज्याच्या रत्‍नागिरी जिल्ह्यातील एक गाव आहे. हे गाव तेथील महाकाली मंदिराकरिता प्रसिद्ध आहे. रत्‍नागिरी जिल्ह्यामधील राजापूर तालुक्यातील आडिवरे गावाला प्राचीन इतिहास आहे. भोज राजाने आडिवरे भागातील कशेळी गावच्या बारा ब्राह्मणांना त्याच गावाचे उत्‍पन्‍न दिले असे सांगितले जाते. ‘अट्टाविरे कंपण मध्यवर्ती कसेलिग्रामे’ असा उल्लेख असल्याचे इतिहासकार वि.का राजवाडे यांनी लिहिले आहे.

असे म्हणतात की आडिवरेच्या या महाकाली देवीची स्थापना आद्य शंकराचार्यांनी चौदाव्या शतकात केली, असे म्हणतात. हे महाकालीचे मंदिर अत्यंत सुंदर असून त्याच्या चांगल्या प्रकारे निगा राखलेली आहे. देवीची मूर्ती सुबक असून तिच्या मागे दोन सुंदर मोर आहेत. महाकाली मंदिराच्या ठिकाणी राहण्यासाठी भाड्याने खोल्या मिळू शकतात, तसेच पूर्वसूचना दिल्यास जेवणाची सोय होते.

आडिवरे येथे जाण्यासाठी रत्‍नागिरीहून एस्‌टीच्या बसेस आहेत.

महाकाली मंदिर[संपादन]

आडिवरे येथील श्री महाकाली देवी

कोल्हापूरच्या अंबाबाईइतकेच महत्त्व असलेले महाकाली मंदिर हे आडिवरे गावचे भूषण आहे. हे गाव रत्‍नागिरीपासून ३४ किमी आणि राजापूरपासून २८ किमी अंतरावर आहे. महाकाली ही नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध आहे.. धार्मिक संचित असलेले हे ठिकाण येथील सुंदर निसर्गसौंदर्यामुळे पर्यटन स्थळ म्हणूनही प्रसिद्ध होत आहे.

नागरी सुविधा[संपादन]

येथे राष्ट्रीयीकृत बँक ऑफ इंडियाची शाखा आहे.[१] शेती, दुग्धव्यवसाय,विहीर खोदणे, शेळ्यामेंढ्यापालन, किराणा दुकान,इतर सेवा व्यवसाय इत्यादीसाठी बँक वित्त पुरवठा करते.

दंतकथा[संपादन]

इसवी सनाच्या ९व्या शतकात भंडारी ज्ञातीचे लोक वेत्ये या त्यांच्या समुद्राकाठच्या गावी नेहमीप्रमाणे मासे पकडण्यासाठी गेले असता त्यांचे जाळे अडकून पडले. बरेच प्रयत्न करूनही जाळे वर येईना तेंव्हा त्यांनी जलदेवतेची करुणा भाकली. त्यांच्यापैकी मूळ पुरुषाच्या स्वप्नात येऊन श्री महाकालीने दृष्टान्त दिला "मी महाकाली आहे, तू मला वर घे आणि माझी स्थापना कर". त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी जाळे ओढले असता त्यांना काळ्या पाषाणातील महाकालीची मूर्ती सापडली व त्यांनी दृष्टांताप्रमाणे सर्वांना मध्यवर्ती अशा "वाडापेठ" येथे देवीची स्थापना केली.

मंदिर[संपादन]

मंदिरात महाकालीसमोर उत्तरेस महासरस्वती तर उजव्या बाजूस महालक्ष्मीची स्थापना केली आहे. मंदिर परिसरातच उजव्या बाजूला योगेश्वरी, प्राकारात नगरेश्वर व रवळनाथ ही मंदिरे आहेत. देवीचे दर्शन घेताना सर्वप्रथम परिसरातील नगरेश्वराचे, त्यानंतर महालक्ष्मीचे, रवळनाथाचे आणि त्यानंतर महाकालीचे व महासरस्वतीचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. या संपूर्ण परिसराला महाकाली पंचायतन असेही म्हणतात. कोकणातील इतर देवालयांप्रमाणेच महाकालीचे मंदिरही कौलारू आहे. मंदिराचा परिसर स्वच्छ आणि सुंदर असून महाकालीची मूर्ती अतिशय आकर्षक व सुंदर आहे. मंदिराचा सभामंडप प्रशस्त आहे. अशा या प्राचीन मंदिराला छत्रपती शिवाजी महाराज, कान्होजी आंग्रे, समर्थ रामदास स्वामींनी भेट दिल्याचे पुरावे सापडतात. देवळात दरवर्षी नवरात्रोत्सव साजरा केला जातो.

अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी या नऊ दिवसाच्या कालावधीत यात्रा भरते आणि भाविकांचे पाय आडिवरेकडे वळतात. उत्सव काळात देवीला वस्त्रालंकारांनी देवीला विभूषित केले जाते. दहाव्या दिवशी दसरा होतो. याच काळात दैनंदिन कार्यक्रमांबरोबर पालखी सोहळा, सांस्कृतिक-धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

कसे जाल?

रत्‍नागिरी आणि राजापूर ही मुंबई-गोवा महामार्गावर आहेत.

रत्‍नागिरीपासून : रत्‍नागिरी-पावस-गावखडी-पूर्णगड-कशेळी-आडिवरे ( ३४ किमी)

राजा्पूरपासून : राजापूर-धारतळे-आडिवरे ( २८ किमी)[२]


[[वर्ग:रत्‍नागिरी जिल्ह्यातील गावे]kfi9c9cf9f0c99f0

]

  1. ^ /https://www.bankofindia.co.in/
  2. ^ http://kavyvena.blogspot.in/2015/05/blog-post_49.html