होट्टलचे शिलालेख

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
होट्टल येथील शिलालेख

होट्टल येथे आजपावेतो दोन कानडी व एक नागरी भाषेतील शिलालेख उपलब्ध झालेले आहेत.[१]

पहिला शिलालेख[संपादन]

“ (स्व)स्ती श्रीमत रेब्बे(यना)य(कं) अवरा........(मम)डळीकन इरेया.......नम अवरा प्रधानरम (श्री)(म)क चालुक्य विक्रमा (व)र्शदा २६ नेया विशा (साम)वत्सरदा कार्तिका सु ८ ब्रिहावारदा उत्तरायणा संक्रातीनिमित्तदल आग्रहा राव इरियेगा साळेया त्राईपुरुषदेवरीगम आलिया.......बाळिया .....सर्वनामस्या......कालगरच्ची धारा.....कामयादी....स्वदत्तम परदरा....वा यो हा संधराम शा... हसरानी “
हा शिलालेख कानडी भाषेत दगडाच्या दोन बाजूंवर लिहिलेला असून दुसरी बाजू अतिशय भग्न झालेली आहे. यामध्ये उल्लेख केलेले वर्ष म्हणजे चालुक्य विक्रम वर्ष २६ विशु कार्तिकी ८ गुरुवार, उत्तरायण संक्रांती. इ.स. प्रमाणे त्यादिवशी तारीख होती ३१ ऑक्टोबर ११०१. संक्रमणानिमित्त रेब्बेयनायक आणि त्याचे काही अधिकारी यांनी त्रैपुरुषदेवालयाला दान दिल्याचा उल्लेख या शिलालेखात येतो.

दुसरा शिलालेख[संपादन]

“ स्वस्ती श्रीमक चालुक्य विक्रमा वर्शदा ४५ नेया सर्वारी संवत्सरदा अस्वाईजाद अमावस्ये सूर्य ग्र हनादाम्दु कालेयनायकन अनातीयीम बिरारासम श्री स्वयंभू रेब्बेश्वरदेवा रग्गा अल्वा पोट्टाला मा(दा)नुरा अम्का(दे)रेया धारापुरव्वकम मदि बितारु मंगला महा(श्री) ”
कानडी भाषेतील या शिलालेखातील वर्ष चालुक्य विक्रमवर्ष ४५ सर्वरी अश्वयुज अमावस्या सूर्यग्रहण असे आहे. इ.स. प्रमाणे त्यादिवशी वार होता रविवार दिनांक २४ ऑक्टोबर ११२०. कालेयनायकाच्या आज्ञेवरून बिरारसाने पोट्टाला आणि मदनुरु म्हणजेच हल्लीचे होट्टल आणि मदनूर ही गावे स्वयंभू रेब्बेश्वराला दान दिल्याचा उल्लेख येतो.

तिसरा शिलालेख[संपादन]

“ ……तेन संस्थापित: स्थाणु: कल्याणे गुणिनां गृहे पुरे चालुक्यचंद्रस्य सोमेश्वरमहिपते: ।।३३।। निष्कं द्रम्मंच भूमिशो ग्रामे ग्रामे पुरे पुरे ददौ तस्मैस देवाय चंद्रराशिगुरो: पुरः ।।३४।। ......”
हा तिसरा शिलालेख नागरी भाषेत पद्यात्मक कोरलेला असून त्यात एकूण ४३ कडवे येतात. पैकी ३३, ३४, ४१ व ४२ क्रमांकाचे कडवे प्रत्येकी दोन ओळींचे व उरलेली ३९ कडवी प्रत्येकी चार ओळींचे म्हणजे एकूण १६४ ओळीत शिलास्तंभाच्या दोन बाजूंवर हा लेख लिहिलेला आहे. या शिलालेखात लेखनकालाचा उल्लेख येत नसला तरी हा लेख चालुक्य नृपती सोमेश्वर दुसरा याच्या काळातील म्हणजेच इ.स. १०६८ ते १०७६ काळातील असावा असे निःसंदिग्ध म्हणता येते. सुरुवातीला शिवाच्या स्तुतीनंतर गोदावरीची उपनदी असलेल्या मांजरा नदीच्या तीरावरील अगस्ती आश्रमाचे वर्णन सदर शिलालेखात येते. त्यानंतर चालुक्यांचे मांडलिक घराणे वन्ही कुळाची माहिती दिलेली आहे. या कुळातील ढोरराजाने चालुक्य राजा तैल दुसरा व परमार मुंजा यांच्यात झालेल्या लढाईत महत्त्वाची कामगिरी केलेली होती. त्याचा मुलगा उत्तम. उत्तमचा मुलगा कालिचोर आणि कालिचोरचा मुलगा अर्ग याची स्तुती पुढील काही कडव्यात येते. अर्ग यास रैभेय असेही म्हटलेले आहे. त्याचा मित्र सिद्धुगी याने चालुक्यांची राजधानी कल्याणी येथे सिद्धेश्वराचे मंदिर बांधले व या मंदिरासाठी अर्ग याने त्याच्या अधिकारातील हजार गावातून प्रत्येकी एक द्रम्म (सुवर्ण नाणे) व एक निष्क (चांदिचे नाणे) गोळा केले असा उल्लेख या शिलालेखात आहे. याच शिलालेखातील एका कडव्यात शिलालेख करवून घेणाऱ्याने “ कवी हा राजाचा खरा मित्र असतो कारण तोच राजाला त्याच्या काव्यातून अजरामर बनवितो ” असे म्हटलेले आहे. शेवटच्या ओळीत लक्ष्मणाने हा लेख लिहिल्याचा संदर्भ येतो.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ संतोष दहिवळ. "चालुक्यन टेंपल आर्ट इन्फ्लुएंसेस ॲट होट्टल इन महाराष्ट्रा".